मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

भार

जगन्नाथपुरीत दोन दिवस, तीन रात्र राहणार होतो. तशी व्यवस्था एका गुरुकुलात केली होती. पैकी एक दिवस रविवारच्या सुट्टीचा असल्याने आराम होता आणि दुसरा दिवस राष्ट्रियसंस्कृत संस्थान मध्ये धडकण्याचा होता. सुट्टीच्या दिवशी आराम करून झाल्यावर दर्शन घ्यायला जाणार होतो.  बंगालच्या उपसागरातून होणारा सूर्योदय दुसऱ्या दिवशी बघायचा होता. वसंत पंचमी पंधरवड्यावर होती. फेब्रुवारीचा महिना, माघाची थंडी- असं सगळं छान वातावरण होतं.
दुपार नंतर पाय मोकळे करायला, थोडासा बाजार फिरून रबडी, रसगुल्ला आणि दूधातल्या मिठाया खायला, ओडिशी कलाकृती असेली सूती-खादी वस्त्र बघायला बाहेर पडलो आणि फिरत फिरत मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो. तेव्हा तिथे जमावाचा घोळका दिसला. पत्रकारांचे कॅमेरे, माईक, पुष्पगुच्छ, हार, उपरणी आणि त्या सगळ्यांचा मध्यबिंदू असलेली मागच्या कॅरियरवर पेटाऱ्यांच्या आकाराच्या दोन तीन  बॅगांचं वजन वाहणारी  एक घोडा सायकल आणि तिच्या कृतज्ञतेने नतमस्तक झालेला एक सायकल स्वार.
तो गोंधळ मला परिचयाचा होता. एकूण सायकलस्वाराकडे बघता त्यांचं वय बरंच असावं असं वाटलं. मी दूर उभं राहून गर्दी कमी व्हायची वाट बघत होतो. जरा वेळाने ती ओसरली. सायकल शिवाय मला कोणी मी सायकलस्वार आहे असं ओळखू शकणार नाही अश्या वेशात फिरायचो. पांढरा सूती कुर्ता, मंदिरात जायचं असेल तर  धोतर नाहीतर ठरलेली राखाडी रंगाची ट्रॅक पॅण्ट. धोतर मल्टीपर्पज़ होतं. कधी तरी अंथरूण-पांघरुणाचं काम करायचं आणि कधीतरी संस्कृत वातावरणात मिसळून जायलाही मदत करायचं. तसा माझ्या वयाला न शोभणाऱ्या अजागळ वेशात त्या सायकलस्वारापुढे गेलो. आणि "मी भारत भ्रमण करतोय" सांगत, "कधी भेटता येईल?" म्हणून वेळ मागितली. त्या आधी "जोयोदेबो राऔत!" असा नावाचा परिचय करून घेताना सायकलस्वार बंगालचा आहे हे उच्चारणा वरून ओळखलं.  दुसऱ्या दिवशी काॅलेजची भेट आणि शिक्षकांबरोबर चर्चा यात त्यांना भेटणं राहून गेलं. पण निघायच्या दिवशी त्यांनीच फोन करून डाक बंगल्यावर बोलवून घेतलं, नाश्त्यासाठी. आता माझा वेश पूर्ण बदलला होता. पण 'सायकलस्वार' म्हणून न सांगता ओळखू येण्यासारखा होता.
मग भरपूर गप्पा रंगल्या. त्यांच्या घरची परिस्थिती हालाकीची असतांना त्यांनी यापूर्वी दोनदा भारतभ्रमण केले आहे.आता केवळ मध्यभारतातील काही जिल्हे ते रक्तदानाचं महत्व पटवून द्यायला फिरता आहेत. असं समजलं. घरा बाहेर सन्मान खूप मिळत असला तरी बंगाल राज्यात, "मी वेडा ठरवलो गेलो आहे; मला काडीचीही किंमत या समाजात नाही," हे ऐकून खरं तर त्यांनी त्या समाजाचं भीषण वास्तवच मला सांगितल्यासारखं झालं. जिल्हा, तालुके, किलोमीटर, गावं यांची लांबच्या लांब आकडेवारी त्यांना तोंडपाठ होती. ती  ऐकून मला बरंच विचित्र वाटलं. मी जेमतेम किलोमीटरचा हिशोब ठेवत होतो. जिल्हे आणि जिल्हाधिकारी इत्यादि आकडे माझ्या गावीही नव्हते. पण, त्यांनी आजवर दरवेळेला घेतलेली मेहनत, केलेले काम हे इतके तात्पुरते उरले होते की मागच्या सात वर्षात तीन वेळा भारतात फिरलेला माणूस  आज दीन होऊन कोणाच्या तरी सहाय्यतेसाठी वाट बघतो; एखादे ठिकाणी स्थिरावू शकत नाही. घरात सन्मानचिन्हे वाढली तरी माश-भात खाण्यासाठी डबे राकामेच असतात. मागच्या खेपेला एका राजकीय पक्षाने काही हजार रुपये देऊन त्यांचा वापर  प्रचारासाठी करून घेतला आणि गावो गावी अत्यंत दीन वागणूक मिळेल याची व्यवस्था लावली. "अतिथिः देवो भव" याच्या उलट आलेले सगळे अनुभव ते कोळून प्यायले आणि पुढची मोहीम आखतांना अधिक खंबीर झाले.
त्यांचे ते थक्क करणारे अनुभव ऐकत मी अनेक चुका टाळल्याचे माझ्या लक्षात आले. त्यातल्या प्रमुख दोन- 1. राजकीय पक्षांकडून सहाय्य. 2. सन्मान चिह्नादिंचा स्वीकार स्पष्टपणे टाळणं!
त्या घोडा सायकलवर पन्नास साठ किलोचा भार कसला? शाली आणि सन्मान चिह्नांचा; असंख्य प्रमाण पत्रांचा!
जो समाज माणसाच्या श्रमाला, अनुभवांना किंमत देऊ शकत नाही तो प्रमाण पत्रांना कसली किंमत देणार, रद्दीचीच ना?
उगाच विचार डोकावून गेला.

नंतर त्यांच्याशी बरेचदा फोनवर बोलणं झालं. बंगाल मध्ये शिरलो; परिस्थितीने गांजलेले, अज्ञानाने फसवलेले आणि समाजाने दाबून टाकल्याने शांत झालेले 'मर्दबंगाली' जेव्हा जेव्हा दिसले तेव्हा जयदेव राऊतांची आठवण झाली.
बंगाल मध्ये कम्यूनिस्ट वाऱ्यांची वादळे येतात. पण, तिथला समाज त्या वादळांसाठीच, त्या वादळांनीच बनला आहे असं सारखं वाटत राहतं.
-सम्प्रिः।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा