शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

दैनंदिनी

ख्रि. ३१.१२.२०२१

दैनंदिनी लेखनाची कला भारतीय भाषांना इंग्रजांनी शिकवली. मनाला मोकळेपणाने गद्य शब्दात अभिव्यक्त करता येऊ शकतं- यावर भारतीयांना विचार करायलाही वातावरण मिळालं नसावं. भारतीय समाज गर्दीत रमणारा. व्यक्तिगत स्वयंकेंद्रितपणा इथे दुर्मीळ. तो दुष्टप्रवृत्तीतच दिसत असावा. सद्प्रवृत्तीत त्याचं प्रकटीकरण काव्य आणि तत्वज्ञानातच झालं.  त्यामुळे इथे लिखाण झालं ते परार्थासाठी. कल्हणाची राजतरंगिणी हा एकमेव अपवाद वगळता इतिहासाला थेट पुरून उरतील असे दैनंदिनीत अभिव्यक्त झाालेले साहित्य भारतात दुर्लभच.


पुलंचं 'वंगचित्रे' वाचून झाल्यावर 'मुक्काम शांतिनिकेतन' वाचायला घेतलं. चांगली डायरी वाचल्याशिवाय आपणही तसा विचार करू शकतो आणि आपल्यापुरता का होईना मांडू शकतो असं वाटू शकत नाही. आजवर विचार करून मांडण्याचा प्रयत्न नकळतपणे झालाही असेल पण, त्या लेखनाला दैनंदिनीत स्थान आहे, लेखात नाही. हे सांगायचं काम देशपांड्यांनी केलं. देशपांड्यांनी हा प्रयोग वापरण्याचे कारण सध्या मी कॉ. भारती ऊर्फ सुनीता ठाकूर-देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी' वाचतोय.

त्या पुस्तकाविषयी सांगायचं तर, ते एक वैचारिक आहे, आयुष्याच्या उत्तरार्धात लिहीलं गेलेलं... मी रोज दहा-वीस पानच वाचतोय. संस्कृतचा "अंधभक्त अभ्यासक" नसल्याने,  कृतींमधून बाईंनी मांडलेल्या द्वंद्वात मीही अनेकदा अडकत असतो, एखाद्या बाजूला नकळत झुकतही असतो. तसल्याच कृती-परिणामांची सारासार विवेकी चर्चा आगदी ओघवत्या शैलीत गप्पा मारावी तशी पुस्तकात येते. परिणामांची अनुभवी गाठोडी बाई आपल्या समोर मोकळ्या करत असतात आणि महाजन बनण्यासाठीच्या स्वतंत्र मार्गाचा उपदेश करत असतात...


संभषणावेळी होणाऱ्या शाब्दिक व्यापाराविषयी त्या लिहीतात- प्रत्यक्ष संभाषणात आपण जी प्रत्युत्तरे करतो ती तशी विचारपूर्वक नसतातच. कधी विनोद, कधी तात्कालिक बचाव, कधी कुरघोडी तर कधी संभाषणाची निरर्थक हौस वगैरे अनेक पातळ्यांवर आपण बोलत राहतो.   दैनंदिनीत मात्र -काठावर बसून तिऱ्हाइताच्या दृष्टीने पाहण्याच्या- प्रयत्नात शब्द स्फुरतात. त्यात आपण स्वतः ‘स्वतः’ राहत नसल्याने संकोचाचा अडथळाही नसतो. तो स्वतःशीच निर्भीडपणे चाललेला मौनसंवाद असतो- स्वतःविषयी, कृत्यांविषयी, वातावरणाविषयी, निसर्गाविषयी, सारासार, सदसद्विवेक वगैरे बुद्धिने विचार करून मांडलेला.

स्वतः विषयी विचार कसा करावा हे आहे मनोहर तरी मधून शिकता येऊ शकतं. तर, आपल्या सभोवतालच्या कुठल्या गोष्टी दैनंदिनीत असाव्यात हे पुलंची दैनंदिनी वाचून समजतं.

वरील दोन्ही लेखकांमुळेच २०२२ ख्रिस्ताब्दात नियमित दैनंदिनी लिहावी असं स्वतःहून वाटू लागलं आहे. म्हणून तोच संकल्प! असे जाहीर करतो. दरम्यान, लिहीण्याचा सराव वर्षभरात यापूर्वी केला आहे. त्यालाही दैनंदिनी म्हणता येऊ शकते. त्यातील एका दिवसाचे पान दिनांक न छापता पुढील भागात सगळ्यांसाठी खुले करत आहे...


मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

झिम्मा

झिम्मा चित्रपटाला माझ्याकडून
तीन तारे!
एका उत्तम कथावस्तूचे, विषयाचे दिग्दर्शकाने, संगीत संयोजकाने तीनतेरा वाजवल्यामुळे पाचातून उणे दोन.
हा संपूर्ण चित्रपट केवळ अभिनेता आणि अभिनेत्रींच्या उत्तम अभिनयाने उचलून धरला आहे. म्हणून नट आणि नटींना अभिनयासाठी पाचपैकी पाच तारे!
का बघावा? अभिनय आणि विषयासाठी, हासण्यासाठी!
नव्या दिग्दर्शकाला प्रोत्साहन देण्यासाठी...

विषय तसा गंभीर आहे, प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनाला भिडणारा आहे, सहृदय पुरुषांना विचार करायला लावणारा आहे, समाज घडवणारा आहे, महिलांना समजून घेणारा आहे, अभिनेत्रींच्या माध्यमांतून विविध वयोगटातल्या, विविध सांसारिक पार्श्वभूमी असलेल्या महिलांचे मन बोलतं करणारा आहे. म्हणून नाव झिम्मा! अर्थातच हसत खेळत एकमेकींचे मनं उलगडणारा पारंपारिक खेळ.

कथा सुरूच होते विविध भारतीय घरांमधून. तिथून इंग्लंडला पोहचेपर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, चित्रपटाच्या परमोच्च बिंदूपर्यंत घेऊन जातो.
त्यानंतरचा चित्रपट इंग्लंडदर्शन घडवतो. तिथे पोहचल्यावर हास्य-करुण-वीर रसांमध्ये कथा गुंफली आहे.
हास्य रसाला साद घालायच्या प्रयत्नात अनेक ठिकाणी दिग्दर्शकाकडून विषय हातचा सुटला आहे किंवा गंभीरता दाखवण्याच्या नादात रसभंग तरी केला आहे.

चित्रपटाचा शेवट वीररसाने होतो. व्हाॅट्सअॅप संवादांचा खूप परिणामकारक उपयोग दिग्दर्शकाने इथे केला आहे.  मनाची धीटाई, दृढनिश्चयता दाखवण्यात एकूणच "बरे" यश आले आहे. मध्ये अनेकदा विषय सुटल्याने शेवटी- पूर्णतेच्या पट्टीवर वीरतेला पाऊण न्याय देता आला आहे.

 जिथे विषय हातचा सुटला ते प्रसंग वेगळ्या प्रकारे, वेगळी दृष्य दाखवत अधिक खुलवता आले असते. प्रेक्षकांना समरस करवून घेण्यात कुठेतरी दिग्दर्शक मागे पडला आहे. "बघतोस काय मुजरा कर" नंतर दिग्दर्शकाचा दुसराच चित्रपट असल्याने बऱ्याच चुका क्षम्य आहेत. त्यामानाने त्याने खूप मोठी उडी मारली आहे.

पार्श्वसंगीताचे काम -दृश्य चित्रांबरोबर अदृष्ट मानवी भावना प्रेक्षकांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहचवण्याचे असते.  चित्रपटातील अनेक मूक भांगांना अभिनायाने खुलवले खरे, पण त्याबरोबर संगीत असते तर तेच मनाला भिडले असते, डोळे पाणावून सोडले असते. ते राहून गेले आहे.
संपूर्ण चित्रपटात सतार, बासरी इत्यादि भारतीय वाद्यांचे तुकडे आहेत. पण, ते विषयाला सुसंगत असतीलच याचा काही नेम नाही.
पारंपारिक झिम्मा काव्य साहित्यला आधुनिक साद चित्रपटाच्या माध्यमातून घालता आली असती. पण त्याजागी आधुनिक गीत प्रकार टाकायचा अट्टहास केलेला दिसतो.

एकूण चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघण्यासारखाच आहे. कारण, स्त्रीवर्गाच्या मनाचा थारा घेण्याचे, पुरुषवर्गाचे कान टोचण्याचे, पॅडविषयी खुलेपणाने बोलून जनजागृतीचे काम विषयाने आणि अभिनयाने हसवत हसवत-गंभीर बनवत केले आहे.
तेव्हा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट नक्की बघा.
-गंधार