शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

आमी बी घडलो... ख्रिस्ताब्द २०२३


        या ख्रिस्ती वर्षात स्वतःला घडवणारी एक जबाबदारी ऑफिसात निभावली. वार्षिक अहवाल लिहिण्याची वेळ आली तेव्हा रूढी आणि नियम या विषयावर एक लेखच तयार झाला. 

प्रश्न साधा होता -  रुढी पाळाव्यात, विवेकाने वागावे की पथदर्शक नियम बनवावेत?


दोन्ही संकल्पनेतील भेद जाणून घेतल्यावर, आता साम्य बघूयात.

सामूहिक कार्यात सातत्य आणण्यासाठी कार्यपद्धतीच्या धारणा रूढी आणि नियमांनी निश्चित केल्या जातात.

आमच्या संस्थेचं काम शून्यातून उभं राहिलं. पाया आणि उद्देश परंपरागतच, पक्के होते. पण, तंत्रज्ञान नवीन. त्यामुळे कार्यप्रणाली शून्यातून विकसित करावी लागणार होती. अनेक अनुभवांतून नकळतपणे कामाच्या पद्धती, रूढी निर्माण होत होत्या. त्यात सुसूत्रता असावी म्हणून नियम बनवले जात होतेच. पण, नियम बनवण्यात सुसूत्रता नव्हती. किंबहुना त्याची गरज भासत नव्हती. कामाचा आवाका वाढू लागला तश्या परस्पर विरुद्ध रूढी समोर येऊ लागल्या. रूढींच्या अहंकारांतून भांडणं वाढली. कामाच्या वेगावर परिणाम होऊ लागला. ज्यांनी नियम बनवायचे, त्यांच्याच रूढींचे अहंकार नियमांच्या कामात अडथळा बनत होते. मग हट्ट धरून बंड करावे लागले. नियम बनवण्यात सुसूत्रता आणली गेली. पूर्वग्रह न ठेवता नियम बनवणे, सगळ्यांचे पूर्वग्रह-रूढी ऐकून घेत एक मार्ग काढणे आणि ज्यांच्या पूर्वग्रहांना, अविवेकी रूढींना मोडलं गेलंय त्यांचा रोष पचवणे ही प्रक्रिया स्वतःला घडवणारी होती.

ती कशी?

        नियमांची पहिली संहिता सगळ्यांसमोर ठेवली. ती स्वीकारणं कठीण जाणार होतं. सगळ्यांच्या कलेने त्यात बदल करणं मला वेदना देत असे. सगळ्यांच्या सूचना ऐकून डोकं भंडावून जायचं. आपण केलेल्या कामावर हातोडा मारला गेला की वाईट वाटायचंच. त्यातून काहीतरी अधिक खंबीर घडत होतं असेल. हे मनाला समजवावं लागलं. मग मनाचं उत्तर यायचं, "समकृती समकृती समकार्य…

        संहिता संस्कृतमधे होती. नवीन कार्यप्रणाली, तिही तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली; संस्कृतात लिहिण्यासाठी नवीन शब्द बनवावे लागणार होते, जुन्या शब्दांना नवीन अर्थ द्यावे लागणार होते. माझं संस्कृत नवीन शिक्षण पद्धतीतून घडलेलं. संहितेतील नवीन शब्दप्रयोगांवर निरुक्तशास्त्र आणि राजवाड्यांचा मोठा प्रभाव दिसत होता. तो परंपरागत विद्वानांना पटणे अशक्यच होते. स्वीकारार्ह संस्कृतसाठी पारंपारिक आणि आधुनिक दोन्ही संस्कार असलेली भाषा वापरणे गरजेचे होते. त्यासाठी गुरुकुलात शिकलेल्या एका विद्वानासोबत पंधरा दिवस रोज बैठका होतं. एकमेकांना कान पकडायला लवतील अश्या बैठका! वळवू तशी वळेल इतकी लवचिकता असलेल्या भाषेचा हा दुष्परिणामच होता. एका बैठकीत कुठल्याश्या शब्दावर मी अडून बसलो होतो. मी केलेल्या तर्क वितर्काने पारंपारिक विद्वानाच्या सहनशक्तीच्या मर्यादा ओलांडल्या असाव्यात. तो बैठकीची खोली सोडून जाऊ लागला. त्याला पुन्हा जागेवर बसावण्याचं कसब मला दाखवता आलं ते खाली उल्लेखिलेल्या शक्तींमुळेच.

        ह्या प्रक्रियेत मी मराठी! म्हणून, कोणीतरी मला उपहासाने आंबेडकर म्हटले. मी हे काम हाती घेण्यापूर्वी ज्यांनी हे काम सांभाळले त्याही मराठीच होत्या. खरं तर, इतके वर्ष मराठी लोकांनीच या कामी पुढाकार घ्यावा हे विशेषच नव्हते का! असं घडलं की, आपसूकच एखाद्या समाजगटावर खार खाणारे जन्माला येतात. म्हणूनच ही चेष्टा सुचली असावी. मला मात्र मराठी असल्याचा अभिमान वाटलाच, प्रोत्साहनही मिळाले आणि जबाबदारीची जाणीवही झाली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांचा वारसा लाभलेला मी एक! फाशीची शिक्षा मरेपर्यंत नसू शकते याची जाणीव लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना करून देत, असलेल्या नियमांत स्पष्टता आणायला भाग पाडले. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान दिलं. महाराजांनी स्वराज्यासाठी किती नियम बनवले असतील, अष्टप्रधानांच्या मसलतीत त्यांचे किती नियम बदलले असतील. रोज सकाळी केलं जाणारं महाराजांचं स्मरण महाराष्ट्रधर्माला अधिक बळावणारं असतं आणि तेच बळ रोष पचवायच्या कामी येत होतं, बैठकीतून उठून न जाण्यासाठी बळ देत होतं. छोट्या अपमानांनी नाराज होऊन कसं चाललं असतं?

        सगळ्यांच्या सल्ल्यांचा अंतर्भाव करत काही महिन्यांनी आमच्या कार्यप्रणालीची नियमावली तयार झाली. ती माझी एकट्याची नव्हतीच. संस्थेची होती. नियमांची सवय होऊ लागली तशी भांडणं कमी झाली. कामाचा वेग वाढला. रूढी कडक होण्या आधी त्यांच्यावर विवेक-अविवेकाचे संस्कार घडवून त्यांचे काय करावे याचीही कार्यप्रणाली तयार झाली. 

हा प्रवास खूप छान होता.

आमी बी घडलो तुमी बी घडा ना!

मंगळवार, १३ जून, २०२३

अबोल दगड

अरावलीत फिरतांना इथे प्रेरणा देणारा इतिहासच नाही अशी खंत वाटली. प्रेरणा देणारी जाणीव म्हणजे इतिहास? कसा बरं तो? 

का फिरावं? तर, दगडांना बोलतं करण्यासाठी. शब्दान् अक्षरयितुं पाषाणम्। पण हे दगडच अचेतन असतील तर? 
नासदासीन्नो सदासीत्तदानीं ...
त्यावेळी सत् नव्हते असत् ही नव्हते म्हणणाऱ्या नासदीय सूक्तात पुढे, इच्छेतून रेतसकिरण हलला, अन् जगाची उत्पत्ती झाल्याचा सिद्धांत मांडला आहे. 
हे जे हलणं असतं, त्या जाणीवेतूनच इतिहास घडत असतो. स्वातंत्र्यासाठी घोड्यांच्या टापा सहन करणारी जमीन त्या ध्येयवादी हालचालीने पावन होत असते. रोजच्या हालचालीतलं ध्येयच इतिहास घडवत असतं. "Eventful आयुष्य जगता आलं पाहिजे" हे प्रबोधिनीतलं एक प्रेरक वाक्य. आयुष्य सगळेच जगतात. पण events इतिहास घडवतात. विचारातली आणि कार्यातली उदासीनता इतिहास कसा घडवणार? रोज काहीतरी नवीन सुचलं पाहिजे, कालच्यापेक्षा आज पुढे गेलं पाहिजे. हे चैतन्याचं लक्षण.

डोंबिवलीला इतिहास आहे का? शालिवाहन काळातले मानले गेलेले एखाद दोन शिलालेख सोडले तर, इंग्रजांनी रेल्वे रूळ टाकेपर्यंत कुठलीच ऐतिहासिक हालचाल घडल्याचे पुरावे डोंबिवलीत आढळून येत नाहीत. त्यामानाने गणेश घोळ, खिडकाळी, कल्याण बंदर, गांधारी हा डोंबिवली भोवतालचा परिसर इतिहासपूर्ण असल्याचे जाणवते. इतिहास नाही म्हणजे जीवन नव्हते का? तर, नाही! त्या जीवनात कुठलाही बदल नव्हता ऋतूंमागून ऋतू येत होते आणि जात होते. असेल हरी तर देईल खाटल्यावरी ही गत!

बदल नित्य असतो- प्रवाही, चैतन्यमय जीवनासाठी. औदासीन्यात बदल संभवणे अशक्यच.राजस्थान मागास वाटतो तो उदासीनतेने. जुनी मातीची घरं, जाती व्यवस्थेने जखडलेला समाज, बलाढ्यांसमोर झुकण्याची रीत, किती शतके आणि पिढ्या तसेच सुरू असले असेल ह्या राजस्थानातल्या अरावलीत... इथे फिरतांना ते औदासीन्य आणि इतिहासरहितपण ठळकपणे जाणवले. रिकामी, दारं खिडक्या नसलेली मातीची घरं पाहून आश्चर्य वाटलं. मग लक्षात आलं ही मेंढपाळांच्या कबिल्यांची निवासस्थानं. 
  मेंढपाळ पाहिले की मला आठवतो "द अल्केमिस्ट" पुस्तकातला सॅन्तियॅगो - नायकाच्या भूमिकेत असलेला मेंढपाळ आठवतो. तो मेंढपाळ नायक होऊ शकला; मेंढपाळाच्या चौकटीत न बसणाऱ्या स्वप्नांनी, नव्या विचारांनी. तो इतर मेंढपाळांपासून वेगळा ठरला. तसेच होते जोनाथन सीगल चे. समुद्रपक्षी-जोनाथन! ऊंचच ऊंच भरारी घेत, शारीरिक, मानसिक क्षमता ओलांडत अजरामर ठरला!

 मौर्य-सातवाहन-चालुक्यांपासून ते अगदी पानसरे-भिड्यांपर्यंत महाराष्ट्रातली वैचारिक हालचाल थांबल्याचे कुठेही दिसत नाही. हेमाद्रिच्या लिपीनिर्मितीच्या हालचालीतून निर्माण झालेला मराठा, छत्रपती शिवाजीरायांच्या राज्यव्यवहारकोशाने गरजता राहिला, सावरकरांच्या शब्दनिर्मितीने निनादत राहिला, शाहीरांच्या डफ-टुणटुणीतून गात राहिला. हा इतिहास पावलोपावली बोलता यावा इतकी महाराष्ट्रातली माती जीवंत आहे.
महाराष्ट्रापासून दूर राहिल्याशिवाय याचा प्रत्यय कसा येणार? निसर्गाचं प्रवाही नित्यत्व विश्वव्यापून आहे. माणसाच्या प्रवाही नित्यत्वाला जोड लागते विचारांची, विवेकाची, कणा असल्याच्या जाणीवेची. इतिहास रोज घडवता येतो. 
अरावलीच्या कुशीत बसून सह्याद्रीचे वारे आठवावेसे वाटतात इथल्या अबोल दगडांमुळेच!
#सायकलोपासना #cyclopasana

शनिवार, २७ मे, २०२३

अजूनही ती शिकवते आहे...

चक्री थांबक अडकला! चाक पुढेही जाईना मागेही येईना. पर्यटकांचा नाविन्यपूर्ण उत्साह जिथे ओसंडून वाहतो अश्या गणगौर घाटावर जात असतांना म्हणजे जगदीश मंदिरापुढचा उतार उतरतांना हा प्रसंग घडला. आम्ही जात होतो पिछोलाच्या पलिकडल्या तीरावर. पण तळ ठोकला गणगौरघाटावरच.
जगदीश, मेहेरालोक आणि मी, आमच्या सायकलींची काहीना काही कामं निघाली होती. ती करायला बापू बाजारातले पंजाब सायकलचे दुकान गाठले. कामं आटोपली. माझ्या थांबकाची तार बदलायची होती. ती बदलली. चिकित्सकाने एक नट हलत नसल्याचे दाखवून दिले. मी तेव्हा त्याला तेला विषयी विचारलं. ते तेल त्याच्या गावीही नव्हतं. पण थांबक नीट लागूही लागला म्हणन बघू नंतर म्हणत सोडून दिलं... आणि नंतर म्हणजे लगेच असणार होतं हे कुणी पाहिलं होतं? अचानक एका उतारवार चाक हालेच ना. माझ्याकडच्या अवजारांनी थांबक काढून टाकायचा प्रयत्न केला. दातखीळ बसावी तशी चक्री थांबकाच्या चकत्यांमधे अडकली होती आणि त्याबरोबर चाकही अडकलं होतं. 
मी दोघांनाही घरी जायला सांगितलं. कारण इतक्या गर्दीत आपल्यासाठी कोणी तरी तात्कळत थांबल्याचं दडपण मला नको होतं. 
  चढ-उतार, छोट्या गल्ल्या, बेशिस्त वाहतूक, भोचकपणा भरलेले बिनकामाचे रिकामटेकडे स्थानिक रहिवासी यांमधून वाट काढत हार्डवेअरचे दुकान शोधत सायकलचा मागचा भाग हातात उचलून किलोमीटरभर पायपीट केली. 
मधे मधे थांबत होतोच. एका पाणपोईपाशी थांबलो. तेव्हा लक्षात आलं, तास-दीडतासापूर्वी ऊसाचा रस पिल्यानंतर काहीच पोटात गेलेलं नव्हतं. इथल्या कोरड्या ऊन्हात चक्कर येऊन पडल्या शिवाय तहान लागल्याचं समजत नाही. लिटरभर पाणी पिलं. एक रिक्षेवाला त्याच वेळी तिथे पाण्याच्या बाटल्या भरायला थांबला आणि मी पाणी पिण्या आधी त्याने बाटली नळाखाली धरून नळ आडवला. मला बाटलीभर पाणी दिलं. म्हणून तो लिटरभराचा हिशोब लागला. त्याच्याकडे जवळच्या दुकानाची चौकशी केली. चौकात पोहचल्या शिवाय माझ्या कामाचं एकही दुकान लागणार नव्हतं. ही बोळ पर्यटकांसाठी आकर्षक वस्तू मिळतील अशी होती. नंतर सोनारांची गल्ली मग चौकात कापडांची दुकानं आणि त्याच्या पलिकडे लोहार वस्तीत, चढावर, शनिमंदिराच्या गल्लीत हार्डवेअर! जुनं उदयपुर टेकड्यांवर वसलेलं आहे. दोन टेकड्यांमधे एक पोल म्हणजे दरवाजा असणारा चौक आहे. मला जायचं होत हाथी पोलला. 
अनेक महिने-वर्ष न फिरवल्याने काही नट बोल्ट घट्ट होऊन बसले आहेत. वंगण जळून ऑक्सिडेशन झाल्याचा परिणाम.  असा प्रसंग उद्भल्यावरच ते हे लक्षात आणून देतात. ही समस्या त्यातलीच असावी. 30, 45, 66 यांपैकी कुठलंसं WD / Zorik वगैरे तेल मिळालं तर अडकलेला थांबक सुटू शकेल अशी शक्यता रचितने फोन वर बोलून दाखवली. अश्यावेळी रचित आठवायचं कारण - त्याने केटू सायकल्स बरोबर लोणावळा घाट चढायचा सराव केलेला आहे. त्या अनुभवांमुळे अश्या तांत्रिक बाबींविषयी त्याने ऐकलेलं आहे. ह्या साऱ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातूनच शिकता येतात. अभिषेक कोयंडेने मोहीमांमधून घेतलेले अनुभव रचितने ऐकले आहेत. म्हणून त्याला फोन केला. चक्री थांबक अडकून चाक जाम होते हे यापूर्वी फक्त ऐकले होते. आज माझ्या सायकलवर घडले होते!

हाथी पोलला एका भल्या दुकानादाराशी बोलून सायकल तिथे ठेवली. "पाच नाही दहा मिनीटांनंतर ये. पण येऊन घेऊन जा नाहीतर इथेच पडून राहिल सायकल" त्याने मला भीती घातली. त्याची काळजी रास्त होती. मी सायकल घ्यायला परत आलोच नाही तर? 
 तेल शोधायला गल्ली फिरू लागलो. आज तेल शनिदेवावर चढत आसल्याने शनिवारी हार्डवेअरची गल्ली बंद असल्याचं समजलं. तसं घडलं तर बापू बाजारापर्यंत किमान दीड किलोमीटरचा रस्ता सायकला चुकीच्या प्रकारे मिरवत कापावा लागणार होता. एक दुकान चुकून उघडं होतं त्याच्यकडे AM 70 सापडलं. आनंदात तेल घेऊन बाहेर पडलो. शनिमंदिरा बाहेरची रांग पाहून आज माझा शनिदेव सायकलचा थांबक आहे अश्या विचारात असतांना शिरस्त्राण दुकानात विसरल्याचं लक्षात आलं. पुन्हा चढ चढून पायपीट करून आलो. 
ते तेल फवारता, पाचव्या सेकंदाला थांबक मोकळा झाला. माझा जीव भांड्यात पडला. चाक फिरलं. थांबक काढून टाकला. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दुकानदार काकांनी चौकशी केली. हात धुवायला रिनची वडी आणि पाणी दिलं. आता पुन्हा दुकानात जाऊन काम करवून घेणे नको. आपण जितकं जमू शकेल तितकं, जेवढं जमेल तेवढं काम स्वतःहून केलं की परिणामांची जबाबदारी स्वतःवर घेता येते. दुसऱ्याने केलेल्या कामच्या वाईट परिणामांना मनस्ताप होतो. आता मागचा थांबक नव्हता. पुढच्या थांबकाच्या जीवावर मोकळी हवा घ्यायला# फतेहसागर गाठला. #सायकलोपासना #उदयपुर

बुधवार, १२ एप्रिल, २०२३

सीट

सीट

काल संध्याकाळी कचेरीतून बाहेर पडलो. मनात औदासीन्य भरून राहिलं होतं. #21dayschallenge संपलं! एकवीस दिवस सायक्लवायला मिळालेलं कारण, सायक्लवून झाल्यावर जगाला ओरडून काहीतरी सांगायला मिळालेलं "व्यासपीठ" उद्यापासून नसणार. 
आता फक्त आपणच स्वतःला प्रोत्साहन देऊन सायक्लवणारे.  अश्यावेळी अर्णवची आठवण आली तर, त्यात काय नवल? 21 days ला धरून पुढे १०० दिवस सायक्लवलं तेव्हा आम्ही एकमेकांना साकाळी घराबाहेर काढायची कामगिरी करत असू. 
21 दिवसांची मोहिम संपल्याच्या विचारांनी मन अस्थिर होत असतांना माझी नजर माझ्या सीट वर गेली आणि, "आता बदलायला हवी." या विचारासरशी मन कमालीचं हळवं झालं. 
ती सीट खरेदी करण्यापासून साऱ्या आठवणी जणू डोळ्यांसमोर आल्या. डिकॅथ्लाॅन मधे रचित बरोबर गेलो होतो. सगळ्यात महागडी सीट विकत घेतांना- सचीन दादाला केरळात सीटकव्हर मुळे घर्षण होऊन झालेल्या त्रासा विषयी त्याच्या ब्लाॅगवर वाचलं होतं.  "पुढच्यास ठेच मागचा शहाणा"  ह्या उक्तीनुसार- एवढं महागडं सीट घेतांना माझ्या मनात अजिबात दुसरा विचार आला  नव्हता.
पण ती किंमत पाहून माझी सीट हा आमच्यात कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय बनली होती. त्या चर्चेतला शब्दब्रह्मच काल मन गद्गदवत होता. काश्मीरात अस्सरला (भटोत) पोहचतांना एक घाट चढतांना तहान शमवायला रस्त्याकडेला- दरीच्या बाजूला असलेल्या एका घरावरील दुकानात शिरलो. तेव्हा त्या दुकाना समोरील झाडाला टेकवून सायकल ठेवली. पण चढ खडा असल्याने आणि सायकलवरील एकूण वजनाचा भार सहन न झाल्याने, जो भाग झाडाला टेकला होता तिथून सायकल मागे आली. सायकलीला झाडाने खरचटले. सीटवर मोठा व्रण झाला, तो कायमचाच. त्यावेळी झालेली मनाची धाकधूक अजूनही त्या सीटवरील व्रणाकडे पाहून होत असते. मला वाटलेलं आता जेल बाहेर येणार आणि सीट निष्कामी होणार. सीट खमकी होती. तिने मला अजिबात त्रास दिला नाही. ना मला पॅडेड शाॅर्ट्स घालाव्या लागल्या ना कधी औषधं लावण्याची वेळ आली. पॅडेड शाॅर्ट्स मला टाळायच्या होत्या स्वच्छतेच्या कारणांनी. माझा प्रवास पावसा पाण्यातला. त्यात त्या वाळणं कठीण. आणि भर उन्हात साक्लवायची वेळ आल्यावर त्या कापडाने घर्षण वाढून अधिक त्रास होऊ लागला. सुरवातीला तीन चार शाॅर्ट्स बाळगल्या. पण दोन महीन्यांतंच त्यांना निकालात काढले.  आणि माझे मलाच कपड्यांचे सुशेगीवलय समजत गेले. सीटने कधी निराशा केली नाही.

दुपारचे ऊन आणि उन्हाच्या झळा यांमुळे सीट जेलवरील आवरण, जे आता झिजून पातळ झालंय आणि वीरत चाललंय ते अधिक सैल सुटलेलं दिसलं. मग वाटलं, ठाण्याला गेलो की घेऊया नवी सीट. पण विचार केला आता सीटकव्हर चालू शकेल संपूर्ण सीटचा खर्च करून मोहिमेला कुठे निघायचंय!
अर्णव आणि रचित दोघांशीही सीटची आठवण काढून फोन वर मनमोकळ्या गप्पा झाल्या. तेव्हा बरं वाटलं. त्या सीटची नेमकी किंमत मी विसरलो होतो. रचितच्या लक्षात होती. २९९९/- ची सीट सवलतीत २४९९/- ला घेतलेली. रचित म्हटला, "वसूल ना भाई."

अजून काय हवं?
#सायकलोपासना #cyclopasana 
#dombivalicycleclub

मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

सायकल- श्रमांच्या चैनीसाठी

विशिष्ट प्रकारच्या रस्त्यावर सायक्लवायला विशिष्ट प्रकारची सायकल खरंच गरजेची असते का?
मला सायकलस्वार म्हणून ओळख मिळायला सुरुवात झाली २०११ सालच्या क्रीडा भारतीने आयोजित केलेल्या उज्जैन-डोंबिवली मोहिमेमुळे. अगदी साध्या सायकलवरून सायक्लवणाऱ्या सायकलस्वारांचा भार होता. केटू सायकलस्वारांशी तेव्हा परिचय झाला. आणि नतंर तो येत राहिला. डोंबिवलीत विशिष्ट प्रकारच्या सायकलचे दुकान नव्हते. उज्जैन च्या पराक्रमानंतर ॲक्ट११० आणली. ती हायब्रीड प्रकारची होती. ती ठाण्याहून आणली. अणजूर मार्गे होडीतून! डोंबिवली सायकल क्लबमुळे हा होडीमार्ग आमच्या नित्याचा होता. 
सगळीकडे निश्चिंतपणे ठेवून आपापले काम करता यावे म्हणून एका वर्षाने घोडा सायकल घेतली. पुढे, गावातल्या गावात अश्वशक्तिधारी वाहन वापरणार नाही, असा वर्षभराचा संकल्प केला तेव्हा घोडा सायकलने खूप साथ दिली. हायब्रीड कधी नादुरुस्त असली की घोडा सायकलचा चांगला आधार असायचा. 
घोडा सायकल वर डोंबिवली-नेरळ-डोंबिवली करतांना दोन लक्षात राहण्याजोगे चढ म्हणजे अंबरनाथ कडे पोहचतांना आणि बदलापूर सोडतांना लागणारा. ते दोन्ही चढ न थांबता चढणे घाम काढायचे. 
मग हायब्रिड सायकल वर माथेरान चढणे असो वा, खंडाळ्याचा, इगतपुरीचा घाट चढणे असो. कमीतकमी लो गिअर वर अधिकाधिक कठीण-खडे चढ चढण्याचा प्रयत्न केला; चढतांना वेगाकडे लक्ष न देता सायकल स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले 
की,
दम पायात लागतो. सायकल कुठलीही चालू शकेल असा प्रत्यय येत होता. 
अजूनही अनेक जण साध्या सायकलवर भारत भ्रमण, जगभ्रमण करतात. त्यावेळी त्यांना प्रेरणा कोण देत असतं? मला वाटतं, ध्येय!
त्यामुळे, माझी सायकल कुठली आहे? याचा विचार न करता, मी असलेली सायकल पूर्ण प्रयत्नांनिशी चालावतो आहे का? यावर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे असते. 
The type of bicycle is just a mind game when your goals are clear. 
मी क्राॅस आणि हायब्रीड सायकली वापरत असलो तरीही माझ्याकडे एक घोडा सायकल आहे. तिला पळवण्यात वेगळी मजा आहे. 
ही नाण्याची एक बाजू आहे.
दुसरी बाजू-
सायकल- म्हटले तर सगळ्यात स्वस्त आणि म्हटले तर सगळ्यात महागडे वाहन आहे. प्रत्येकाची खर्च करण्याची प्राधान्ये निराळी असू शकतात. हे सांगायचं कारण, परवा मित्राने चांगली टोरंटो घेतली. ते ऐकून दुसऱ्याने विचारले, "पैसे वर आले आहेत का?" 

आपले ध्येय, गरज, शारीरिक-मानसिक व आर्थिक क्षमता लक्षात घेऊन आपण सायकल ठरवावी. ह्यावर विचार करायला लावला -भारत परिक्रमा केलेल्या सचिन गावकर सरांनी. त्यांना भेटलो, मार्गदर्शन मागितले तेव्हा त्यांनी लेक्चर दिले नाही. पण अश्याप्रकारचे प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे लगेच देता येणे शक्य नव्हते. नंतरच्या प्रवासात ती मिळत गेली. पायात दम असला तरी, ध्येय काय आहे? 
खूप शारीरिक कष्ट घेऊन, सायकलच्या डागडुजीत श्रम आणि वेळ घालवून नंतर, शाळेतल्या वर्गात उभं राहता आलं असतं का? मागे लावलेल्या बॅगा सतत पडतायत, त्यांची बांधाबांध करण्यात तारांबळ उडून बरेचदा आतलं सामान खराब होऊन चाललं असतं का? लोकांशी संवाद साधायचा की दया-सहानुभूती मिळवायची? पावसात न भिजता प्रवास वेळेत पूर्ण झाला अहता का?
 मागे वळून पाहतांना, असे किती तरी प्रश्न सचिन सरांनी त्यांच्या प्रश्नांवर विचार करायला भाग पाडून सोडवले होते, असे वाटते. माझ्या उद्दिष्टात कुठेही काही उणे पडणार नाही अशी साथही मला बर्गामाॅण्टने दिली. #bergamont
मजा म्हणून सायकल चालवण्याठी किती खर्च करावा आणि एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती करावा? हे प्रत्येकाचे गणित भिन्न असणारंच. सायकल घेतांना ती आपल्या आयुष्यभराची सोबती आहे ह्या भावनेतून घेत असाल तर मात्र आजच्या बाजार भावानुसार गिअर सायकल साठी कमीत कमी २० हजार आणि विनागिअर साठी ८ हजार खर्चायची तयारी हवी. शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस विनागिअरच्या सायकलीत लागतो. तसे घडण्याची-स्वीकारण्याची तयारी हवी. 
हायब्रीड सायकल सर्वोत्तम. असा माझा समज आहे. कारण, रोड बाईक पेक्षा नखरे आणि माऊंटन बाईक पेक्षा श्रम कमी लागतात असे मी मानतो. वेगवान सायक्लवण्यासाठी रोड बाईकला पर्याय नाही. आणि खडबडीत चढ उताराच्या- रस्ता नसलेल्या जागांवर चालवण्यासाठी माऊंटन बाईकला पर्याय नाही. भारतीय रस्त्यांवरील सर्वसामान्य वापरासाठी हायब्रीड किंवा क्राॅस सिरीज मधल्या सायकली सर्वोत्तम हे माझे वैयक्तिक मत आहे. ते व्यक्तिगणिक बदलू शकते. 
BRM करण्यासाठी रोड बाईक असावी असं मला वाटतं. क्लिट्सचे शूज, वातावरोधसाही (aero-resistant) शिरस्त्राण, नखहीन हातमोजे, पाठीवरची पखाल, ह्या साऱ्या आभूषणांनी नटून कानात वारा भरून सायक्लवणं हे एखाद्या सायकलस्वाराचं स्वप्नच!  
तात्पर्य हेच, की त्या त्या ध्येयासाठी ती ती सायकल योग्यच! 
ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांवर चिंता करू नये. जसे रस्ता! तो आहे तसा आहे. आणि त्यावरूनच मला माझं ध्येयं गाठायचं आहे. मग आपली सायकल त्या रस्त्याला मनाने अनुकूल करवून घेणे अधिक सोयीचे. "श्रुतञ्चैव यत् कण्टकाकीर्णमार्गम्, स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्"-  "त्या ध्येयापर्यंत पोहचायचा रस्ता काट्यांनी भरलाय असं ऐकलंय. पण, स्वतःच ते ध्येय निश्चित केल्याने मी तो रस्ता अगदी सहज पार करण्याजोगा बनवीन."
मोठ्या ध्येयांसाठी मोठी-महागडी सायकल. पण, त्या बरोबर येणारी आव्हानेही तितकीच मोठी. कारण, सायकल काही नुस्ती आरामाची चैन नसते, तर ती असते श्रमांच्या चैनीसाठी बनलेले साधन...
#21dayschallenge #dombivlicycleclub #pedalrepublic #Cycle2Work #udaipur #dharohar #सायकलोपासना #cyclopasana
सौर चैत्र २० शके १९४५

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

ढोंगीपणा

काल एक वाक्य वाचनात आलं.
"भित्र्या तारुण्यातून ढोंगी समाज निर्माण होतो." (सुनीता देशपांडे यांच्या प्रिय जी. ए. पुस्तकातून)
दिवसभर हे एकच वाक्य डोक्यात घोळत राहिलं.
देवाधर्माची भीती, समाजापासून भीती, पालकांपासून भीती, वगैरे किती विविध धाक आणि भीतींमधून  तरुणपिढी जात असते? त्यातून पळवाटा काढायला काय काय उपाय करते आणि हेच उपाय अंगवळणी पडता, कुठकुठल्या ढोंगीपणाला नकळतपणे आत्मसात करते ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठलीही पळवाट न काढता दडपणाखाली जगणारे पुढे, मनाची समजूत घालून, आहे तेच स्वीकारून भीतीपासूनच भीऊन जगताना दिसतात. हे सारं आपल्या भोवताली घडत असतं. ते आपण स्वीकारलेलं असतं किंवा त्याकडे दुर्लक्ष करायची आपल्याला सवय झालेली असते. 

ज्या ज्या समाजाला आचार-विचारांच्या चौकटी असतात त्या त्या समाजात ढोंगीपणा अगदी स्वाभाविकपणे सहज पसरतो.  स्वैराचाराची मर्यादा हे स्वतंत्रतेचे दुसरे टोक. ते कोणीही ओलांडू नये. पण, मुक्तपणे बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक संचार करायच्या तरुण वयात स्वातंत्र्य गमावणे हे समाजासाठी घातकच.
एकाद्या गोष्टी बाबत धाक घालणे- ज्याला प्री-कंडिशनिंग म्हणणे इष्ट, हे बहुधा लहानपणापासूनच केलेलं असतं. त्याच दडपणाच्या भीतीखाली मनुष्य घडत गेला की पळवाटा शोधत किंवा स्वतःच्या भ्रामक समजूता घालत ढोंगीपणाचा आपोआप जन्म होतो.
उदाहरणार्थ-  चोरून खाणं आणि चोरून वागणं हे ढोंगीपणाचं लक्षण. इथे चोरी हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे. "कोणीही जन्मजात चोर नसतो. परिस्थिती चोर निर्माण करते," हे विधान देखील आपल्या विषयाला समांतर जाणारंच. 
अशी आणिक कितीतरी  उदाहरणं तपशीलवार देता येतील. ती विस्तारभयाने टाळणे इष्ट समजतो. सुनीताबाईंच्या ह्या विधानावर आपणही मुक्तपणे विचार करावा म्हणून पुन्हा वाक्य लिहीतो-
 
"भित्र्या तारुण्यातून ढोंगी समाज निर्माण होतो."