सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

स्वप्न गोजिरे असे जगावे

सरळ दक्षिणेकडे जातांना रस्ते डावी वळणं घेऊ लागले. वेगवान वारे वेग अवरोधू लागले.  तस्तसं जाणवू लागलं,
आता रस्ता संपणार, जमीन संपणार... आणि समोर उरणार अथांग पसरलेला सागर, महासागर. पुढे काय? दाटून आली एक खिन्नता रस्ता संपण्याची. एक शांतता, रोहतांगच्या पलिकडल्या झिंग झिंग बार पासून, गूगल वर न दिसणाऱ्या पत्थरी ज्योत पासून दक्षिणेकडील प्रवास पूर्णतेची, शांतता! डोळे शोधू लागले तीन लाटा, तीन दिशेकडच्या- या भूमीचे पाय धूणाऱ्या; शोधू लागले एक चेहरा स्फूर्तिदायी, या प्रवासाला, विवेकाचा, आनंदी, मानवांमध्ये इंद्र ठरलेल्या नरेंद्राचा, योध्या संन्याश्याचा, स्वामी विवेकानंदांचा!
त्या उन्हात, वाऱ्यांचा आघात सहन करणाऱ्या नारळीच्या झापांचा आवाज ऐकणाऱ्या घामट्ट शरीरावर उभे राहणारे रोमांच बरंच बोलत होते. मी कन्याकुमारीत पोहचलो होतो. स्वप्न जगत होतो. या प्रवासा बरोबर स्वप्न जगायला शिकलो होतो.

"स्वप्न जगणं" किती पुस्तकी वाटतात ना हे शब्द? धनलालसेत न अडकलेली स्वप्न जगता येऊच शकतात. किंबहुना ती जगण्यासाठीच बघायची असतात. याची आता खात्री पटली आहे. पैसा कितीही कमावला तरी तो कमीच पडतो. पैश्याची स्वप्न पूर्ण झाली तरी त्यात संतुष्टी नाही. म्हणून ही धनलालसा नसण्याची अट!
कुवारबाव ते रत्नागिरीचा चढ उतार सायकलने पार करायचाय, भाट्ये समुद्र, आरे वारे मार्ग, पावस, गोवा आणि आताचे कन्याकुमारी! अगदी लहानपणापासून बघितलेली, बोलून दाखवलेली, बरीचशी चर्चिलेली स्वप्न. जगलो.
संकल्पच असे करावेत की स्वप्न जगता यायला हवीत. स्वप्नच अशी बघावित की त्यातून देशहिताचे काम घडू शकेल. हे कुठेतरी प्रबोधिनीने शिकवलं.
काम केलं की सोयी होत जातील. असा विश्वास गीतेने दिला.
जाणतेपण ते झपाटलेपण ही मालिका प्रवासात निवांत वेळ मिळाला की बघत होतो. स्वप्न जगणारा मी एकटाच नाही हे समजलं. सगळेच स्वप्न का जगू शकत नाहीत? असा प्रश्न बरेचदा पडला  प्रबोधन गीतातलेच काही शब्द बदलले, ते असे-

संकल्पांनी बळ मिळवावे
संकल्पांनी बळीष्ठ व्हावे
उघड्या डोळ्यांनी हे दुर्लभ
स्वप्न गोजिरे असे जगावे

आजवरीचे स्वप्नद्रष्टे
धनचिंतेने रात्री निजले
नको तयांचे शब्द ऐकूनि
नकारांनी स्वप्न निजविले
स्वप्न जयांचे ध्येय झाले
स्वप्ननिष्ठ संकल्पचि केले
उघड्या डोळ्यांनी ते दुर्लभ
स्वप्न साजिरे जगते झाले

संकल्पांनी बळ मिळवावे
संकल्पांनी बळीष्ठ व्हावे

ख्रिस्ती नववर्षा निमित्त सगळेच नवीन संकल्प करतील. अगदी आदर्श वगैरे. त्यातले किती स्वतःच्या स्वप्नांकडे घेऊन जाणारे असतील? किंबहुना स्वप्नांवर विचार केलाय का कधी? परीक्षा पास होण्याची पराधीन स्वप्न बघण्यापेक्षा एखाद्याला सहज शिकवता येईल इतके विषयग्रहण पक्के करण्याचे स्वप्न किंवा  संकल्प करून बघा, मार्कांची आसक्ती दूर होते.
हे प्रवचन देण्यासाठी एक किस्सा घडला. योगायोग, नियती, मक्तूब, सगळंच!
डाॅ. गौरी माहूलीकरांची भेट.
नाताळ्याच्या सुट्टीच्या काळात केरळात पोहचलो होतो.शाळा-महाविद्यालये बंद. कामाशिवाय नुस्ती सायकल चालवून कन्याकुमारीला पोहचण्याची इच्छा सोडल्यास बाकी काहीच प्रेरक नाही. कोची जवळ चिन्मय विश्वविद्यापीठ असल्याचं समजलं. माहूलीकर मॅडम कुलगुरू असल्याचं ऐकलं. म्हटलं जाऊन, बघून तर येऊया. कोचीहून निघत गूगलबाबाच्या मार्गदर्शनाखाली पेप्पथी(उच्चारण-पेबदी) गाव गाठलं. विश्वविद्यापीठापाशी पोहचलो. वेदांत्यांचे विद्यापीठ. समोर इमारत दिसत होती. पण भला मोठा वळसा घालत, जरासं चुकत, मुख्य दारापाशी पोहचलो. माहूलीकर मॅडमचा कुठलाही संपर्क नव्हता. मी मिळवण्याचा प्रयत्नही केला नव्हता. मुंबईहून आलोय. माहूलीकर बाईंना, मा. कुलगुरूंना भेटायचंय. असं सांगत त्यांच्या खोलीत प्रवेश मिळवला.
त्यांना माझी ओळख ठेवण्याचं कारणही नव्हतं. त्यांनी सहा वर्षांपूर्वी, मी स्नातकाच्या शेवटच्या वर्षाला शिकत असतांना एकदाच माझ्याशी संवाद साधला होता. मुंबई विद्यापीठाची रामटेकला अभ्याससहल गेली होती. आषाढाच्या पहिल्या दिवशी राज्यस्तरीय चर्चासत्र तिथे आयोजित केलं होतं. मी पहिल्यांदाच रामटेक बघत होतो. मेघदूताचं रामटेक! स्वप्न बघायची एकही संधी सोडत नाही ही जागा आणि मेघदूत. तीन दिवसांपैकी एका रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्यांनी माझी चौकशी केली होती. पुढे काय करणार म्हणून!
मी त्यांच्या खोलीत प्रवेश घेतला. आणि हा संपूर्ण प्रसंग सांगितला. मेघदूताच्या मार्गाने प्रवास सुरू केला होता हे सांगितलं. नंतर अभिमानाची गोष्ट एकच होती की, नव्याने ओळख झालेल्या या गंधार बरोबर फिरत कुलगुरूंनी संपूर्ण विद्यापीठ दाखवलं. शंकराचार्यांचं जन्मस्थान आणि घर दाखवलं. जेवणही केलं. अजूनही तो मी नव्हेच असं वाटतंय.
चिन्मय विद्यापीठ भारतातल्या मोजक्या पाच भारतीय प्रयोगशील विद्यापीठांपैकी एक आहे. माझे अनुभव सांगतांना अभ्यासाचा दृष्टीकोन, त्याचा शैक्षणिकस्तरावर होणारा परिणाम आणि वेदांत हा विषय सोडू शकलो नाही. चंगळवादाकडे झुकणारी वाढती वृत्ती बघतांना विवेकानंद आठवत होते. जगापर्यंत वेदांत पोहचवायला सांगणारे. आपण आपल्या शिक्षणात किती विचार करतो वेदांताचा? गुणात्मक विकास सोडून गणनात्मक विकासाकडे सहज प्रवृत्ती असते. सगळ्यांचीच!
आपल्या संकल्पामध्ये गुण आणि गणन यांचा योग साधता यायला हवा. जगायला पैसा आवश्यक असला तरी पैसा म्हणजेच सर्वकाही नाही आणि पैश्या शिवायही जगता येणार नाही. मग पैसा किती असायला हवा? यातला योग साधता आला की, कुठेतरी दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांच्या सारखं समाधानी आयुष्य जगता येतं. माझी काहीच ओळख नसतांना आनंदाने पाहूणचार करणारी जागा लहान असलेली पण मनाची दारं खुली असलेली घरं उभी राहतात. नाहीतर मोठी, रिकामी, दारं बंद असलेली घरं भारतात कमी निर्माण झालेली नाहीत.
असो,
सायकलवरून कन्याकुमारी बघायची स्वप्न अनेकांनी बघितली आहेत. त्यांना ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शुभेच्छा देतो आहे.
माझ्या मनातली शांतता आणि खिन्नता उगवत्या सूर्या बरोबर मावळली नसती तर नवलंच. पूर्व बोलावतेय. पूर्वांचल बोलावतोय, उगवत्या सूर्याची भूमी बोलावतेय...
कन्याकुमारी, 1/1/2019

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

पुनश्चारम्भ

दिवस 175, 22 डिसेंबर 2018
बंडीपूर, 76 कि.मी.

पुनश्चारम्भ

काहीच लिहू नये असं वाटतंय... कारण सविस्तर लाहीणं म्हटलं की घटनांचा बारकाईने विचार करावा लागतो. आज तसा करणं व्यर्थ वाटतंय.
मैसूरु मध्ये लांबवलेला निवास गीतेच्या विचारांनी सुरू झाला होता आणि गीतेच्या विचारांनी संपला. "नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे..."
कधी कुठे कशी राहण्याची व्यवस्था होईल याची कसलीही निश्चिती नसते. कुणाच्यातरी घरी राहणं म्हटलं आणि यजमानच खुलत नसेल तर  आपणही किती बिंधास्त व्हावं यावर मर्यादा येतात. तर कधी कधी भाषा प्रांत कसलंच बंधन आड येत नाही. अगदी खुलेपणाने आनंदाने आपुलकीची भाषा अनुभवता येते.
केंद्र सरकारच्या भारतीय भाषा संस्थानाला भेट दिली. त्या दिवशी संचालक रजेवर होते. सहनिर्देशकांना (उपसंचालक) भेटलो तेव्हा त्यांनी संचालकांना भेटण्याचा आग्रह धरला. झोकून देऊन भाषांसाठी काम करणारी सगळीच मंडळी.

गीताजयंतीची तिथी होती. संस्थेच्या आंतरराष्ट्रीय अतिथिगृहात आलिशान निवास व्यवस्था उपसंचालकांनी केली होती... सुरक्षा रक्षकाने अतिथिगृहाच्या मुख्य दारापासून शंभर-दीडशे मीटर दूरच सायकल उभी करायची खूण केली. सवयी प्रमाणे चष्म्याच्या डब्यात वेगमापक ठेऊन चेनने बंद होणाऱ्या सायकल समोरील खोक्यात ठेवला. इमारतीच्या वर कॅमेरे वगैरे लावलेले दिसत होते आणि सुरक्षा रक्षक येण्या जाणाऱ्याला त्रास देतोय हे बघून मनात कुठलाही नकारात्मक विचार न घेता तिथूनच चार नग सामान उचलून आधी आत आणि नोंद वगैरे झाल्यावर वर पहिल्या मजल्यावर घेऊन गेलो.
एखादे ठिकणी पाकीट ठेवले असेल आणि सातत्याने ती जागा न्याहाळत बसलो तर आणखीन चार लोकांचे त्या जागेकडे लक्ष जाणारंच. या न्यायाने उगाच सायकल कडे फिरकून काही व्यवस्थित आहे का हे तपासायचे वगैरे टाळले. याच न्यायाने आजवर गोप्रो कॅमेरा वगैरे अगदी सुरक्षित राहिलेत. गावात अगर मंदीरात रात्रभरात सायकलवरचं सामान कधी कोणीही उघडून बघितलेलं नाही. आज काहीतरी वेगळं अनुभवणार होतो. सायकलवरचे दोन ताणदार दोर (बंजी काॅर्ड्स); राजस्थान मध्ये अश्वशक्तिधारी दुचाकीच्या धडकेत बॅग तुटल्यामुळे या दोरांचा वापर अनिवार्य झाला होता. ते ताणदार दोर जागेवर नव्हते. कुणी गरजू माझी गरज न समजल्याने घेऊन गेला असेल. डोक्याला फार त्रास न करता बॅगेतून दुसरा ताणदार दोर काढला. एकदम लक्षात आलं. सायकलस्वाराच्या गरजा न समजणाऱ्याला वेगमापका विषयी काही जाण असण्याची काय खात्री? ते एक घड्याळ आहे असं समजून ते गायब झालं होतं. 9250 कि.मी. पेक्षा जास्त अंतर पार केलंय म्हणणाऱ्या मला  शेवटचा बघितलेला 9268 कि.मी.चा आकडा आठवला. बॅग उपसून बघतांना आणि पुन्हा खोली तपासतांना तो आकडा सोडून द्यावा लागेल यासाठी मन तयारी करत होतं.
अनेक स्वप्न जगतांना आत्ता आत्ता बघितलेलं मुल्यवान चार शून्य बघायचं स्वप्न आता राहून जाणार होतं. जगाला दाखवणारा रेकाॅर्ड वगैरे करायला हा प्रवास सुरू झाला नव्हता. त्यामुळे कुठलाही संकल्प वगैरे मोडला नव्हता. अहंकाराला पोषण देणारे अंक मात्र सुटले होते.
त्यामुळे फार विचार न करता निघूया असं ठरवलं. पण, हे सगळं बघणारे आणि त्यांच्या जीवाला लागलेले मित्र बरोबर होते.
भाषांतर शास्त्राचा अभ्यास करायला आलेला सोमय्या महाविद्यालयातला मित्र नयन आणि कालच नवीन ओळख झालेले त्रिपुराहून आलेले जयकुशल आणि वाराणसीहून आलेला शिवम्... लेखी नोंद झाल्या शिवाय मी जाऊ नये यावर ते ठाम होते. गेलेलं परत मिळणार नाहीये मग वेळ घालवून मी ठरवलेल्या आजच्या स्थळाला, बंडीपूरला पहचू शकणार नाही म्हणून घालमेल होत होती. 10,000 चा आकडा बघू शकणार नव्हतो तर निदान ख्रिस्ती वर्ष संपतांना दक्षिणतम तटाला, पोहचण्याचे तरी साधूया म्हणून निघण्याच्या मनःस्थितीत होतो. तर दुसरीकडे नोंद नीट ठेवायला हवी म्हणून दुसरं मन सांगत होतं. शनिवार-रविवारची सुट्टी बघता अधिकारी वर्ग तर भेटू शकणार नव्हता. पत्र लिहीलं. नयनने सगळी जबाबदारी स्वीकारली होती. पत्र अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवायचं. वेगमापक जरी नाही मिळालं तरी एक हमी पत्र मिळवायचं वगैरे.  आपल्यासाठी या मित्रांचा उत्साह बघितला की, "केन रत्नमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम्" हे वाक्य सहज आठवून जातं.
माझा प्रवास सुरू झाला.

"नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे" वगैरे शब्द आठवत होते. त्या आलीशान खोलीत गेल्यावर माझ्यासाठी आवश्यक असणारे स्वच्छ संडास-स्नानगृह,  कपडे वाळवायला पंखा, दाढी करायला आरसा सोडल्यास बाकी सगळ चैनीसाठी किंवा अनावश्यक होतं. चैनीसाठी गरम पाण्याची सोय, टि.व्ही-सोफासेट वगैरे बैठकीची खोली, गॅलरी  अश्या काही अनावश्यक सुविधा होत्या. मन हळवं होत होतं ते खरं तर पुढच्या शब्दांनी, "गीताई आई माझी, मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घेई उचलूनि कडेवरी..." डीकॅथलाॅन मधून नवीन वेगमापक आणि ताणदारदोरीचा जोड घेतला.
मैसूरु सोडले. आराम महागात पडला होता असं वाटत होतं. दत्त पौर्णिमेची तिथी होती. दक्षिणधृवाकडून मकर संक्रमण सुरू होण्याचा दिवस होता. तसा मूहुर्तंच! दत्त म्हणजे दिलेला. दा धातूचे क.भू.धा.वि. रूप. मागच्या वर्षी गिरनार चढतांना. "दत्तं दत्तं किं दत्तम्?" असा प्रश्न स्वतःला विचारत होतो. आज त्या प्रश्नाचं एक भौतिक उत्तर मिळालं होतं. उत्तर मिळालं की समाधान झालंच पाहिजे, नाही का?

बंडीपूरच्या वेशी पाशी मुरारजी देसाई निवासी शाळा आहे. इथे विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आणि निवासाची व्यवस्था करविली.

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

नारळाख्यान

12 नोव्हेंबर 2018, सह्याद्री
नारळाख्यान
हल्ली मला मी भूगोलही छान शिकवू शकीन असं वाटू लागलंय. कर्कवृत्त ओलांडल्यापासून आम्ही शाळेत केलेला अभ्यास मला जागोजागी आठवतोय. शाळेत असतांना मी एकट्याने कधी अभ्यास केलाच नाही. सयुरी आणि मी एकत्रच अभ्यास करत असल्याने 'आम्ही' शब्द वापरला. त्यातही मला वाचनाचा कंटाळा येत असल्याने तिने वाचावे आणि मी पाय पसरवून श्रवणभक्ती करावी ही माझ्या अभ्यासाची 'पद्धत'.
शेती, माती, दगडांचे प्रकार, वातावरण, झाडं-झुडूपं, खनिज, स्थळवैशिष्ट्ये हे सगळं, इंग्रजीत आठवंत असतं. मग याला मराठीत काय शब्द असावेत असा विचार होतो. Gulf ला आखात म्हणतात हे समजायला मराठी माध्यमात शिकलेल्या शशांकला gulf म्हणजे काअंबयय हे वर्णन करून सांगावं लागलं. मग त्याला खंबातचे 'आखात' आठवले. आणि मला आखात हा मराठी शब्द मिळाला. 'आखातीदेश' या शब्दाचा अर्थ लागला. Metamorphic rocks, Fold mountains, arid climate वगैरे शब्दांसाठी मराठी शब्द मराठीतलं भूगोलाचं पुस्तक वाचल्या शिवाय नाही समजणार. कधी अश्या शब्दांवर अडलो की स्वतःला, इंग्रजी माध्यमात शिकलेला मीच तो दुर्दैवी असल्यासारखं वाटतं.
असो, या नारळाच्या आख्यानात भूगोलाचे कसले कौतूक?
तर,
नारळाची झाडं बघून झालेला आनंद वेगळाच आहे. वास्तविक नारळाचे झाड बघून आनंद कसला व्हायचा? हा प्रश्न पडणे अगदीच साहजिक आहे. पण मी एका वेगळ्या ग्रहावर गेलो होतो. जिथे लोकं, "तुमच्याकडे नारळाची झाडं असतात ना? नारळ खूप स्वस्त मिळतात ना?" असे प्रश्न फार कुतूहलतेने विचारंत!
कुतूहल, नारळाचे. ऊंचच ऊंच जाणाऱ्या माडांचे. समुद्र किनाऱ्यापासून आपण पूर्व दिशेकडे दूर जाऊ लागलो की नारळ कमी होत जातात आणि नंतर दिसेनाशी होतात.
माझ्या आजीने ज्याप्रमाणे खान्देशात नारळाचं झाड लावलं. ते फळतंही झालं. तसं एखाद दुसरं झाड उत्तरेकडच्या प्रवासात कर्कवृत्त ओलांडेपर्यंत दिसतंही. कर्कवृत्त ओलांडल्यावर मात्र नारळ दिसणे दूरापास्त होते. एखादे ठिकाणी मलईरहित शाहाळ्याचे पाणी 200मि.ली. ₹40ला वगैरे बंद बाटलीत मिळते. नाहीतर नारळ हे फळ देवाला चढवायला वापरतात म्हणून काही मंदीरांबाहेर मात्र तेवढे आवर्जून दिसते.
आजीने खान्देशात नारळाचं झाड लावायला डोंबिवलीतल्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या निरळाला कोंब आल्याचं निमित्त होतं.
जळगाव जिल्ह्यातलं एरंडोल तालुक्यातलं फरकांडे नामक खेडे गाव आमच्या कुळाचं गाव असल्याने तसा मी खान्देशी. जेवणात तीळ आणि दाणे खास. खोबरं वापरलंच तर सुकं.
जमीन वाचवायला आजोबा नोकरी सोडून गावी परतले. शेतकरी झाले. कुळ कायदा आल्याबरोबर अनेकांची असल्यासारखीच ही कथा. दोन आत्या, तीन काका आणि बाबांच्या शिक्षणासाठी  एरंडोलला भाड्याची घरं बदलंत राहीले. त्या गरीबीत फरकांड्यात असलेला कुळकर्ण्यांचा वाडा डागडुजी अभावी पडला. सगळ्यांची शिक्षणं संपली. काही शेती विकून आत्यांची लग्न झाली. शेतापासून सहा कि.मी अंतरावर असलेल्या कासोद्याला उतरत्या वयात घर बांधलं गेलं. कासोद्याला रहायला आले. आजोबा गेले. आजी आमच्याकडे रहायला आली. पूजेतल्या नारळाला कोंब आल्यावर कासोद्याला घेऊन जाऊन आजीने ते रोप लावलं. कासोद्याला मे महिन्यात मागच्या पंचवीस वर्षांपासून दर पंचवीस दिवसांनंतर पाणी येतं. पाच सहा किलोमीटर दूर असलेल्या विहीरीतून पाणी आणावं लागतं. त्यातही ते झाड फळतं झालं. त्या गावातलं एकमेव नारळीचं झाड! तालुक्यातलंच असावं. काका गेला. कासोद्याशी संपर्क सुटला. नारळाच्या झापांचा त्रास होतो म्हणून शेजारच्यांनी ते तोडायची मागणी केली असल्याचं कानावर आलं. पुढे काय झालं ते माहीत नाही.
माझं दुसरं गाव मे महिन्यातलं सगळ्यांचच आवडतं, माझं आजोळ. झुकू झुकू अगीन गाडीने पळती झाडं आणि बोगदे मागे टाकत पोहोचण्यासाठीचं फणस-पोफळी, रातांबी, आंबे आणि माडांचं माहेरघर- रत्नागिरी. उकडीचे मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या आणि जेवण ओल्या खोबऱ्याखेरीज अपूर्ण!
आमच्या सोसायटीत डझनभर नारळाची झाडं आहेत. ती फळती झाल्याने काही घरांत कुरकूर सुरू झालीये एवढंच! जन्म, मामा बोरीवलीत राहत असल्याने मुंबईचा बाकी सगळंच डोंबिवलीचं असल्याने आणि मुंबई व डोंबिवली कोकणाचाच भाग असल्याने तसा मी कोकणस्थ! (कुठल्याही जातीशी संबंध नाही!)
अश्या या नारळाशी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असलेला मी तीन महिने या झाडापासून दूर राहिलो. नारळी पौर्णिमेला coconut chocolate देखील दुकानात दिसले नाही. तेव्हा मी हिमाचलात होतो. आणि दक्षिणेच्या प्रवासात, राजस्थानचे वाळवंट ओलांडून
गुजरातेत थारद या गावी पोहचलो. तेव्हा नारळाचा मागमूसही नव्हता. काही किलोमीटर दक्षिणेकडे आलो. कर्कवृत्त ओलांडून भुजजवळ येताच  नारळीच्या झाडांनी दर्शन दिले. सौराष्ट्रात नारळीच्या बागा दिसल्यावर झालेला आनंद एखादे दुपारचे जेवण मनसोक्त शहाळ्याचे पाणी पिऊन आणि मलाई खाऊन व्यक्त केला.
सौराष्ट्रात दाण्याच्या शेतांवरचे बांध काही ठिकाणी नारळीच्या झांडांनी घातलेले दिसले. खान्देश आणि कोंकण एकाच ठिकाणी आल्यासारखं वाटलं... मग नारळ दिसत गेले. नर्मदा ओलांडली. खाड्या ओलांडल्या. बोर्डीला आलो तसे पश्चिमेचे हिरवेगार घाट दर्शन देऊ लागले.
पुढचा प्रवास कन्याकुमारीच्या दिशेने आहे. हिमाचलातल्या वळणदार न संपणाऱ्या चढ-उतारांनंतर आता पुन्हा एकदा घाट, सह्याद्रीतले. हिमालय एके ठिकाणी असह्य झाला होता. सह्याद्री नावानीशी सुसह्य आहे. हे लिहीण्यासाठीही मी सह्याद्रीच्याच कुशीत बसलोय. सायकल दुरुस्तीसाठी डोंबिवलीत ठेऊन दिवाळीच्या सुट्टीत या सह्याद्रीच्या कुशीत आलोय...
रत्नागिरी बोलवतंय, कोकण बोलवतोय, सोमनाथी भेटलेला अरबी समुद्र तेव्हापासूनच महासागराची हाक ऐकवतोय... लस्सीत मिसळायला शहाळ्याचं पाणीही केरळात वाट बघतंय.

बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

सीमोल्लंघन मनाचे

दसरा, शके 1940

मी रोज सीमोल्लंघन करतोय. आजचा दिवस या एका शब्दासाठी विशेष आहे. गाठोडं शब्दांमध्ये जरासं मोकळं सोडतोय.
घराचे, शहराचे सीमोल्लंघन सायकलबरोबर शरीराने तर केले. मनाचे काय? पाऊस कोसळावा तश्या घराच्या, आप्तांच्या, मित्रांच्या, शहराच्या आठवणी कोसळत. ज्येष्ठाच्या पावसात माती चिंब भिजावी तसे मन भिजत. रोज सकाळी निघतांना बांध फुटत. आषाढा सारखा पाऊस लागला की कोण सावरू शके पाण्याला? स्थळांची, माणसांची, प्रसंगांची दृष्य थेंबांसारखी झरत. बाबांचा वाढलेला बी.पी., आईचे बोलके डोळे आठवत.
कित्येकदा फक्त गाणंच ऐकतो,
मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद!
पण प्रत्यक्षात हळवं असलेलं/झालेलं मन खंबीर कसं करावं सुचे ना.

घरी फोन करूयात. रडणं ऐकून त्यांचा बि.पी वाढेल. गाडी घेऊन घरी घेऊन जायला येतील.- बाबांनी त्यांचा भयंकर प्लॅन सांगितलेला होताच! "कुठेही काहीही प्राॅब्लेम आला तर मी आणि दत्तू काका फोअर व्हीलर घेऊन येऊ. तसं आमचं ठरलंय." ही काळजी आठवली की अजूनही डोळ्यात पाणी येतं. पत्र दिल्यावर आई बाबांना म्हणाली, "आपण न लावायचा नाहीये." 

"गंधार तू एकटा भारत भ्रमणाला निघत असलास तरी संपूर्ण भारत तुझ्याबरोबर असेल." सगळ्यात आधी श्रुती काकूंसमोर  ठेवलेला विचार आणि चर्चा झाल्यावर घरातून निघतांना काकूंचं हे वाक्य. ही सगळी वाक्य कानावर पडायची. अंगावर यायची. तेव्हा झालेला परामर्शातील ध्वनि-शब्दार्थ स्फोट आता नाही वर्णू शकत. शब्दनित्यत्व अनुभवलं.(माफ करा फार जास्त तान्त्रिक झालं)

सचिनदादाला देखील असंच झालं असेल का? त्यांना फोन करूयात. नाही, नको. त्यांचे अनुभव माझ्या पेक्षा वेगळे असतील. त्यांनी माझ्यापेक्षा जास्त तयारी केली असेल. मानस्शास्त्रज्ञांबरोबर सेटींग्स वगैरे घेतल्या असतील, निघण्या अगोदरच!

आपणही मानस्शात्रज्ञाची मदत घेतली तर? ठरवलं. फोन केला. अमरावती ते नागपूरचा रस्ता. पाऊस पडत होता. फोनवर ओळखीचा आवाज. कुतूहलाने अधिकच आनंदलेला. चार पाच कुतूहलाची प्रश्न उत्तरं. "मी उद्या फोन करतो. जरा महत्वाचं बोलायचंय. तुझी मदत हवी आहे  एक मानस्शास्त्रज्ञा म्हणून."
खूप धीर लागतो कोणाशीतरी मोकळेपणे बोलायला. नंतर आम्ही दोन तीन वेळा बोललो. "जेव्हा वाटेल तेव्हा मुक्तपणे रड. आठवण येत असेल कोणाची तर  फोन करून व्यक्त हो. आणि आई बाबांच्या बाबतीत तू असा विचार कर की तुझ्या बरोबर तेही खंबीर होताच आहेत की." खरंच होतं आखलेल्या वाटेने न जाऊन वेगळ्या वाटेचा प्रवासी होण्याला त्यांनी खंबीर पणे उभं राहणं, "माझा मुलगा रस्त्यावर झोपणार नाही याची मी काळजी घेईन" असं म्हणणं, त्यांच्यासाठी मानसिक सीमोल्लंघनच होतं, आहे.
फार कमी मानस्शास्त्रज्ञांच्या सल्ल्यांकडे मी लक्ष देतो, हा दहावी पासूनचा माझा इतिहास आहे. त्यांच्या निर्णयांना-सल्ल्यांना कचऱ्याची पेटी दाखवत भाषेच्या अभ्यासाकडे वळलोय. पण आता मात्र मी स्वतःच तो पर्याय निवडल्याने आणि यंदाची मानस्शास्त्रज्ञा बहीण, मैत्रीण आणि होणारी वहिनी या सगळ्याच नात्यात मोडत असल्याने तिचा सल्ला ऐकला आणि खरंच काही दिवसांनी सीमोल्लंघन केल्यासारखं वाटलं.
प्रबोधिनीतच शिकलोय, "आमी बी घडलो तुमी बी घडा ना" आता प्रयोग करायची वेळ होती.

असाच एक कातर किस्सा-
हिमाचल मध्ये शिरून दुसरा का तिसरा दिवस होता. सुंदरनगर कडे जाणारा रस्ता. 16 कि.मी चा  घाट चढत होतो. कितीही उंच वळणं चढावीत. समोर येणारे हिमालयाचे कडे उंचच उंच दिसत होते. एक-दोन किलोमीटर नंतर पाऊस सुरू झाला. ऊन झेलून काळ्या पडलेल्या हिमालयाच्या कड्यांना कृष्ण मेघांनी झाकले तरी ढग त्यांहून पांढरेच दिसत.आणि एकदम वीज चमकत तेव्हा वैदिक देवतांची- इंद्राची, वरुणाची, रुद्राची आठवण करून देत. पुराणातला शिव शंकर हिमालयावर तांडव करतो ही कविकल्पना कशी सुचली असावी याचे प्रात्यक्षिक दिसे. वर चढता चढता पाऊस गार होऊ लागला. धुकं येऊन रस्ता दिसेनासा होई. अगदी माथेरानच्या दौऱ्या प्रमाणे. अगदी मागच्या वर्षीच्या 15 ऑगस्टच्या कसारा घाटातल्या राईड प्रमाणे. वळणा वळणावर माथेरान चढतांना रोहन माझा दादा कसा झाला होता हे आठवंत. भोरघाट चढतांना रचित-रोहन आणि मी अश्या तिघांच्या क्षमतांची केलेली  विभागणी आठवत. अश्या चढांवर कोणीतरी पुढे वाट बघत असेल तर अधिक उत्साह वाढेल असंही वाटून जाई.
वातावरणातली आर्द्रता मनात शिरली की बांध फुटायला ढगालाही वेळ घालवावा लागत नाही.  निर्माण झालेल्या ऊबेला जरासं शैत्य पाऊस पाडायला पुरून उरतं... आडवार होता दुपारची वेळ. सगळेच आपापल्या   काॅलेज मध्ये. कशाला फोन करावा? असं वाटूनही गेलं. पण राहावलं नाही. एक-दोनदा फोन केल्यावर जरा वेळाने रोहनचा फोन लागला. बरं वाटलं.

"माझी मुक्ती प्रकाशली या आकाशी..." (আমার মূক্তী আলোয আলোয এই আকাশে) असं बंगाली गाणं म्हणणं, ऐकणं फार सोपं असतं.
प्रत्यक्षात आपण एका सुशेगी जगात (comfort zone) रमलेलो असतो. आपल्या सगळ्या अहम्, न्यून वगैरे गंडांना पोसत असतो. त्यातून बाहेर पडणं हे पहिलं सीमोल्लंघन असतं.
ते बऱ्याच जणांनी केलं म्हणून आज 110व्या दिवशी गुजरातच्या भुज गावी पोहचू शकलोय. आई-बाबा आणि सयुरी भेटायला येणार आहेत. त्यांची वाट बघतोय.

सम्प्रिः।

ता.क.- मानस्शास्त्रज्ञेचे नाव नमूद केले नाहीये कारण मानस्शास्त्रज्ञाबरोबरचा संवाद नेहमीच गुप्त ठेवला जातो. ठेवायचा असतो. आयुर्वेदाचार्यां प्रमाणेच तिच्याही मी ऋणातंच राहीन...

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

भाषारत 12

दिवस 75, 13/9/2018
बाप्पा अंत पाहत होता!
या शिवभूमी म्हणवल्या जाणाऱ्या चंबा खोऱ्यात एकही गणपती मंदीर असू नये! मनाने स्वीकारलं. रूपहीन शब्दात्मक ब्रह्माची आराधना करावी. अथर्वशीर्षाची आवर्तनं सुरू झाली. त्यांना गणना नव्हती. खिंडी पर्यंत चढून उतरणे आणि दुसरी खिंड चढणे एवढेच काय ते रस्त्याचे स्वरूप होते. मधेच खचलेला रस्ता आणि पाण्यात वितळणारे डोंगर, एक भयाण नैसर्गिक वास्तव दाखवत होते. रस्त्यात दिसणारी लाल फुलं "रक्तपुष्पैः सुपूजितम्" म्हणत बाप्पाच्या मूर्तिची आठवण करून देत होती.
हजार एक मीटर ऊंचीवर पोहचलो होतो. पूर्वेकडील दरीचे दृष्य साफ दिसत होते. काकिरा नावाचं छोटसं खेडेगाव. बाहेरील माणसाला सरकारी विश्रामगृहाचाच तेवढा आसरा! खोली मिळाली. "काही नाही तर बाप्पाच्या वडीलांचे दर्शन घेऊ." मनाची समजूत घालणं सुरू होतं. उगाच मनाचे श्लोक म्हणण्याची इच्छा झाली. "मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे"
कसले धारिष्ठ्य नि कसले काय!
अंघोळ उरकून बाहेर आलो. गावात ढग शिरले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. रोजचच आहे! दिवसभर घामाने भिजवायचं आणि संध्याकाळी पाऊस. बसा खोलीतच!
तासाभरात सगळे निघून गेलेले होते. क्षितीजापर्यंत आभाळ खुले!
मंदीर शोधायला गावात फेरफटका मारला. शिवमंदीर वरच्या बाजूला असल्याचं समजलं. दुकानातून वस्तूही घ्यायच्या होत्याच. दुकानदाराकडे चौकशी केली. गणपती मंदीर नाहीये हे माहीत असूनही, "यहा पर कोई गणपतिमंदीर वगैरा है?" त्यानेही मी कुठून आलोय वगैरे विचारलं आणि खाली गणपति बसतो. आता आरती सुरू झाली असेल म्हणून सांगितलं. विकत घेण्यासाठी काढून ठेवलेलं सामान, "बादमे लेके जाता हूँ." म्हणत खाली गेलो. बाप्पाची मूर्ती बघून, "रूप पाहता लोचनी..." म्हणण्या जोगा आनंद झाला. शंकराची भजनं चालू होती.
शांत बसलो.
मन बेचैन होतं. घर, राधा नगर आणि समोर बसलेला बाप्पा!
वास्तविक चंबा हा एकमेव जिल्हा असा आहे की जिथे एका राजघराण्याचंच राज्य चाललं. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे इथे साजरे करावे लागलेच नाही. दोन वर्षांपूर्वीच ही सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केल्याचं समजलं. मुंबईचं अनुकरण करण्याचा प्रयत्न!

एका आरतीत आरती आटोपली! बाकी पुरुषसूक्त आणि वैदिक देवतांच्या मंत्रांनी संध्यावंदन करावे तसे विधि. मनात आलं 'नये है यह. अजून बरीच प्रॅक्टीस बाकी आहे.'
कसलीही भीड न बाळगता एकदा जोरात ओरडूया...
आवाज दिला... "गऽणपती बाप्पा मोरया, मंगऽऽल मूर्ती मोरया."  प्रतिसाद मिळाला.
चार पाच वेळा आवाज दिला. जीवात जीव आल्यासारखं वाटलं.
आता जरा बरं वाटतंय. बाप्पाने खरंच अंत पाहिला होता!
काल प्रथमेशशी बोलणं झालं. तसे आम्ही दोघे समदुःखी होतो. तो शिक्षणासाठी याच ऑगस्ट महिन्यात अमेरिकेला गेलाय. त्याचे शब्द आठवले, "एखाद वेळेस दिवाळी चालेल, गुढीपाडवा चालेल, पण यार गणपतीला घरी नाहीये. किती विचित्र वाटतंय! हट् यार!"