गुरुवार, १० जुलै, २०२५

चळवळीतले लेख - भाग २


20 जून
शाळेत हिंदी शिकवणे हा राजकीय कट आहे. हिंदी लादणे शिक्षणतज्ज्ञांच्या, भाषातज्ज्ञांच्या मता विरोधातले धोरण व राजकीय आचरण आहे...

मी गुरुदेव रविंद्रनाथ ठाकूरांना आपले गुरु मानतो. मानवाला मुक्तपणे घडायचे असेल, स्वतंत्र जगायचं असेल तर गुरुदेवांना वाचावं. पुलंचेही दैवत होते गुरुदेव.
मराठी आणि बंगालीचं विशेष भाषिक नातं आहे. जशी बंगाली तशीच आसामी. हिंदी न शिकता बंगाली किंवा आसामी शिकणं आपल्या घराला अधिक समृद्ध करेल.

कुठलीही भारतीय भाषा आत्मसात करायची गुरुकिल्ली म्हणजे संस्कृत. इतर सर्व भारतीय भाषांच्या व्याकरणावर इंग्रजी किंवा पाश्चात्य भाषेच्या व्याकरणाचा प्रभाव आहे. संस्कृतचे व्याकरण संपूर्ण भारतीय आहे. किंबहुना संस्कृतचे व्याकरण शिकून आपण इतर भारतीय भाषेचे व्याकरण आपण होऊन समजून घेऊ शकतो.
हिंदी ऐवजी संस्कृत शिकून साऱ्या भारतीय भाषांची दारं उघडता येतील तुमच्या घराला...

लिपीभेदामुळे दुरावलेली मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि तमीळ शिकायला सुरुवात केली की खरं तर भारतीय लिप्यांची एकसंधता समजतेच पण त्याबरोबर एका प्रवाहात नदी सारख्या वाहणाऱ्या भारतीय भाषांची एकात्मता आधिक ठळक जाणवते... 
हिंदी सारख्या उर्दू व इंग्रजीचे प्रभुत्व असलेल्या दुबळ्या भाषेपेक्षा ह्या भिन्नलिपीतील नवीन भाषा शिकून स्वतःच्या घराला समृद्ध करणे कधीही श्रेयस्कर, नाही का?

कोंकणी म्हणजे मराठीची बहीण. कोंकणीतली शब्द संपदा मराठीला समृद्ध करणारी आहे. घरात कोंकणी शिकून गोव्यासारखे सुशेगीवातावरण निर्माण करणे आपल्याच हातात आहे...

लहान मुलांना भाषे मधला फरक समजत नाही. शाळेसारखी अडाणी शिक्षणव्यवस्था मुलांच्या मनात भाषाभेद कोरून ठेवते. देवनागरी लिपी शिकून चार पाच भाषांची दारं आपोआपच उघडलेली असतात. रामरक्षा स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष वाचून पाठ करायला शाळेत संस्कृत शिकवण्याची गरज नव्हती. मराठी शिकून ते वाचत वाचत पाठ करता आलेच होते की...

बेअक्कल आणि अशिक्षित आंधळ्या संघकार्यकर्त्यांना भुलू नका. राजकीय पक्षांच्या स्वार्थी धोरणांना भुलू नका. 

भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वतःचे हिंदी न शिकता व्यवहारात कुशल होता येत असल्याच्या अनुभवातून सुजाण नागरिक बना. 
हिंदीला महाराष्ट्रातून हद्दपार करा. 

शाळेत हिंदी शिकून आपल्या पाल्याला हिंदी शिकवून मागास बनवू नका...

मराठी उत्तम करा. महाराष्ट्राला स्वतंत्र करा. महाराष्ट्रधर्म टिकवा.
जय मराठी.

-गंधार डोंबिवलीकर,
हल्ली मु. उदयपुर, राजस्थान

21 जून
लहान मुलांना भाषाभेद समजत नाही. कानावर पडणारे शब्द इतर अवयवांनी मिळणाऱ्या अनुभवांशी स्वाभाविकपणे जोडले जात मुलांमधील भाषा विकसित होत असते.

प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा म्हणून सर्वसामान्यपणे (by default) हिंदी लादल्यावर, कोवळ्या मुलांच्या मेंदूवर भाषाभेदाने हिंदीचा नकाशा (brain map) कसा बरं तयार होईल?

1. देवनागरी लिपीत अस्तित्वात असलेले ळ आणि ण ज्या भाषेत कटाक्षाने टाळले जाऊन, उच्चारण ल व न ने भ्रष्ट केले जाते ती भाषा म्हणजे हिंदी.
2. श व ष या दोन वर्णांतील उच्चारणात ज्या भाषेत भेद नाही ती भाषा म्हणजे हिंदी.
3. ऱ्हस्व-आदी दीर्घ-अंत हा नियम मराठीत असतो. तसा कुठलाही नियम नसलेली ऱ्हस्व दीर्घात गोंधळ निर्माण करायला लावणारी भाषा म्हणजे हिंदी.
4. ज्या वर्णाचं उच्चारण मराठीत द्न्य असे केले जाते त्याच वर्णाला ग्य म्हणून उच्चारायला लावणारी भाषा म्हणजे हिंदी.
5. नुक्ता का वापरला जातो हे सांगू न शकणारी भाषा म्हणजे हिंदी.
6. अनुस्वार आणि चंद्रबिंदूत गोंधळ निर्माण करणारी भाषा म्हणजे हिंदी
7. चौदाखडी न जुमानता इंग्रजी नावांना बाराखडीत बसवून इंग्रजीचे उच्चारण भ्रष्ट करायला लावते अशी भाषा म्हणजे हिंदी.
8. संस्कृतोद्भव शब्दांना ऊर्दूद्भव शब्द आणि इंग्रजी शब्दांचे स्वतंत्र देशी शब्द न बनवता देवनागरीकरण स्वीकारते ती भाषा म्हणजे हिंदी.

या अनुषंगाने 1996-97 साली मनावर कोरला गेलेला प्रासंगिक गोंधळ लिहायला आवडेल. मी तीन-चार वर्षांचा असीन. शेजारी कच्छी काकू राहत. सकाळी दहा-अकराच्या सुमारास दाराशी कलिंगडवाला आल्यावर माझ्या काकूने आणि शेजारच्या काकूंनी एकत्र कलिंगड विकत घेतले. दुपारी दोन-तीनची वेळ असेल. जेवणं होऊन वामकुक्षीही झाली होती. संध्याकाळ व्हायला वेळ होता. शेजारच्या काकू, "काकू आहे क्या? कलिंगड खाया? कलिंगड मीठा होते ने?" म्हणून माझ्याशी मोडक्या हिंदीत बोलल्या. मागून माझी काकू आली. तिने मान डोलवत "हा अच्छा मीठा था" म्हणून उत्तर दिलं.
"मीठा!" कलिंगड मीठा कसं असेल? माझ्या काकूने दिलेल्या उत्तराने मी अधिकच पेचात पडलो. आपण तर कलिंगडावर मीठ टाकले नव्हते. मग कलिंगड मीठा कसं असेल? मी त्या प्रश्नाने बेचैन झालो होतो. काकूला मी विचारलेला प्रश्न समजेना आणि मीठा म्हणजे गोड कसं हे मला समजेना.

पाचवी ते सातवी शाळेत सक्तीने हिंदी शिकवली गेली. हा प्रश्न काही तेव्हाही सुटला नव्हता. एम ए करत असतांना ट्रेनच्या प्रवासात मीठ आणि मीठा यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचा साक्षात्कार झाला. साधारणपणे दोन दशकं त्या प्रश्नाची गाठ मनात आडकून बसली होती.  
मी इंग्रजी माध्यमात शिकल्याने अश्या कित्येक गाठी बांधल्या गेल्या असतील याला काही तोड नाही. काळा बरोबर काही सुटल्या काही सुटण्याचे साक्षात्कार होत असतात.

भारत फिरत असतांना हिंदी शिकवणाऱ्यांचे विदारक चित्र दिसलं. शिक्षकांनाच देवनागरीचे उच्चारण येत नसल्याने भयानक हिंदी शिकवली जात आसल्याचं समोर आलं. तर, कुठेतरी शब्दसंपदाच उपलब्ध नसल्याने इंग्रजी शब्दांचे देनागरी लिप्यंतरण करून हिंदी वाक्य बनवली जात असल्याचे चित्र दिसले. हिंदी वर्तमानपत्रांमधील दयनीय भाषा हे जीवंत उदाहरण आहे हिंदीच्या गुणवत्तेचे.

भारतीय भाषेचा अभ्यासक म्हणून एकच अधोरेखित करू इच्छितो,
प्राथमिक शिक्षणात तिसऱ्या भाषेची सक्ती आणि त्यातही हिंदीची सक्ती मुलांसाठी घातक आहे. 

एक देश एक भाषा - हा भुरसटलेला पाश्चात्य विचार जेव्हा तुम्ही सोडून द्याल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने भारतीय व्हाल.

कारण, ही माझी भाषा आहे; ही त्याची भाषा आहे पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा साऱ्या भारतीय भाषा माझ्या आहेत इथवर येऊन पोहचतो तेव्हा मी खरा भारतीय असतो. 
ऐका म्हणजे ऐकले जाल!

-गंधार डोंबिवलीकर,
हल्ली मु. उदयपुर, राजस्थान

22 जून
परवाच्या फेसबूक लेखात भारतीय भाषांचं गुणगान गायलं. 
नंतर वाटलं कशासाठी? 

ह्या भाषांच्या राजकीय कूरघोडींना पाठिंबा द्यायला? छे! आपला प्रवाह भाषारत सायकलोपासना Cyclopasana मुळे वेगळा घडलाय, आपण घडवलाय म्हणून आपण भारतीय भाषांचं गुणगान गाऊ शकतो.
ज्यांचे मार्ग राजकारणी आखत आहेत ते रस्ता चुकतायंत हे स्पष्ट दिसतंय. त्यांची वाटचाल लाचारी, मुजोरी, चाकरी करणारा समाज घडवणारी आहे!

प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा?
मी, एक भाषा अभ्यासक म्हणून मला विचाराल तर, प्राथमिक स्तरावर (वयाच्या आठ वर्षांपर्यंत) दुसरी भाषा शिकण्याचीही गरज नाही. हा काळखंड मुक्त संचाराचा. शरीराला वळण लावण्याचा. लेखणी धरण्यासाठी, चित्र ओळखण्यासाठी, शब्द ऐकण्यासाठी, पर्यावरण न्याहाळण्यासाठी. काही साचे निर्माण करण्यासाठी. म्हणजे, रंगातला भेद, आकारातला भेद, स्पर्शातला भेद, आवाजातला भेद, चवीतला भेद, इत्यादी...
सात पदार्थ आणि चोवीस गुणांचे साचे तयार झाले की मग सुरू होतो अनुभवांचे वर्गीकरण करायचा प्रवास. किंबहूना प्रत्येक साच्याच्या आकलनासहित हा प्रवास सुरू झालेलाच असतो. अनुभवांच्या आधारे प्रत्येक साच्यातील समृद्धी वाढत असते.

हा सारा साच्यांचा प्रपंच कशासाठी? 
लहान मुलांच्या मनात भाषाभेदाचा साचा निर्माण करायची आवश्यकता असते का? हे जाणण्यासाठी. याचं सरळ उत्तर नाही असं आहे. म्हणून प्राथमिक स्तरावर एकच भाषा म्हणजे मातृभाषाच शिकवली जायला हवी. 
का? 
"संस्कृत मराठीपासून वेगळी भाषा आहे. ती कठीण असते हं. तीत खूप पाठांतर असतं." असं लहानपणीपासून बिंबवलं गेल्यावर आयुष्याचा कुठच्याही टप्प्यावर संस्कृत आपलीशी, सोपी वाटणे शक्य आहे का?

आज जे पालक अजाणतेपणामुळे आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालतात. त्यांच्याशी संवाद साधल्यावर असे लक्षात येते की, ह्या पालकांच्या लहानपणी इंग्रजी मराठीपेक्षा कठीण असल्याचे त्यांच्या मनावर बिंबवले गेले आहे. चांगल्या गुणवत्तेचे इंग्रजीचे शिक्षण त्यांना मिळाले नसल्याने, त्यांची इंग्रजी कच्ची राहिली व त्या मनातल्या भीतीमुळे त्यांनी आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात टाकले!

काही शहरी पालकांची मराठी माध्यम स्वीकारण्याची तयारी असली तरी, आज पुरेशी साधनंच उपलब्ध नाहीत आणि, ग्रामीण पालकांच्या मनातील भीतीचे (उपरोक्त) भूत त्यांना मराठी माध्यम स्वीकारू देत नाही. शिक्षणाचा बाजार मांडलेल्या संस्थांनी नीतीमत्तेची नीचतम पातळी गाठली आहे.

 यातून निर्माण होणारा सामाजिक दाब निवळण्यासाठी कोणी प्रयत्न करायला हवे?

ह्या शैक्षणिक समस्या आणि राज्याच्या शैक्षणिक गरजा राज्य सरकारने ओळखणे गरजेचे आहे. दिल्ली पुढे हुजरेगिरी करत तुघलकी फरमाने काढून राज्य चालू शकत नाही. त्रिभाषासूत्र प्रथमिक स्तरावर महाराष्ट्रावर लादण्यासाठी कुठचेही राज्यस्तरीय सर्वेक्ष केले नसल्याचे समजते. असले तुघलकी निर्णय महाराष्ट्राने स्वीकारू नयेत...
-गंधार डोंबिवलीकर,
हल्ली मु. उदयपुर, राजस्थान

8 जुलै
आज संघाच्या प्रचार प्रमुखांनी दिल्लीतून भाषण ठोकलं! 
उशीरा सुचलेलं शहाणपण... कारण संघाचे मुखपत्र म्हणवून घेणारे साप्ताहिक विवेक मागील महिन्याभरापासून भाजपचे मुखमपत्र बनून दुर्दैवी महाराष्ट्राच्या खोटार्ड्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या फतव्यांचा उदो उदो करण्यात गुंग होते. आजच्या संघप्रचार प्रमुखांच्या भाषणावर विश्वास कसा ठेवावा?
भाषा अभ्यासक, मानसशास्त्रज्ञ या अभ्यासू मंडळींकडून सातत्याने मराठी अभ्यास केंद्र च्या माध्यमातून केल्या गेलेल्या मागण्या बिनशर्त मान्य कराव्यात. अन्यथा दिल्लीतून झालेले रेशीमबागेचे भाषण थोतांडच मानावे लागेल.
मी देशाचा कार्यकर्ता म्हणून या चळवळीत उतरलोय फक्त मराठीसाठी. यापूर्वी आणि अजूनही संघातील कार्यकर्त्यांशी संपर्कात आहे. भारत फिरत असतांना अगदी हक्काने रेशीमबागेत राहायला गेलो. भाजपचे मराठी भाषा विकास मंत्री मा. तावडे जींचे हस्ताक्षर असलेले पत्र माझ्याकडे होते. ते पाहून, "तुम्ही भाजप कार्यालयात जा. इथे हे पत्र चालणार नाही" असे स्पष्ट सांगण्यात आले. भाजप आणि संघ वेगळे आहे से बिंबवण्याचा प्रयत्न असावा. मी संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने रेशीम बागेत राहिलो. https://cyclopasana.blogspot.com/2018/09/4.html?m=1
हा लेख लिहीला. 
हा सगळा २०१८चा इतिहास डोळ्यासमोरून जात असता, आजची स्थिती मात्र फार निराशा निर्माण करणारी आहे. संघ म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच संघ. आणि महाराष्ट्र म्हणजे दिल्लीला पैसा पाठवणारी कोंबडी हे वास्तव सहज दिसतंय. विकेंद्रीकरण न करता एकाधिकारशाहीने निर्णय घ्यायचे. भाषिक आणीबाणी हे त्याचेच प्रतिक.
भाषेबाबत भारत फिरून स्वतःचे विचार तयार झाल्याने ते देशहितासाठी, ऐक्यासाठी आणि सांस्कृतिक रक्षणासाठी वापरायचे झाल्यास मला संघाचा नाही, देशाचा कार्यकर्ता होण्याची अधिक गरज वाटते. राजकारण आणि संघकारण दोहोंना दूर ठेवत मातृभाषेसाठी मराठी अभ्यास केंद्रासोबत त्रिभाषा सूत्राच्या विरोधात चळवळीत मी उतरलो आहे. 
डॉ. दीपक पवार - Dr. Deepak Pawar सरांसारखं दमदार, अभ्यासू नेतृत्व लाभलेली ही चळवळ सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र घेऊन केवळ मराठीच्या विकासासाठी विशुद्ध मनाने सुरू आहे. कारण भाषा समृद्ध करण्यासाठी राजाश्रय गरजेचा असतो. सरकार जर राज्यभाषेच्या उरावर उठलं असेल तर आंदोलन अटळ आहे. हिंदी लादणे थांबवायलाच हवे. त्रिभाषासूत्र रद्द व्हायलाच हवे. नरेंद्र जाधवांची समिती तत्काळ रद्द व्हायला हवी. मराठी माध्यामाच्या शाळांचे प्रश्न सुटायला हवेत. सीबीएसईच्या तालावर राज्य शिक्षण मंडळाला नाचवण्याचा प्रस्ताव रद्द व्हायला हवा.

9 जुलै
उत्तरभारतीयांच्या स्व-ओळखीचा प्रश्न!

एका मारठीद्वेषट्या मराठी उद्योजकाने लिंक्ड इन वर मराठी माणसांना Identity crisis असल्याचा इंग्रजीतून लेख टाकला. अमेरिकेत राहणाऱ्या एका ब्लाॅगर डाॅक्टरने देखील त्रिभाषासूत्राच्या समर्थनार्थ एक ब्लाॅग बनवला.

वाईट बोलू नये तर, का? असाही प्रश्न पडतोच. विशिष्ट पक्षाच्या राजकारण्यांनी पादल्यावरही सुगंध येतोय म्हणणारे मराठी लोक मराठीवर बेतले आहेत हेच महाराष्ट्राचे दुर्दैव! 
या लोकांनी कधी वेळ मिळालाच तर संघ-भाजप आणि जातीचे चष्मे काढून यावर विचार करावा. जमलं तर देशभरातील शाळा फिराव्यात, झेपली तर, भाषाशास्त्राची पुस्तकं वाचावीत. बदललेले मत प्रकट करायला विसरू नये. सगळ्यांचेच मराठीला राजाश्रय मिळवून देणाऱ्या चळवळीत स्वागत असेल. 
'चांगलं राहणीमान' मिळण्यासाठी भारत सोडलेल्या कितीही उच्चशिक्षित असलेल्या माणसाने भारतातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य न ठोकलेलं बरं. त्यात आपण वैद्यकीय क्षेत्रातले आहोत आपला आणि भाषेचा, भाषाशास्त्राचा काही एक संबंध नाही याची जाणीव नेहमीच असावी.

ह्या दोहोंपैकी स्व-ओळखीच्या मुद्द्यावर लिहायचे ठरवले.
Identity crisis महाराष्ट्रात भारतातील सगळ्यांना सामावून घेणाऱ्या मराठी माणसाला आहे की, हिंदी-इतर भाषा कानावर पडायचाही ज्यांना त्रास होतो अश्या उत्तरभारतीयांना आहे? बहुतांश उत्तर भारतीयांची मातृभाषा हिंदी नाही. शाळांमध्ये "माझी मातृभाषा हिंदी" असल्याचं घोकून घेतलं गेलेलं, बहुधा - हिंदी हीच आपली राष्ट्रभाषा असल्याने तीच आपली मातृभाषा असल्याचं चुकीचं पढवलं गेलेलं आहे. या चुकीच्या संस्कारात घडलेल्या उत्तरभारतीयाला दक्षिण भारतात आल्यावर ज्याचा सामना करावा लागतो, तो म्हणजे खरा Identity crisis; तो मराठी माणसाला नसून सबंध उत्तर भारताला असल्याचे सिद्ध करता येईल यात शंका नाही.
माझी मातृभाषा अहिरणी, मालवणी, वऱ्हाडी, आगरी हे सांगायला महाराष्ट्रात कुठल्यही शाळेत मज्जाव नाही. मराठीच्या बोलींची ओळख मराठी अभिमानाने मिरवते. नुस्ती मिरवत नाही, बोलींतील शब्दांचा स्वीकार करून मराठी समृद्ध होत आहे. तसे ऊर्दू-उद्भव हिंदीत घडतांना दिसत नाही. हिंदीतील नवीन शब्दसंपदा इंग्रजीच्या देवनागरीकरणातून जन्म घेत आहे. इथेच उत्तरभारतातील बोल्या कश्या मरतात याचे गमक आहे. लोक-बोलीतील साहित्य हे मराठीचा अविभाज्य घटक असल्याने मराठी माणसाला कधीच स्व-ओळखीचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तसे उत्तर भारतात घडलेले नाही. 
मी व्याकरणावर बोट ठेऊन - मी चहा पिला, काॅफी पिली, दूध पिलं. तीनही प्रयोग पुण्यातल्या मराठीच्या दृष्टीने रूढार्थाने जरी चुकीचे ठरवले तरी मराठी बोली आणि व्याकरणदृषट्या कसे चपखल बरोबर आहेत हे पटवून देत आगरी बोलीचा मराठीवर प्रभाव दाखवून देत असतो. ते माझ्या डोंबिवलीकर ओळखीमुळेच!

केंद्र सरकारच्या मराठी विरोधी हिंदी लादणाऱ्या धोरणांमुळे मराठी तरुणांचा स्पर्धा-परीक्षांमधील सहभाग आणि त्यातील सफलता मर्यादित आहे. पण, मराठी तरुण खूप कमी प्रमाणात सरकारी नोकऱ्यांवर अवलंबून होता, आहे. स्वतःच्या प्रामाणिक स्वभावामुळे महाराष्ट्रबाहेरही स्वाभिमानाने काम करण्याची प्रवृत्ती मराठी माणसात दिसून येते. मराठी द्वेष्ट्या राज्यसरकारने दिल्लीची चाटायला महाराष्ट्र विकायला काढला, महाराषातले उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर नेले, राज्यसरकारी नोकऱ्या अमर्ठी उद्योजकांना विकल्या तेव्हा मराठी माणूस खऱ्या अर्थाने अस्वस्थ झाला.हिंदी लादणारी मराठी विरोधी मुघली फरमानं ही तर केवळ ठिणगी.

"ऐका म्हणजे ऐकले जाल" हे भाषा स्वातंत्र्याचे सूत्र मराठी माणसाने अनेक दशकांपासून स्वीकारलेलं दिसतं. स्व-ओळखीचा प्रश्न न सुटलेल्या उत्तरभारतीयांमधे ती स्वीकारशीलता आहे का? असण्याचे संभवतच नाही. माझी भाषा काय आहे हे न ओळखता, हिंदीच आहे असे थोपवले गेले असल्यास; ही माझी भाषा, ही तुझी भाषा हा भेद आपसुकच निर्माण होतो. सगळ्या भारतीय भाषा माझ्या आहेत म्हणण्यासाठी आधी स्वतःची ओळख स्पष्ट व्हावी लागते...
-गंधार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा