शनिवार, ३ डिसेंबर, २०२२
बाल भारती
बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२
मनातली बात (सर्व सामान्य युवकाच्या)
शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२
चर्चा तर होणारच!
सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२
ल श चे लेखन नियम- मराठी भाषेची दिशाभूल
मराठीचे संवर्धन करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारे ल आणि श लिहिण्याचा नियम मराठी भाषेचा 'वेगळपणा' दाखवेल असे मत काही मराठी अभ्यासकांचे आहे. पण ते भाषेची दिशाभूल करणारेच!...
शनिवार, ९ जुलै, २०२२
आजी, विठ्ठलभक्ती आणि मी
रविवार, १३ मार्च, २०२२
द काश्मीर फाईल्स
समीक्षा लिहीण्या पूर्वी... मी पैसा खर्च करून "हिंदी" चित्रपट- द काश्मीर फाईल्स बघायला जातो तेव्हा...
मनापासून पैसे खर्चून चित्रपटगृहात जाऊन बाॅलिवूड चित्रपट बघणाऱ्यातला मी प्रेक्षक नाही. रविवारी उदयपुरातली दुकानंही बंद. दुपार किंवा संध्याकाळचं महागडं प्रक्षेपण बघण्यापेक्षा सकाळी नऊचं स्वस्तात बघता येणारं प्रक्षेपण बघूया असं ठरवलं.
हिंदी भाषेतला वयस्कांकित (Adult rated) चित्रपट बघायची ही माझी पहिलीच वेळ. घरातून निघतांना मनात या विषयी असंख्य विचार होते. वयस्कांकन म्हणजे नग्नता, शिव्या, महिला अत्याचारांचे खुले प्रदर्शन, वगैरे हीन गोष्टी दाखवल्या असाव्यात.
पूर्वी तंबूतल्या चित्रपटाच्या जमान्यात देवता आणि संतांचे चित्रपट बघायला तंबूबाहेर चप्पला काढायची पद्धत होती. चित्रपट हिट जायचे. तसे हल्ली देशभक्तीवर आधारित वरील हीन गोष्टी दाखवल्या तरी चित्रपट हिट जातात. इतिहासांचे विडंबन करणे हा गल्ले भरायचा सोप्पा मार्ग. बाॅलिवूडची एकूण पातळी ही काही दिग्दर्शकांनी खालावलेली आहेच. त्यामुळे वयस्कांकित चित्रपटाची तिकीटं काढल्यावर तसला प्रकार बघायचीही मनाची तयारी ठेवली होती.
काश्मीर विषयीचे मिश्र अनुभव घेऊन चित्रपटगृहात जातांना...
हा विषय गूढ वलयांकित काश्मीरचा. काश्मीर म्हटलं की पटनीटाॅप पलिकडल्या भटोत, भदरवाह भागात झालेल्या गप्पा आणि तिथल्या शाळा आठवतात. संस्कृतमधे लिहीलेल्या राजतरंगिणीतली काश्मिरीयत आठवते. दोन हजार चौदा साली आई बाबांबरोबर फिरायला गेलो असतांना पहलगाम भागातील काही डोंगर भटकतांना तिथल्या स्थानिकांनी विचारलेला, "क्या आप हिन्दुस्थानसे हो?" (तुम्ही हिन्दुस्थानातून आला आहात का?) हा खवचट-टोकेरी प्रश्न आठवतो. तर दुसरीकडे दोन हजार अठरा साली भदरवाहच्या पहाडांत सायक्लवतांना अत्यंत प्रेमाने आणि अदबीने झालेला पाहूणचारही आठवतो. काश्मीरच्या शिक्षणात काश्मिरी सोडून इतर भाषांचाच भर अधिक! हेच इथले भाषिक पारतंत्र्य मी भाषारत सायकलोपासनेत नोंदवले होते. जिथे मातृभाषेतून व्यवहाराचे स्वातंत्र्य नाही तिथे स्वातंत्र्याची जाणीव दुर्मीळच असते. इथे तर उर्दू भाषेसहित जीवनमानच लादलेले... "यहापे सरकारी सिस्टम उल्टी चलती है" (इथे सरकारी यंत्रणा उलटी चालते) सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवरचं हे अस्सरच्या स्थानिकांचं वाक्य डोक्यात घुमू लागतं.
या सगळ्या माझ्या डोक्यातल्या पार्श्वभूमीवर मी चित्रपटगृहात जाऊन बसलो.
...आणि राष्ट्रगीताने चित्रपट सुरू झाला...
काश्मिरी भाषेचे सौष्ठव सुरुवातीपासूनच कानावर पडू लागले. समोरील दृष्य 1990 सालच्या 18-19 जानेवरी पासून घडलेल्या काश्मीरातल्या घटना आणि आजच्या भारतातील विद्यापीठं या दोन काळखंडात- आजचा तरुण विद्यार्थी- कृष्ण पंडित, त्याची प्रोफेसर- राधिका मेनन, आणि त्या काळात साऱ्या घटनांचे साक्षीदार असलेले चार मित्र या पात्रांच्या भूमिकेतून -फिरवू लागली.
एखादा चित्रपट पाहतांना दिग्दर्शक आपल्याला कुठे घेऊन जातो? विहीर, किल्ला, सैराट् यांसारख्या चित्रपटात आपण कथानकातल्या पात्रांशी एकरूप होऊन जातो. त्या गावात, त्या घरात नटां बरोबर आपलाही वावर सुरू असतो. विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्समधे मात्र आपण त्या पात्रांसोबत फिरत असूनही स्वतः एक त्रयस्थ हतबल नागरिक म्हणून अकल्पित क्रूर घटनांची माहिती करून घेत असतो. म्हणून हा नुस्ताच चित्रपट नसून माहितीपट आहे.
असंख्य सत्य घटनांची मोळी बांधत, एका अव्याप्त चिकित्सक आवृत्तीतून साकारलेलं हे एक थरारक कथानक आहे.
ज्यांनी हे भोगलं त्यांच्या जाणीवेच्या नखाएवढी जाणीवही आपल्याला नाही. डोळे न पाणवता हा चित्रपट बघता येणं कठीण आहे. हळव्या मनांसाठी चित्रपटगृहात जागा नाही. नैतिकतेचा तोल ढळू न देता वास्तविकतेला न्याय द्यायचा सर्वतोपरीने प्रयत्न केला गेला आहे. यात नग्नता नाही, शिव्या नाहीत. आहे तो फक्त रक्तपात. 1990 साली धनधान्यांनी भरलेल्या काश्मिरी पंडितांच्या घरात धान्य रक्तात न्हाऊन निघाल्याचं करुण वास्तव आपल्या पुढे उभं ठाकतं.
आजच्या शिक्षणातील फोलपणाही या चित्रपटाने प्रदर्शित केला आहे.
या इतिहासाला वाचा फोडण्याचं शिवधनुष्य सगळ्यांनीच उत्तमप्रकारे उचलून धरलं आहे.
अनुपम खेर, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, मिथून चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बालेवाडी, भाषा सुंबली यांसारख्या प्रथित यश कलाकारांसोबत पृथ्वीराज सरनाईक या बालनटाने आणि दर्शन कुमारने स्वतःच्या अभिनय कौशल्यांनी हा माहितीपट थरारक बनवला आहे. पार्श्वसंगीतकारांच्या नावात स्वप्नील बांदोडकरचे नाव मराठी प्रेक्षक म्हणून काॅलर टाईट करणारे नक्की आहे.
ज्याप्रमाणे कृष्ण पंडितची भेट दल सरोवरात चिन्मय मांडलेकरशी घडवली तसंच मृणाल कुलकर्णीच्या मुली सोबत बोलणं घडवता आलं असतं असंही वाटत राहतं. त्यात या पूर्ण असलेल्या कथानकाचं अपूर्णत्व आहे आणि यशही.
आपण काय घेऊन चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो?
स्मशान शांतता पसरलेले, प्रेक्षकांच्या हुंदक्यांनी भरलेले, पाणवत्या डोळ्यांचे असंख्य वास्तववादी क्षण या तीन तासात आपण अनुभवलेले असतात. कधीतरी ओक्साबोक्षी रडावं असंही वाटू शकेल. इतकं क्रौर्य आपण दृक्-श्राव्य माध्यमातून बघत असतो.
हा इतिहास अश्या प्रकारे सगळ्यांसमोर येण्याची वेळ यावी यातच- सगळ्या तथाकथित मानवतावाद्यांचं, आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय राजकारण्यांचं अपयश सामावलेलं आहे. आजच्या घटिकेतील समस्यांना (Real time problems) ऐतिहासिक भावनिक वळण देऊन तरुणांना भडकवणं, दिशाभूल करणं हा विज्ञानाधिष्ठित अध्ययना विरोधातला राजकारणी खेळ आहे. याची जाणीव कुठलीही नारेबाजी न करता चित्रपट बघणाऱ्या संवेदनशील युवक-युवतींना नक्कीच होऊ शकेल. हा चित्रपट माथेभडकाऊ नाही. इतिहासाची पुनरावृत्ती न होवो म्हणून डोळे उघडणारा नक्की आहे.
तेव्हा हा चित्रपट बघायचा असेल तर, मन वज्र करून चित्रपटगृहात जायला नक्की सज्ज व्हा...
ता. क.-
समीक्षकाचं काम चित्रपटाची समीक्षा करणं आहे. चित्रपटाच्या विषयावरील संशोधनावर वाहवत जाणं नाही.
गब्बरचं गुणगान ऐकू यावं म्हणून कोणी खलनायकाची भूमिका रेखाटत नसतो. "त्याने कापलेले हात किती क्रूर!" म्हणत समीक्षक घोळत राहिला तर चालेल का?
नायकाचं उदात्तत्व सगळ्यांमधे चमकून दिसावं यासाठीही दिग्दर्शकाची उत्तमता पणाला लागते.
चित्रपट जर एका समाजाला नायक आणि दुसऱ्या समाजाला खलनायक बनवत असेल तर, मात्र चित्रपट प्रदर्शनावरच फेरविचार करण्याची गरज आहे. शालजोडे घेऊन फिरणाऱ्या प्रेक्षकांसमोर दिसणाऱ्या चित्रपटाचा विषय कसा असावा?
आपल्या उत्तम चित्रपटाचं, कथानकाचं मूर्ख प्रेक्षकांमुळे राजकारण घडू नये; अस्थिरतेचा ऐतिहासिक विषय मांडल्यावर वर्तमानात स्तोम माजू नये -याची जबाबदारी निर्माते आणि दिग्दर्शकाने स्वीकारायलाच हवी.
भारताच्या चित्रपटसृष्टीचा प्रदीर्घ आलेख बघतांना, सुजाण प्रेक्षक घडवण्यासाठी किती निर्मात्यांनी प्रयत्न केले?
समीक्षकांचा वापर भडक विधानं अधोरेखित करून स्वतःच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केला गेल्यावर या देशात चांगला प्रेक्षक तयार होणं अशक्यच. परिणामी कितीही उत्तम चित्रपट आला तरी वादाच्या भोवऱ्यात अडकवून तो बंद पाडणे, विषयावर राजकारण करत समाजाला भडकवणे हे नित्याचेच. प्रत्येक चित्रपट उत्तमच असतो असे नाही. पण, उत्तम चित्रपटातलं उत्तमत्व न समजण्यासारखं दुर्दैव दिग्दर्शकाच्या माथी येतं ते आंधळ्या समीक्षेमुळेच!
-सम्प्रिः।
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
जागतिक मातृभाषा दिवस
*जागतिक मातृभाषा दिवस*
एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पाकिस्तानने उर्दू 'राष्ट्रभाषा' म्हणून स्वीकारली. या धोरणाची अंमलबजावणी अराजकीय व लोकतंत्राला न जुमानता पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आजच्या बांगलादेशात होऊ लागली. एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी ढाका युनिव्हर्सिटीत उर्दू 'राष्ट्रभाषे'विरोधात मोर्चा निघाला होता. पाकिस्तानी पोलिसांनी मोर्चेकरूंवर खुला गोळीबार केला. अब्दूस सलाम, अब्दूल बरकत, रफिक उद्दीन अहमद, अब्दूल जब्बर आणि शाहफियूर रहमान तिथेच हूतात्मे गेले आणि शेकडो जखमी झाले.
हीच पूर्व पाकिस्तान विरुद्ध पश्चिम पाकिस्तान युद्धाची नांदी होती. नंतर एका दशकाहून अधिक काळ पूर्वपाकिस्तानावर काळरात्र पसरली होती. तिथे बंगाली बोलण्यावरही बंदी आणली गेली. मग घडलेलं युद्ध आणि त्यात भारताची कामगिरी सगळ्यांनाच माहिती आहे. एकोणीसशे एकाहत्तर साली "आमार बांगला" म्हणत बांगलादेश स्वतंत्र झाला. बंगाली भाषा मुक्त झाली.
परकीय राजवटी खालसा झाल्यावर साऱ्याच देशांमधे "राष्ट्र भाषेच्या" नावाखाली स्थानिक भाषा धोक्यात येत असल्याचे चित्र सर्वत्रच दिसून येत होतं. हाच मातृभाषा संरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन युनेस्कोने बांगलादेशा मधील हूतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्याचे ठरवले. 17 नोव्हेंबर 1999 रोजी एकमताने हा ठराव पारीत करण्यात आला.
मातृभाषेसाठी घडलेलं युद्ध आणि वेगळे झालेले दोन देश हे भाषिक स्वातंत्र्याचे जगातील प्रेरणादायी उदाहरण आहे.
"स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे" म्हणणाऱ्या सावरकरांच्या "स्वातंत्र्य" मुद्द्यावरीलच हा एक आयाम...
मातृभाषेच्या स्वातंत्र्याचा.
सगळ्यांना जागतिक मातृभाषादिनाच्या शुभेच्छा!!!
-सम्प्रिः।
21.02.2022
मंगळवार, ४ जानेवारी, २०२२
कर्तव्यग्रहण
मूळ बंगाली
কে লইবে মোর কার্য, কহে সন্ধ্যারবি।
শুনিয়া জগৎ রহে নিরুত্তর ছবি।
মাটির প্রদীপ ছিল, সে কহিল, স্বামী,
আমার যেটুকু সাধ্য করিব তা আমি।
लिप्यंतरण
के लइबे मोर कार्य, कहे सन्ध्यारवि।
शुनिया जगत् रहे निरुत्तर छबि।
माटिर प्रदीप छिल, से कहिल स्वामी,
आमार जेटुकु साध्य करिब ता आमि।
भाषान्तर
"कोण घेईल माझं कार्य?..."
विचारे अस्ताला जाणारा सूर्य.
ऐकत राहतं ज्याला जगत
पसरे छाया गडद, निरुत्तर.
एक असते मातीची पणती
आश्वासत म्हणते जी,
"मालक, करता येईल तेवढं
करीन, मी."
सोमवार, ३ जानेवारी, २०२२
पाप-पुण्ण्याची गणती-हिशोब!
एका जवळच्या मित्राचे वडील कर्करोगासहित आपले शेवटचे दिवस काढत आहेत. दोन वर्षांपूर्वी शरीरातली गाठ त्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी घरात कोणालाही न सांगता आजार अंगावर काढला. यावर्षी घरातल्यांना शरीरातील अत्यंत बदल लक्षात आले. पण, त्यांनी उपचार घेण्याचे नाकारले. ते स्वतःहून जगाला निरोप द्यायला तयार झाले.
निर्व्यसनी असूनही कर्करोगाचे दुःख वाट्याला येणे- हे त्यांना वेदनेपेक्षा अधिक सलतं आहे. कधीही अपशब्द न उच्चारणारा माणूस असल्या वेदना पचवायला शिवीगाळ करू लागतो. मृत्यू कधीही येईल या विचाराने धीर सुटलेला असतो. हक्काचे प्रेम आणि हक्काचा राग एकाच वेळी प्रकट व्हावा असा चिडचिडेपणा घरातले अनुभवत असतात.
हे समजल्यावर, पाप काय आणि पुण्ण्य काय यावर विचार करत होतो. ज्याचं अंतीम फळ आनंद देतं ते पुण्ण्य आणि ज्याचं अंतीम फळ दुःख देतं ते पाप!
ही खरं तर पुण्ण्यवान माणसं! आपलं आयुष्य कसं संपवायचं ते स्वतः ठरवतात. आपण मुलं म्हणून, सेवा करत, फक्त पितृ-ऋण फेडायचे काम करू शकतो. आणि तेच आपलं कर्तव्य असतं. तोच आपला पुण्ण्य संचय.
आजी गेली. आईचे काका, म्हणजे आमचे अंबरनाथचे आजोबा गेले. जाण्याच्या वेळा प्रत्येकाच्या ठरलेल्या होत्या. आजीला जगण्याची तीव्र इच्छा होती. तिच्या शरीराला होणाऱ्या वेदना बघणे आम्हालाच असह्य झाले. तेव्हा तिला शरीर सोडण्याविषयी समजवावं लागलं. तिच्या सेवेला मुलं, सुना, नातवंडं शेवटपर्यंत होती. आजोबांनी पुतण्या आणि पुतणीला त्रास होऊ नये म्हणून अन्न पाणी सोडून दिले. त्यांचा एकटेपणा- आम्ही जवळ असूनही त्यांना दुःख देत होता. कुणासाठी, काय, कसं, कुठे सोडावं याची तयारी कमावणं सुरू झाल्या पासून करावी लागते. नाॅमिनीच्या रूपात फक्त पहिल्याची- 'कुणासाठी'ची तयारी करून घेतली जाते. बाकी सगळा मनो-बुद्धिचा खेळ!
आजीचं वेदनांवरचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हटलेली रामरक्षा असो, तिचा हात गार पडेपर्यंत माझा हात तिच्या हातात असणे असो, तिला शेवटचे पाणी पाजणे असो किंवा शरीर सोडतांना गीता ऐकवणे असो. आजोबांना अंबरनाथला रात्री जाऊन केलेली मदत असो -या सगळ्याच अंतघटिका, त्या आठवल्या की मला उगाच दुःखदायी आनंद होतो.
तेच पुण्ण्य असतं का? माहीत नाही.
आजोबा गेले तेव्हा मी रत्नागिरीत होतो. म्हणजे आजोबांची काळजी घ्यायला आई-मामा होते. मी फक्त त्यांचा मानसिक आधार होऊ शकलो असतो. आई म्हणते मी दहाव्या-बाराव्याला रत्नागिरीहून परत यायला हवं होतं. पण, माझा काही श्राद्ध संस्कारांवर फारसा विश्वास नाही. ते फक्त नातेवाईकांच्या मानसिक समाधानासाठी असतात, असं मला वाटतं. मन हलकं करायचे वेगळे मार्गही असू शकतात. पिंडात ब्रह्म बघण्या पेक्षा निसर्गात ब्रह्म बघणं मला अधिक तर्कसंगत वाटतं. भाट्याच्या समुद्रावर मावळती बघतांना गुरुदेवांची- "के लइबे मोर कार्य कहे सन्ध्यारवि" ही कर्तव्यग्रहणावरील कविता म्हणणं आणि अंबरनाथच्या आजी आजोबांचं स्मरण करणं मला अधिक मानसिक समाधान देतं.
आई-बाबा, मामा-मामींची धावपळ सुरू असतांना त्यांना मानसिक आधार द्यायला मी डोंबिवलीत थांबलो नाही म्हणून कधी कधी वाईट वाटतं. घश्यात पाणी अडकेल म्हणून मी एकच चमचा आजीला पाणी पाजलं. अजून पाणी पाजायला हवं होतं का? या विचारानेही वाईट वाटतं.
तेच पाप असतं का? माहीत नाही.
तत्त्वज्ञानात आस्तिकांचा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला आणि नास्तिकांचा याच जगण्यात सुटणारा -पाप-पुण्ण्याचा हिशोब वाचतांना आणि त्यावर विचार करतांना मला दोन्ही पक्ष पटतात. आज जगत असतांना चार्वाकांसारखं जगावं. पण, उद्याच्या कृतीवर विचार करतांना आस्तिकांप्रमाणे करावा असं मला वाटतं. कारण दोन्ही पक्ष चुकीचे नाहीत.
आणि मृत्यूसमयी- शरीर सोडतांना हीच पूर्वी केलेली पाप-पुण्ण्य आठवतील ना!
गीता-गीतईतले शब्द आजीच्या कानावर पडले तेव्हा तिचे हात-पाय गार पडले होते. पण, त्यानंतर शिरेतून वाहणारा रक्तप्रवाहाचा शेवटचा ठोका मी बघितला. तिच्या मनात, बुद्धीत काय काय सुरू असेल त्या तासाभरात? आयुष्यभरात मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी पाप म्हणून तिला आठवल्या असतील का?
वैयाकरणी म्हणून शब्दनित्यत्व मान्य केले तर, आपण उभा केलेला संसार शेवटी तिच्या भोवती होता हे शब्दातून तिला समजलं असेल. हीच पुण्ण्याईची तृप्तता असेल का?
सात-आठ वर्ष एकटं जगत असतांना आजोबांनी एकटं मरण्याची मनो-बुद्धीची पूर्वतयारी केली नसेल का? अधिक जगण्याने पुतण्यांना त्रास होईल या विचाराने इस्पिताळात जायला नाकारणे. हे नकारात्मक एकटेपण येणे- मनाविरुद्ध नसेल किंवा असेलही. अन्नपाणी सोडल्यानंतर त्याच पाप-पुण्ण्याचा हिशोब ते करत असतील का?
म्हणजे, मनाविरुद्ध फळ देणारी, घडणारी कृत्य करणे म्हणजे पाप आणि शांतता देणारं वर्तन म्हणजेच पुण्ण्य असावं. असं तरी आता वाटतंय.
-सम्प्रिः।