शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

चर्चा तर होणारच!

२६ नोव्हेंबर २०२२
सावित्रीबाईफुले नाट्यमंदिर, डोंबिवली
सी-२० आसनावर बसून पाहिलेला 
दु ४.३० चा प्रयोग

३ /५ ☆ तारांकन

आजच्या नाटकाची सुरुवात श्रद्धांजलीने झाली. आयुष्यभर अभिनयाला वाहून घेतलेला नट जेव्हा काळ्याच्या पडद्या आड जातो तेव्हा प्रेक्षक  प्रेक्षागृहातच बसून रंगमंचावरचा खेळ बघत असतो, रंगमंचाची सेवा करवून घेत असतो असं उगाच वाटून गेलं. नाटक होतं चर्चा तर होणारच. नवीनच नाटक. परीक्षणाने चर्चेत न आलेलं. त्यामुळे गर्दी जेमतेमच होती. पण आम्ही सी-20,21 म्हणजे समोरच्या रांगेत अगदी मधोमध बसलेलो. त्यामुळे नाटकातलं सौंदर्य आणि उणंधुणं स्पष्ट दिसत होतं. माझी निरीक्षणं नोंदवायचा हा छोटासा प्रयत्न.

*३ पात्रांचा २ अंकी प्रयोग*
 डाव्या-उजव्या विचारसरणीतील दोन कार्यकर्ते चर्चेसाठी रंगमंचावर उतरले होते. अस्ताद आणि अदिती! या चर्चेचं सूत्र हाताळत होते देशपांडे. बंगल्याचं सुंदर आणि भव्यदिव्य नेपथ्य पडदा उघडल्या पासूनच उत्सुकता वाढवत होतं. पात्र रंगमंचावर खेळू लागली तसे नेपथ्य वेशभूषेला झाकत होतं. तरीही वेशभूषेतील रंग विचारपूर्वक वापरलेले दिसून येत होते. डाव्या-उजव्या विचारसरणीतील कार्यकर्ते नट-नटी आणि अमेरिकन कंपनीने नियुक्त केलेला नाटकातला विदूषक. 

*भूमिका*
अदिती यांचा अभिनय उत्तम, प्रकाश झोत घेण्यातही त्या मागे न पडल्याने तो ठसठसून दिसला आणि नाटकात प्रभावी ठरला. बहुतांश उत्स्फूर्त टाळ्या त्यांच्या अभिनयाने घेतल्या.

त्या मानाने अस्ताद यांचा अभिनय फिका वाटला. किंबहुना अस्ताद यांच्या रंगभूमीवरील वावरातून  पिके चित्रपटातल्या प्रमुख नटाचा भास होत राहिला. प्रकाश योजना त्यांना साजेशी नव्हती. प्रेक्षकाभिमुख न होता नव्वद अंशाने होत केलेला अभिनय प्रक्षकांवर छाप पाडू शकला नाही. पण ह्या नटाच्या जमेची बाजू म्हणजे आवाजातील वैविध्य आणि प्रसंगानुरूप चढ-उतार. काही संवादांना टाळ्या आणि हाशे मिळाले ते शब्दफेकीतील कौशल्याने. 

"non देशपांडे" हे पात्र साकारणारे क्षितीज झारापकर यांचा अभिनय उत्तम होता. मुद्दमून घसा घाकरण्यामागचं कारण समजू शकलं नाही. त्यामुळे व्यत्यय निर्माण झाल्यासारखे वाटले. पण, विदूषकाच्या पात्राला त्यांनी पूर्ण न्याय दिलेला आहे.

*नेपथ्य, संगीत आणि प्रकाश योजना*
बंगल्याचे नेपथ्य मनोरम्य आणि भारदस्त आहे. संगीत अगदी मोजकेच आहे. त्यामुळे मधूनच येणारे ते आवाज अनेक ठिकाणी कृत्रीम वाटतात. नटीवर एका प्रसंगी पडणारा निळा झोत अतिशय परिणामकारक ठरतो. तर, नटावर कुठेही केशरी झोत न पाडल्याची कमतरता जाणवून येते. खिडकीतून येणारा प्रकाश झोत नाटकभर एकाच खिडकीतून येत असल्याने दिवसभराच्या वेळेचा आणि त्या प्रकाश झोताचा काहीच संबंध नसल्याचे समजवावे लागते. परंतु एकंदरीत, नाटकातील वळणावळणांवर वापरलेली प्रकाशयोजना अतिशय परिणामकारक ठरते, नाटकाला उठवते.

*कथानक*
पहिल्या अंकातील चर्चा फारच रटाळ, उथळ वाटत राहते. मध्यंतरापर्यंत लेखकाला नेमकं काय सांगायचंय हे समजू न शकल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होतो. 
हा विषय भांडवलशाहीतील समाजाभिमुख कार्यकर्त्यांची- (मग ती कुठल्याही विचारसरणीची असोत)- होणारी कुचंबणा याकडे नेता आला असता. पण लेखकाने पहिल्या अंकात कुठल्याच विषयाला न्याय न देता प्रेक्षकांना विनाकारण बौद्धिक त्रास दिला आहे. (काही प्रेक्षक पहिल्या अंकात झोपल्याची चर्चा प्रयोग संपल्यावर प्रेक्षागृहाबाहेर रंगली होती.)

नाटकातील दुसरा अंक -पहिल्या अंकात पडलेलं नाटक उठवतो आणि प्रेक्षकांना खूष करतो. दुसऱ्या अंकात कथानकाने घेतलेली अनपेक्षित वळणं, तोतयेपणा आणि खरेपणांचं प्रकटीकरण प्रेक्षकांची मनं जिंकतं. पैसे अगदीच वाया न गेल्याचं समाधान देतं. 'अंतभला तो सब भला' म्हणणाऱ्यांनी हे नाटक नक्की पाहिलं पाहिजे कारण प्रेक्षागारातून बाहेर पडणारा प्रेक्षक आनंदाने आणि संतोषाने बाहेर पडतो.

-गंधार डोंबिवलीकर. ("खरं आडनाव लिहील्याने लोकांची बघण्याची मानसिकता बदलते."- इति नाटकातील नटी.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा