बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

मनातली बात (सर्व सामान्य युवकाच्या)

मोदींची मन की बात ऐकून, आपणही आपल्या मनात साठून राहिलेली एका सामान्याच्या मनातली बात लिहावी असे वाटले.
मत छोटंसंच आहे. पण त्यासाठी बरंच काही घडून गेलेलं आहे.-
हार-तुरे, शाल-श्रीफळं, सत्कार-सन्मान काही नको; सामान्य माणूस म्हणून जगू द्या!

२०२२ चा शेवटचा महिना उजाडलाय. नोकरीमुळे आयुष्यात पहिल्यांदाच आर्थिक स्थैर्य अनुभवतोय. मागे वळून पाहतांना कमालीच्या अस्थिरतेचा काळ मागे पडल्याची जाणीव होते आहे. भारत फिरत असतांना पैसे कधीच कमी पडले नाहीत. किंबहुना उधळीवृत्ती नसल्याने वायफळ खर्च कधीच होत नसे आणि जिथे खर्च करावेत तिथे आखुडता हातही घेतला जात नसे. त्यानंतर २०१९ मधे घरी आल्यावर तीन महिने सादरीकरणं तयार करण्यात आणि सत्कार समारंभांमधे निघून गेले. शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं ठरवलेलं होतं. ग्रामीण भागात की शहरी भागात ते ठरवायचं होतं. डोंबिवलीतल्या माॅडल इंग्लीश स्कूल मध्ये शिकवल्याने शहरी शाळेतला खूप छान अनुभव होता. ग्रामीण भागातील अनुभव घ्यायला पुढील तीन महिने प्रबोधिनीच्या हराळी केंद्रात राहून आजुबाजूच्या शाळांमध्ये जाऊन पाहिले. फेब्रुवारीत परतलो ते शहरी भागातील शाळांमधेच काम करायचे असे ठरवूनच. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष टाळेबंदीतच सुरू झाले. मिळेल त्या शाळेत एक वर्ष शिकवायची तयारी होतीच. ऑनलाईन शिकवतांना किती विद्यार्थ्यांना पकडून ठेवता येईल हा प्रश्नच होता. पण, शेवटी सगळेच विद्यार्थी दुर्लक्ष करणारे असतात असेही नाही आणि सगळेच उत्तम असतात असेही नाही. ज्यांनी स्वतःहून मेहनत घेतली ते पुढे आले. बाकीचे मागे राहिले. दूरस्थ माध्यमाने त्यांच्या मागे लागून, त्यांचं बोट धरून पुढे आणणे शक्य नव्हते. शिक्षकी पेशाला स्वतःत पालकत्व नकळत स्वीकारावे लागते. देवनागरी टंकन कार्यशाळा त्याचंच प्रतीक म्हणून कल्पना सुचली. गणपतीच्या सुट्टीत शाळेतल्या सगळ्या मुलांना देवनागरी टंकनासाठी मार्गदर्शन केले. शाळेकडून एकाही अधिक पैश्याची अपेक्षा न ठेवता. शंभर मार्कांच्या तीन अर्ध्या तुकड्या म्हणजे अर्धवेळ शिक्षकाचे मानधन होते आठ हजार रुपये. इसवी सन २०२०-२१ ची गोष्ट! 
असेच विविध कल्पक उपक्रम आणि कल्पक गृहपाठाच्या आधारावर दूरस्थ माध्यमातूनही मुलांच्या सातत्याने संपर्कात राहून विषयकुतूहल जीवंत ठेवण्याचा प्रयत्न असायचाच. २०२१ दुसऱ्या लाटेच्या भीती बरोबर टाळेबंदीनेच संपले.  
टाळेबंदी उठताच मला काही गोष्टी जाणवू लागल्या. ज्यांची जाणीव टाळेबंदीत होत नसे. पैकी एक- आपला पगार आपल्या खर्चाला जेमतेम पुरणारा आहे. दोन- आपल्या पगारात आपण सायकलची देखभाल करू शकत नाही. 
कारण, वीस हजार किलोमीटर चाललेल्या सायकलचे हळू हळू सगळेच छोटे-मोठे भाग बदलावे लागत होते. दर्जेदार पण महाग वाटणाऱ्या प्रत्येक भागामुळे होणारे उत्तम परिणाम अनुभवल्यामुळे आता पुन्हा एक पायरी खाली उतरून दुय्यम दर्जाचे भाग विकत घेणं मनाला सहन होईना.
शिक्षकी पेशातील पूर्णवेळ नोकरी स्वीकारायला मला आवडलेच असते. पण जी-ती शिक्षण संस्था १२-१५ हजारावर एकाही पैश्या संबंधी ब्र उच्चारी ना!
कहर तर, डोंबिवलीतल्या एका खूप प्रतिष्ठित शाळेने केला. अशी संस्था जिने माझा सत्कारही केला आणि प्रबोधिनीच्या कामामुळे जिथला जवळ जवळ प्रत्येक शिक्षक ओळखीचा. "संस्थेची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याने सध्या आम्ही पाच हजार रूपये मानधन देऊ शकू. पण,आम्हालाच ते मानधन कमी वाटत असल्याने आम्ही शिक्षक आमच्या पगारातून पैसे काढून वरून दोन हजार. म्हणजे सातहजार रूपये देऊ. शंभर मार्कांचे तीन पूर्ण वर्ग आहेत..." म्हणजे पूर्ण वेळ शाळेत शिकवण्याचा हा मला देऊ केलेला पगार ऐकून मी थक्कच झालो.

ही किंमत होती माझी? एखाद्याच्या वेळेची किंवा कष्टाची? 

सगळे हार, सगळ्या शाली, सगळी श्रीफळं, मान-सन्मान... त्याच क्षणी मी ठरवलं- यापुढे कुणाचीही शब्बासकी, प्रशंसा स्वीकारायची नाही. 
वर्षभराचा शाळेत दूरस्थ माध्यमातून शिकवण्याचा अनुभव आणि त्यापूर्वी अजून एका वर्षाचा शाळेत प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव पाठीशी असतांना, नुस्त पुस्तकी आणि प्रमाणपत्रां पुरतं नाही तर, देशभर फिरून आल्या नंतरचं गाठोडं बरोबर असतांना पूर्णवेळ काम करून घ्यायची ही किंमत करावी? 
माणूस म्हणून तरी कसे जगावे?

आठ हजाराची नोकरी "कधीही सोडून जाईन" या बोलीवर २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षात सुरू ठेवली. आपल्या मुलांना ध्रुवा महोत्सवाचा अनुभव द्यायलाच हवा. म्हणून त्याची तयारी करून घेतली. खरं तर, शाळेसाठी मी अर्धवेळ काम करत असलो तरी मी मनाने पूर्णवेळ शाळेत गुंतणाऱ्या प्रकृतीचा होतो. माॅडेल मधे शिकवतांना तीन दिवस शाळेत गेले तरी मधल्या दोन दिवसांमध्ये शाळेत काय करता येऊ शकतं याचे विचार आपोआपच डोकावत. अभ्यासातला विषय आवडला की त्यात गुंतून राहण्याची प्रवृत्ती आधीपासून असल्याने. अर्धवेळ शाळा ही फक्त संस्थेच्या आर्थिक सोयीची असे. २०२१ ची दिवाळी संपली आणि शाळा भरू लागली. 
माझा मोबाईल भारत फिरून आणि दीडवर्ष दूरस्थ माध्यमातून वर्ग घेऊन कुरकूर करत होता. लॅपटाॅपही थकला होता. या दोहोंपैकी काहीही नवीन घेण्यासाठी पैसे नव्हते. मी घरूनही पैसे का मागावेत?
मी कधी गरीब नव्हतो. आई बाबा पाठीशी खंबीरपणे उभे होते. पण ओरबाडणाऱ्या वृत्तीने ही परिस्थिती आणली होती. गीता म्हणते, "तुला देहवंताला जगायचे ते कर्म करत करतच." मी कर्म करत होतो. पण शैक्षणिक संस्थांना, "क्व ते धर्मस्तदा गतः" (तुझा धर्म कुठे गेला होता?) विचारणारं कुणी होतं का?

नोव्हेंबर महिन्यात पगार वाढवला नाही तर मी सोडतो या हट्टाने राजीनामा टाकला. "तुम्ही हे शैक्षणिक वर्ष पूर्ण करा. फेब्रुवारीत बढती देतो." वगैरे आश्वासनांची गळ होतीच. पण माझा 'समाजसेवक' म्हणून बराच आर्थिक अंत पाहण्यात आला होता. 
मी राजीनामा मागे घेतला नाही. नोव्हेंबर मधे शाळा सोडली. पुढे एका शाळेने मला १५ हजार रूपये पूर्णवेळ आणि एका कनिष्ठ महाविद्यालयाने २० हजार रूपये पूर्णवेळ अशी नोकरी देऊ केली. इतरत्र कुठेच काही झालं नाही तर महाविद्यालय स्वीकारू अशी तयारी दर्शवली. कारण शालेय शिक्षणात भाषेचा पाया पक्का करून घेण्यात जी मजा आहे ती नंतरच्या शब्दजंजाळ शास्त्रार्थात नाही. म्हणून शालेय वयोगटाला शिकवण्यालाच प्राधान्य. पण १५ हजारावर शाळेत लागणं काही शक्य नव्हतं.

आज इतर कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्याचे वार्षिक उत्पन्न किती असते? २०२२ इ.स. मध्ये वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी एका पुरुषाचे आर्थिक उत्पन्न किती असावे. हो इथे मी स्त्रियांचा विचार अजिबात करू नका असे निक्षून सांगीन. कारण भारतातील स्त्रियांचा जन्म अर्थार्जनासाठी होत नाही. म्हणूनच शहरातल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था चालतात. 

रत्नागिरीतलं शैक्षणिक वातावरण शहरीच होतं. कोकणातलं एकूणच शैक्षणिक वातावरण अधिक प्रगत आहे. दोन्ही टाळेबंदीत रत्नागिरीत राहूनच दूरस्थ माध्यमातून शाळेत शिकवले. आर्थिक अस्थैर्यात निसर्ग सौंदर्याने मिळणाऱ्या मानसिक स्थैर्याचा आधार होता. डोंबिवलीत आलो की चिडचीड होई. रत्नागिरीतल्या शाळेत चिटकायचा प्रयत्न केला. तिथे पुरुष शिक्षक शाळा चालवत. पण शाळा हे उत्तपन्नाचे द्वितीय साधन. संस्कृत शिक्षकाला पगार- डोक्यावरून पाणी पंधरा हजार! भिक्षुकी आणि पिढीजात जमीन सांभाळून, पाच-दहा घरगुती शिकवण्या घेऊन शाळेचे काम करण्याचे व्यावसायिक कसब कोकणातल्या शिक्षकांत आहे. एका शाळेचं नाव घ्यायला हरकत नाही. शतक महोत्सवी वर्षं साजरा करणारी रत्नागिरीतली फाटक शाळा. आमच्या घरातून माडांआड तिची कौलं दिसावीत इतकी जवळ. संस्कृतचा शिक्षक तर हवा होता. पण त्याचे मानधन पाच हजार इतकेच देता येणारे होते. कोणीही असो! त्याने बाहेर काहीही करावं. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करून त्यात शिक्षण बसवले की काहींना ते सहज शक्य होतं. पे-रोल वर येण्याच्या मृगजळामागे धावत दशकानुदशके आर्थिक चणचण सहन करत ही तारेवरची कसरत करत, शैक्षणिक संस्थेची 'सेवा' करणारे तिथले शिक्षक पाहिले. जॅक लावून कुठे चिकटता येतंय का म्हणून प्रयत्न केले आणि सोडलेही.

दरम्यान, आकाशवाणीत संस्कृत वृत्तपत्र निवेदकासाठी दोन जागा निघाल्या. बाराशे रुपये खर्चून अर्जदार रक्कम आणि अर्ज पाठवले, दोन्ही जागांसाठी. ते अर्ज पोहचले का? त्यांचं पुढे काय झालं, काही समजू शकलं नाही. भारत फिरतांना संस्कृतच्या माध्यमातून चांगलं संपर्क जाळं विणलं होतं. आईही केंद्र सरकारी अधिकारी असल्याने तिचे दिल्ली दौरे झाले तेव्हा तिने चौकशी केली. पारदर्शकता नसलेला कारभार चांगलाच दिसून आला. तसाच अनुभव डेक्कन काॅलेजमधे निघालेल्या जागांविषयी आला. 

असो, हे सारे अनुभव घेतांना,
 "ह्या भारतभू पुत्राच्या कष्टाला किंमत यावी" 
हे शेतकऱ्यांची व्यथा सांगणारं प्रबोधन गीत आठवायचं. गरीब गरीब म्हणवणं ही मानसिक व्यथा आहे हेच खरं. ज्या संस्थेत हे गीत शिकलो, ज्या संस्थेने मला स्वतःतलं मीपण गवसायला मदत केली, त्याच संस्थेने दुसरीकडे भौतिक जगाच्या अर्थकारणा पासून दूर राहण्याची भ्रामक बौद्धिकं दिलेली होतीच. एक संस्था म्हणून तिला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. एक मोठा मागास विचारप्रवाह त्या भ्रामक "त्यागाच्या" संकल्पनेवर जगत असतो. काही जण सोयीस्कर पाठ फिरवतात. काहीजण अडकतात. काहीजण दरी ओळखून काठावरून टाळ्या वाजवतात, झेंडे मिरवतात. बाकी ही, झेंडे मिरवणारी लोकं अत्यंत धोकादायक. माणसाला माणूस म्हणून जगू न देण्यात त्यांचाच मोठा वाटा असतो. फक्त नामनिराळे राहण्याचे कसब झेंड्याचे पांघरूण मिरवल्याने कमावलेले असते.

दोन वर्षांच्या अनुभवातून हिंदू, हिंदुत्व, समाजकारण, कार्यकर्तापण वगैरे सगळ्यांतून मनापासून बाहेर पडलो, खूप दूर आलो. कारण एकच- भारतासारख्या भांडवलशाही स्वीकारलेल्या देशात कोणी कष्टानुरूप पैश्यांची माळ चढवत असेल, गुण ओळखून योग्य पगारावर काम देत असेल तर तो गुणसन्मान स्वीकारावा. खाऊन झाल्यावर संडासात फ्लश होणारे नारळ, ओल्या कचऱ्या स्वरूपी निर्माल्यात जाणारे हार आणि फुकाच्या थापा मग त्या दाखवण्यासाठी कौतुकाच्या का असेनात-थापाच! स्वीकारण्यात काही अर्थ नाही. खरा अर्थ -अर्थातच, अर्थालाच.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

चर्चा तर होणारच!

२६ नोव्हेंबर २०२२
सावित्रीबाईफुले नाट्यमंदिर, डोंबिवली
सी-२० आसनावर बसून पाहिलेला 
दु ४.३० चा प्रयोग

३ /५ ☆ तारांकन

आजच्या नाटकाची सुरुवात श्रद्धांजलीने झाली. आयुष्यभर अभिनयाला वाहून घेतलेला नट जेव्हा काळ्याच्या पडद्या आड जातो तेव्हा प्रेक्षक  प्रेक्षागृहातच बसून रंगमंचावरचा खेळ बघत असतो, रंगमंचाची सेवा करवून घेत असतो असं उगाच वाटून गेलं. नाटक होतं चर्चा तर होणारच. नवीनच नाटक. परीक्षणाने चर्चेत न आलेलं. त्यामुळे गर्दी जेमतेमच होती. पण आम्ही सी-20,21 म्हणजे समोरच्या रांगेत अगदी मधोमध बसलेलो. त्यामुळे नाटकातलं सौंदर्य आणि उणंधुणं स्पष्ट दिसत होतं. माझी निरीक्षणं नोंदवायचा हा छोटासा प्रयत्न.

*३ पात्रांचा २ अंकी प्रयोग*
 डाव्या-उजव्या विचारसरणीतील दोन कार्यकर्ते चर्चेसाठी रंगमंचावर उतरले होते. अस्ताद आणि अदिती! या चर्चेचं सूत्र हाताळत होते देशपांडे. बंगल्याचं सुंदर आणि भव्यदिव्य नेपथ्य पडदा उघडल्या पासूनच उत्सुकता वाढवत होतं. पात्र रंगमंचावर खेळू लागली तसे नेपथ्य वेशभूषेला झाकत होतं. तरीही वेशभूषेतील रंग विचारपूर्वक वापरलेले दिसून येत होते. डाव्या-उजव्या विचारसरणीतील कार्यकर्ते नट-नटी आणि अमेरिकन कंपनीने नियुक्त केलेला नाटकातला विदूषक. 

*भूमिका*
अदिती यांचा अभिनय उत्तम, प्रकाश झोत घेण्यातही त्या मागे न पडल्याने तो ठसठसून दिसला आणि नाटकात प्रभावी ठरला. बहुतांश उत्स्फूर्त टाळ्या त्यांच्या अभिनयाने घेतल्या.

त्या मानाने अस्ताद यांचा अभिनय फिका वाटला. किंबहुना अस्ताद यांच्या रंगभूमीवरील वावरातून  पिके चित्रपटातल्या प्रमुख नटाचा भास होत राहिला. प्रकाश योजना त्यांना साजेशी नव्हती. प्रेक्षकाभिमुख न होता नव्वद अंशाने होत केलेला अभिनय प्रक्षकांवर छाप पाडू शकला नाही. पण ह्या नटाच्या जमेची बाजू म्हणजे आवाजातील वैविध्य आणि प्रसंगानुरूप चढ-उतार. काही संवादांना टाळ्या आणि हाशे मिळाले ते शब्दफेकीतील कौशल्याने. 

"non देशपांडे" हे पात्र साकारणारे क्षितीज झारापकर यांचा अभिनय उत्तम होता. मुद्दमून घसा घाकरण्यामागचं कारण समजू शकलं नाही. त्यामुळे व्यत्यय निर्माण झाल्यासारखे वाटले. पण, विदूषकाच्या पात्राला त्यांनी पूर्ण न्याय दिलेला आहे.

*नेपथ्य, संगीत आणि प्रकाश योजना*
बंगल्याचे नेपथ्य मनोरम्य आणि भारदस्त आहे. संगीत अगदी मोजकेच आहे. त्यामुळे मधूनच येणारे ते आवाज अनेक ठिकाणी कृत्रीम वाटतात. नटीवर एका प्रसंगी पडणारा निळा झोत अतिशय परिणामकारक ठरतो. तर, नटावर कुठेही केशरी झोत न पाडल्याची कमतरता जाणवून येते. खिडकीतून येणारा प्रकाश झोत नाटकभर एकाच खिडकीतून येत असल्याने दिवसभराच्या वेळेचा आणि त्या प्रकाश झोताचा काहीच संबंध नसल्याचे समजवावे लागते. परंतु एकंदरीत, नाटकातील वळणावळणांवर वापरलेली प्रकाशयोजना अतिशय परिणामकारक ठरते, नाटकाला उठवते.

*कथानक*
पहिल्या अंकातील चर्चा फारच रटाळ, उथळ वाटत राहते. मध्यंतरापर्यंत लेखकाला नेमकं काय सांगायचंय हे समजू न शकल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होतो. 
हा विषय भांडवलशाहीतील समाजाभिमुख कार्यकर्त्यांची- (मग ती कुठल्याही विचारसरणीची असोत)- होणारी कुचंबणा याकडे नेता आला असता. पण लेखकाने पहिल्या अंकात कुठल्याच विषयाला न्याय न देता प्रेक्षकांना विनाकारण बौद्धिक त्रास दिला आहे. (काही प्रेक्षक पहिल्या अंकात झोपल्याची चर्चा प्रयोग संपल्यावर प्रेक्षागृहाबाहेर रंगली होती.)

नाटकातील दुसरा अंक -पहिल्या अंकात पडलेलं नाटक उठवतो आणि प्रेक्षकांना खूष करतो. दुसऱ्या अंकात कथानकाने घेतलेली अनपेक्षित वळणं, तोतयेपणा आणि खरेपणांचं प्रकटीकरण प्रेक्षकांची मनं जिंकतं. पैसे अगदीच वाया न गेल्याचं समाधान देतं. 'अंतभला तो सब भला' म्हणणाऱ्यांनी हे नाटक नक्की पाहिलं पाहिजे कारण प्रेक्षागारातून बाहेर पडणारा प्रेक्षक आनंदाने आणि संतोषाने बाहेर पडतो.

-गंधार डोंबिवलीकर. ("खरं आडनाव लिहील्याने लोकांची बघण्याची मानसिकता बदलते."- इति नाटकातील नटी.)

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

ल श चे लेखन नियम- मराठी भाषेची दिशाभूल


१२.११.२०२२

मराठीचे संवर्धन करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारे ल आणि श लिहिण्याचा नियम मराठी भाषेचा 'वेगळपणा' दाखवेल असे मत काही मराठी अभ्यासकांचे आहे. पण ते भाषेची दिशाभूल करणारेच!... 

प्रमाण ध्वनींचे चित्ररूप प्रकटीकरण म्हणजे लिपी. हिंदी, संस्कृत, नेपाळी, कोंकणी, मराठी या सर्व भारतीय भाषा स्वतःचं उच्चारण देवनागरी लिपीतून नोंदवतात. भारतीय लिप्यांचे मूळ ब्राह्मी, शारदा आणि ग्रंथ लिप्यांमधे आहे. लिहिण्याची साधनं जसजशी बदलत गेली तसतसे लिपींमधे बदल होत गेले. शिलालेख-बोरु-कापड-टाकदौत-कागद-लेखणी-टंकनसामग्री.
छापखान्यात कमी खिळे लागावेत म्हणून अ वर वेलांटी-मात्रा देऊन सगळे स्वर छापण्याची पद्धत सावरकरांनी त्या काळात सुरू केली होती. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर ती मागे पडली.
 भाषा आणि लिपींचा विकास राजाश्रयावर अवलंबून असतो. शिख धर्मगुरु गुरुगोविंद सिंहांनी शारदा लिपीचा वापर करून गुरुमुखी लिपी लिहविली. आजची पंजाबी भाषा गुरुमुखीत लिहिली जाते. शिव काळखंडानंतर मोडी लिपीला राजाश्रय मिळाला. मराठी भाषा मोडीत लिहिली जात असे. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही महाराष्ट्रातील शाळांमधे मोडी शिकवली जात होती. मोडी ही काही भाषा नव्हे! देवनागरी लिपीतील नियम मोडून बनवलेली एक लिपी म्हणजे मोडी. उत्तर कर्नाटकात कन्नड देखील मोडीतून लिहिली जात. तसेच उर्दूही मोडीतून लिहिली गेल्याचे दिसून येते. संस्कृत, पाली, अर्धमागधी, विविध प्रांतातील आणि काळखंडातील प्राकृत या सगळ्या भाषांनीच देवनागरी लिपी स्वीकारल्याने भारतातील मोठ्या प्रांतात देवनागरी लिपीच वापरली गेली आहे. मगाशी उल्लेख केल्या प्रमाणे सगळ्याच भारतीय लिप्यांचा उगम आणि विकास ब्राह्मी लिपीतून झाला. अगदी तमीळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगूचा देखील!
त्यामुळे त्यांच्यात उच्चारण स्थानात्मक रचनेचा एक समान धागा दिसतो. कुचुटुतुपु! आता हे काय प्रकरण? हे उच्चारण स्थानांनुसार केलेले वर्णविभाजन सगळ्याच भारतीय भाषांमध्ये आहेत आणि त्यांच्या लिप्यांमधेही. काही भाषांनी काही वर्ण गाळले तर काहींनी त्यात भर घातली. तमीळ मधे प आणि ब साठी दोन वेगळे वर्ण नसले तरी "ळ्ह" साठी वेगळा वर्ण, ऴ साठी वेगळा वर्ण आहेच. तरीही त्या वर्णमालेच्या बांधणीचा साचा आपल्या देवनागरी सारखच. आधी स्वर, मग कुचुटुतुपु व्यंजनं आणि मग य पासून ऴ पर्यंतचे वर्ण!
आहे की नाही भारतीय लिप्यांमध्ये भारतीय एकत्व?
भाषेच्या प्रमाणीकरणासाठी लिपीवर बंधनं टाकणं म्हणजे लिपीचे दुर्बलीकरण! मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी एका समृद्ध लिपीचे पाश आवळले जाणे भाषेच्या विकासात स्वतःहून खंड घालण्यासारखे आहे. भाषेचा विकास हा भाषा वापरून होतो. वास्तविक लिपी आणि भाषेत परस्परसंबंध अजिबात नसतो. आज संस्कृत भाषा प्रत्येक भारतीय लिपीतून आणि असंख्य अभारतीय लिपीतून लिहिलेली दिसून येईल. अधिकृत रित्या देवनागरी लिपीतूनच संस्कृत लिहिण्याचा प्रघात असला तरी, विविध चिह्नांचा वापर करून रोमन लिपीला समृद्ध करण्याचे काम संस्कृतने केले. संस्कृतमधील उच्चारणांनी केले. उदा. ळ आणि ण रोमन मधे लिहिण्यासाठी ļa, ņa अनुक्रमे वापरतात. किंवा पञ्चमातला ञ लिहिण्यासाठी ña अश्या चिह्नांसहित रोमन अक्षरांचा वापर केला जातो. एकुणातच विविध उच्चारणं स्वीकारून लिपी समृध्द होत जाते. y सरळ रेषेने काढावा की v च्या खाली छोटी दांडी ठेऊनच काढावा असल्या नियमांनी कुठल्याही भाषेचे विशेषत्व साध्य होत नाही.
भाषा हे मनामनांना जोडण्याचे माध्यम. तिचा प्रवास एखाद्या नदीसारखा. अनेक उपनद्यांतून आलेली सत्त्वे स्वीकारायची आणि आपल्या दोहो तीरांवर सोडत जमीन सुफल करायची. पाणी हे माध्यम. भाषेची सत्त्व प्रवास करतात लिपींतून. भारतातील भाषा बदलल्याने दोन संस्कृती विभागलेल्या दिसत नाहीत. तर, लिपीने विभागलेल्या दिसतात. जव्हार-त्र्यंबक प्रांतातील बोलीत किती गुजराती, किती मराठी, किती खांदेशी, किती आगरी शब्द? कोण खिजगणती? पण तो प्रांत राहिला महाराष्ट्रात म्हणून त्यांची लिहीण्याची लिपी देवनागरी. आणि सापुताऱ्याच्या बोलीची लिपी? गुजराती! शब्द तेच. लिपी बदलल्याने शब्द एकमेकांना पोहचवण्याचे माध्यम बदलते. जे मराठी-गुजरातीचे तेच मराठी कानडीचे. एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली की नदीचे पाणी अडून त्याचं डबकं व्हायला वेळ लागत नाही. वाहणे थांबले की, शेवाळे लागायचेच आणि पाय निसटायचाच. "आमची मराठी" अगर "आमची हिंदी" या दुराभिमानापायी एखादा नियम बनवला जात असेल तर तो चुकीचाच नाही का? त्याने अहंकाराचे पडदे निर्माण होऊन मुक्त देवाणघेवाण थेंबते.
माणूस जन्माला आल्यावर प्रत्येकाला आपापलं अस्तित्व टिकवायचं असतं. वयात आलेल्या मुलाच्या मताला घरात मान द्यावा लागतो. प्रस्थापित भाषेची वेगळी गोष्ट का असणार आहे?
भाषेच्या कुरघोडीचं राजकारण आणि त्या विरोधात केले जाणारे त्रोटक उपाय स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे आहेत. ते थांबवत स्वतःची मूळे पसरवून बाजूच्या झाडाबरोबरीने उभे राहणे आणि उंची गाठणे गरजेचे आहे.
हिंदी लादली जात असल्याचे वास्तव नाकारता येणारे नाही. त्याला उत्तरादाखल असले नियम बनवणे हा भामटेपणा आहे. त्याने मराठीचा विकास झाला का? याचं उत्तर नाहीच असेल! भाषेत नवशब्द निर्मिती करून भाषेचा विकास होतो. मराठीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मराठी भाषा वापरता यावी यासाठी किती प्रयत्न झाले? विविध शैक्षणिक क्षेत्रातील मराठी प्रयोग वाढावा म्हणून एखाद्या अभ्यास मंडळाची दीर्घकालीन नियुक्ती झाली का? त्यात भाषातज्ञ होते की फक्त भावोत्कंठ प्रमाणपत्रधारी मराठीवादी? भाषा आपासात जोडण्याचे माध्यम आहे. एकमेकांवर कुरघोडी करून शत्रु वाढवण्याचे साधन नाही. "हिंदी आमची राष्ट्रभाषा नाही. आम्ही तिला स्वीकारणार नाही." हे दक्षिणभारतीयांप्रमाणे महाराष्ट्राला जोवर ठामपणे सांगता येत नाही तोवर हिंदी लादली जाणे थांबणार नाही. मग, दोन भाषेंतील भेद दाखवण्यासाठी एका समृद्ध लिपीचा बळी का घ्यावा? रेल्वेने महाराष्ट्रात मराठीचाच वापर करावा, राष्ट्रिय महामार्ग विकास प्राधिकरणाने महाराष्ट्रातील रस्त्यांवर मराठीच वापरावी, महाराष्ट्रातील प्रत्येक बँक सुविधा मराठीतच उपलब्ध व्हावी ह्या आणि अश्या कित्येक मराठी व्यवहाराच्या आग्रहास्तव कुठलीही पाऊले न उचलता देवनागरी लिपीवर घाला घालणारा इतका तकलादू आणि पोकळ नियम का बनवावा? इतकी लाचार आणि भिकार पातळी गाठणे हे मराठी भाषेचे दुर्दैवच.
एखादी गोष्ट अश्याच प्रकारे करायची असा नियम जेव्हा केला जातो तेव्हा त्याला पाश आवळणे असे म्हणतात. हिंदी असो वा मराठी असो दोन्ही भाषा देवनागरी लिपी वापरतात. दोन्ही भाषिकांनी स्वैर पणे लकार अगर शकार लिहिला तर कुणाचं नुकसान वा फायदा आहे?
या उलट देवनागरी लिपीत सगळ्यांनीच सरसकट एका प्रकारे लकार किंवा शकार वापरायचे ठरवले तर गोष्ट निराळी. पण आता अभ्यासकांचा वेळ आणि श्रम "हे" मराठीचं वेगळं आणि हिंदीचं वेगळं यावर विचार करण्यात अधिक खर्च होईल. नवीन शब्दनिर्मिती ऐवजी असलेले शब्द असेच लिहिले जायला हवेत हट्टावर श्रम आणि वेळ खर्च होईल. गांधी बरोबर की गान्धी या चर्चेचे चर्वितचर्वण लिपीची मुक्तता नाहिशी झाल्याने ज्याप्रमाणे केले जाते त्याच प्रमाणे करण्यासाठी अजून एक विषय वाढेल.
कारण असल्या पोकळ प्रमाणीकरणाने भारताचे एकसंधत्व धोक्यात येते.
ईशान्यभारतातील बोलींसाठी देवनागरी लिपीचे सक्षमीकरण करणे आणि त्यांच्यावर हिंदी न लादता त्यांच्या बोलींना भारतीय लेखनस्वरूप प्राप्त करून देणे ही आजच्या भारताची खरी गरज आहे. त्या उलट हे कूपमंडूक वृत्तीचे तथाकथित प्रमाणीकरण.
या नियमांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. किंवा लेखन-टंकन सामग्रीचा विचार करता आजच्या तंत्रज्ञानाची ती गरज आहे असेही नाही. केवळ हताश भावनाह्वेगाने असला नियम बनवणं आणि भाषेची दिशाभूल करणं चुकीचंच.
-गंधार.