मंगळवार, १६ मार्च, २०२१

आजपासून वर्षभरापूर्वी... भाग पहिला

आजपासून वर्षभरापूर्वी...
बरोब्बर एका वर्षापूर्वी मी रत्नागिरीचा प्रवास केला होता. ट्रेनचं आरक्षण शेवट पर्यंत मिळालं नव्हतं. म्हणून बाबांनी गाडीने मला तिथे सोडलं... सतरा मार्च 2020!
भोवताली बऱ्याच गोष्टी वेगळ्या घडत होत्या. समाज माध्यमांवर, वृत्तवाहिन्यांवर भारता बाहेरच्या देशांमध्ये "टाळेबंदी" सुरू असल्याची बातमी होती. एक विषाणू शरीरातला प्राणवायू शरीरापासून तोडून टाकतो आणि ताप आल्यावर लोकं तडफडून मरतात अश्या प्रकारच्या चित्रफिती पसरल्या होत्या. भारतात नुकताच शिमगा होऊन गेला होता. तसल्या चित्रफिती बघून भारतीयांनी विषाणूच्या नावाने शिमगा घातला होता. विषाणू हा चर्चेचा आणि चेष्टेचा विषय बनून राहिला होता.
आम्ही रत्नागिरीच्या प्रवासात परस्पर चिपळूणलाच जेवणासाठी थांबलो, एका हाॅटेलात. मुंबई-गोवा महामार्ग बऱ्यापैकी रिकामा होता. महाराष्ट्रात पंधरा तारखेपासूनच अर्धीटाळेबंदी लागू करण्यात आली होती. पण, मुख्यमंत्र्यांच्या त्या निर्णयाचीही चांगलीच थट्टा उडवली गेली होती. काही लोक भीऊन घरी बसले होते, भारताबाहेरच्या वृत्तांवर विश्वास ठेवत होते. तर, माझ्यासारखे काही निश्चिंतपणे फिरत होते. आम्ही रत्नागिरीला पोहचलो. बाबा दोन दिवसांतच निघणार होते. त्यांच्या बरोबर त्यांचा मित्रही होता. परतीच्या प्रवासात सोबत म्हणून आलेला. त्यांना गणपतीपुळे-पावस चं दर्शन व्हावं म्हणून तिथे जाण्या विषयी चौकशी केली. तर समजलं पंधरा तारखेपासून मंदिरं बंद आहेत. कुठेही न जाता बाबा आणि त्यांचा मित्र एकोणीस तारखेला डोंबिवलीला परतले. मी माझी सायकल रत्नागिरीला नेली होती. तिचा टायर बदलायचा होता. टायर डोंबिवलीहूनच घेऊन गेलो होतो. ते काम करून सायकल सज्ज केली. आता रत्नागिरीत मी, माझी सायकल आणि माझी पुस्तकं असेच आम्ही राहणार होतो.
मोदींनी रविवारी एकदिवसाच्या संपूर्ण टाळेबंदीसाठी आवाहन केलं होतं. तो पहिला रविवार जवळ येत होता.
रत्नागिरीतलं घर तसं नवीनच. स्वयंपाक घरात जेमतेम सामान होतं. बाबांनी जाण्या आधी पंधरा वीस दिवसांसाठी पुरेल इतका किराणा आणि काही भांड्यांच्या वस्तू वगैरे डी मार्ट मधून आणल्या होत्या. माझा स्वयंपाकाचा छंद मी रत्नागिरीत जोपासणार असल्याने जास्तच आनंदात होतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शिकवण्या सुरू करायला डोंबिवलीत जायचं ठरलं होतं.
तो पाश्चात्य वैद्यकशास्त्राला सापडलेला विषाणू, राजकीय निर्णयाने लादलेली टाळेबंदी या सगळ्या गोष्टींकडे फारसं लक्ष न देण्याचं मी मनोमन ठरवलं होतं.
रत्नागिरीतल्या नवीन घराचा शेजार कसा आहे हे माहीत नव्हतं. रस्तेही डोक्यात बसले नव्हते. टिळक आळी काँग्रेस भवनापाशी संपते, वरची आळी गोखले नाक्यापाशी आणि गोखले नाका ते काँग्रेसभवन या रस्त्याला जोशी पाळंदेचा रस्ता समांतर आहे. हे समजायला शनिवार पर्यंत सात-आठवेळा सायकलवरून अनेकदा चुकत त्या रस्त्यांवर फिरावं लागलं. रत्नागिरीच्या रस्त्याचा थोडासा अंदाज आला होता. पण दोन रस्त्यांचाच! इमारतीत पहिल्या मजल्यावर मामा राहत असल्याने तसा निश्चिंत होतो. पण, तो अर्णब गोस्वामीचा भक्त होता. त्यामुळे बाबा डोंबिवलीला परतल्यावर मी एकटा रत्नागिरीत कसा राहू शकीन याबाबत त्याला चिंता होती. तो वृत्तवाहिन्या बघून घाबरून गेलेला होता. त्याने अनेकदा डोंबिवलीला जाण्याविषयी विचारलं, विविध मार्ग सांगितले.
पण, मी एकट्याने रत्नागिरीत राहण्याचा निश्चय केलेला होता.
17/3/2021
डोंबिवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा