तोट्यातली नोकरी = राजीनामा
गरजा आणि पुरवठा, श्रम आणि मोबदला, वेळ आणि किंमत, कर्म आणि धर्म-
ह्या द्वंद्वांवर योग साधण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. शेवटी, तोट्यातली नोकरी सोडावी लागली.
दीड वर्ष ज्या संस्थेसाठी स्वतःची यांत्रिक उपकरणं (मोबाईल, लॅपटाॅप, हेडफोन, इंटरनेट) वापरत निरपेक्षपणे काम केलं. त्यातील एखादं उपकरण आता कधीही बंद पडलं तर,
नवीन घेण्याचं आर्थिक सामर्थ्य जी संस्था देऊ शकत नाही, पाठीशी उभी राहू शकत नाही,
त्या संस्थेसाठी केलेली नोकरी तोट्यातली आहे असे समजावे.
दीड वर्ष सातत्याने वेगळेपणा दाखवणारे, नाविन्यपूर्ण उपक्रम केले,
त्या कष्टाची व गुणवत्तेची किंमत संस्थेला समजत नसेल तर
त्या संस्थेसाठीची नोकरी तोट्यातली आहे असे समजावे.
शाळेत राजीनामा टाकतंना, "तुमचा धर्म कुठे गेला होता?" असा विचारलेला प्रश्न संस्थानिकांना अपमानास्पद वाटला.
"हितं मनोहारि च दुर्लभं वचः" (हिताचे आणि मनाला आनंद देणारे शब्द एकाच वेळी मिळणे दुर्लभ आहेत.) मग कमी खर्चात चांगल्या कामाचा आनंद कसा मिळेल? स्कल कॅण्डीच्या भावात बोसची अपेक्षा कश्याला?
चांगला शिक्षक टिकवायचा असेल तर नवऱ्यावर अवलंबून असलेल्या गृहिणीचा हातखर्च भागावा इतका तुटपुंजा पगार कसा चालेल?
नुस्ती पाठ थोपटावून तोंडभर स्तुती उपयोगाची नाही. "तुरीयं हि वाचो मनुष्या वदन्ति" (मनुष्य तुऱ्या सारखी उडती आणि दिखाऊ वैखरी वाणी बोलतात.)
भारतभ्रमणानंतर हा अनुभव रोजचाच! त्या शब्दांना न भुलणे परिस्थितींनी शिकवले.
खरं तर, निसर्ग देवतांनीही तीनही ऋतूंमध्ये तोट्याचे संकेत दिले. अनपेक्षितपणे तीन ऋतूंत तीनदा चष्मे बदलावे लागले, आयुष्यात पहिल्यांदाच! म्हणूनच ते विशेष संकेत. उन्हाळ्यात पेपर तपासतांना नंबर वाढला म्हणून, पावसाळ्यात वरुणदेवतेने चष्मा उडवून नेला म्हणून आणि हिवाळ्यात न समजता एकाएकी चष्मा नाहीसा झाला म्हणून. मला हे मक्तूब वाटलं.
सर्वसामान्य प्राथमिक गरजा मिटवणं सोडलं तर, ह्या नोकरी अंती माझ्या हातात फारसं काही राहिलं नाही. संस्थेने शिक्षकाचे राहाणीमान टिकवून ठेवले तर शिक्षक शाळेची गुणवत्ता टिकवू शकतो इतकं साधं गणित संस्थेला समजलं नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे. फी न भरणाऱ्या पालकांनाही ते समजलेलं नसतंच!
असो,
राजिनाम्याने माझा अहंकार सुखावला आणि संस्थेला परवडणारा दुसरा शिक्षक मिळाला, याबद्दल आनंदच आहे.
मुलांना सोडतांना वाईट वाटतं. पण, ह्या भांडवलशाही स्वीकारलेल्या देशात व्यवहार कुणालाही सुटत नाही हे सातत्याने अनुभवाला येतं. शाळा पालकांना दुसरी शाळा शोधायला सांगू शकत नाही आणि पालक अंथरूण बघून पाय पसरवत नाहीत, सरकारही शिक्षणात राजकारण शोधतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
दर वर्षी एक विषय "स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम्" या व्रताला धरून एका जिज्ञासू विद्यार्थ्याला पैश्याचा गंधही न लावता शिकवतो. तो वेळ माझ्यासाठी भांडवलशाहीमुक्त आनंदी अध्ययनाचा असतो. बरं वाटतं. कारण पैश्याने लादलेल्या अहंकार आणि स्वाभिमाना पलिकडचा तो वर्ग असतो. स्वतःचा अभ्यास विस्मरणात न जावा म्हणून घेतलेला. कोणालाही पैश्याने विकत घेता येत नाही. आर्थार्जनासाठी अस्तित्वात आलेल्या संस्थांनी कुणाच्याही गुणवत्तेचा अनादर न करता हात खुले ठेवावेत इतक्याच अपेक्षेने मी संस्थेचं छत्र शोधत असतो. पण संस्थाच जेव्हा तोट्यावर उभी असते, दोन हात (देणारे आणि घेणारे) खुले सोडत नाही तेव्हा, तिथे फार काळ टिकता येत नाही.
भारत गरीब देश नाही. हे ओडिशा-अरुणाचलातल्या श्रीमंतीने दाखवलं. गरिबी आपण स्वतःवर लादून घेतो. संस्थानिकांनी कष्टाला न दिलेल्या किंमतीने आर्थिक दरी मात्र निर्माण केली जाते, प्रत्येक क्षेत्रात. मी त्या दरीत पडू नये म्हणून हा राजीनामा!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा