व. पु. काळे एकटेपणा आणि एकांत यातला भेद खूप छान समजावून सांगतात.
मृत्यूचा प्रवास एकांताचा असतो. पाच पती असलेल्या द्रौपदीचं मरणही एकटेपणात होतं. "नाथवती अनाथवत्" असं द्रौपदीचं विशेषण ईरावती कर्वे सांगतात.
शेवटी तिथे माणसाला एकटंच जावं लागतं.
त्या एकांताच्या प्रवासाला निघतांना
एकटेपणा न जाणवणं म्हणजे,
आयुष्य जगल्याचं सर्टिफिकेट असतं. असं मला वाटतं.
कारण,
..........................................................
यम.
यमाचा रेडा.
आणि माझं
जन्मजात नातं आहे.
त्याला माझा पुळका कधी येईल
ते काही सांगता यायचं नाही
त्याच्या हाकेला नाही म्हणणं
मला काही जमायचं नाही.
तो दाराशी आला
की,
"साजण दारी उभा, काय आता करू..."
वगैरे आठवायचाही अवधी नसेल
कोणाला सावरावं
कोणाला आवरावं
काही माझ्या हाती नसेल
कश्यातही न गुंतता
कुणातही न अडकता
सहज त्याच्या बरोबर
जाता यायला हवं.
माझ्यासकट तू, तो, ती, ते
यादगारीपुरतेच थांबलेत
एवढंच लक्षात ठेवायला हवं.
शेवटी मरणानंतर उरतं काय?
छोटीशी यादगारीच ना?
ती
मला निर्माण करता यावी
एवढाच वेळ
दिलाय मला त्याने
यादगारी तयार झाल्यावर
मारलीच कधी मी त्याला हाक
तर माझी निराशा नाही करणार तो
आणि
मला कधीही बोलवायला आलाच तो
तर
मी का करावी त्याची निराशा?
जाईनच आनंदाने
हसत...
एकमेकांना समजून घेण्यात
आहे जे रहस्य
तेच खरं जन्मजात
सुरू झालेलं नातं.
यम.
यमाचा रेडा आणि
माझं...
-सम्प्रिः।
माघ पौर्णिमा 2020ख्रि.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा