सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

अभ्यंग

थंडीच्या परिणामापासून सूर्य काही सुटू शकला नाहीये. मणसांसारखा तोही सुस्तावलाय. वातावरणातल्या आह्लाददायी गारव्याने तोही लोळत असतो क्षितीजावर बराच वेळ. झोपायला मात्र आईच्या कुशीत इतक्या लगेच शिरतो की समजणेही कठीण! आळशीपणा रोमारमात संचरलाय त्याच्या.
परीक्षेचा सोपस्कार पूर्ण झाल्यावर आता पुन्हा सकाळचे सायकलिंग सुरू झाले आहे. नाहीतर मागच्या पंधरा रात्रीत 90 फुटी रस्त्याला माझी आणि लोहराणीची सवय झाली होती.
सकाळी बाहेर पडलो तेव्हा दक्षिणायनातला तो असाच रेंगाळत, केशरी वर्णाने गारवा शमवण्याचे निष्फळ प्रयत्न पृथ्वीवर लोळतंच करत होता!मुंबईच्या दक्षिणेकडील पुणे दक्षिणत्वामुळेच सुस्त असावे. सूर्यानेच सुचवले!
योगेश वेळेत येऊन वाट बघत बसला होता. अर्णव आणि मी वेळेच्या मागे धावत सायकलींना धूर ओकणाऱ्या वाहनांमधून धाववित होतो. नेवाळीला जाण्याचा बेत होता. पण योगेशने ऊंबर्ली बघितले नव्हते. जातानाच तलावावर गेलो तर सूर्योदय बघता येईल म्हणून तसेच ठरले. रोहनने टांग दिल्याने रचितचे आशिर्वाद त्याला मिळाल्याची व त्याने स्वीकारल्याची खात्री पटत होती.
निघायला उशीर झाल्याने रहदारी खूप वाढली होती. अश्वशक्तीधारी वाहनांमधून आमच्या अश्वासम धावणाऱ्या राण्यांना वाट काढावी लागत होती. सामंत पेट्रोल पंपाच्या चढावर उजवीकडे बस आणि तीन चाकी वाहनांची शर्यत चालू होती. कोणाला उजवी कडे वळत मानपाडा रस्त्याला वळायचं होतं. कोणाला डावीकडे भाडं दिसत होतं. त्या चढा ओढीत सामील होऊ इच्छिणारी MH 03 WA 1389 एर्टिगा सायकलच्या मागे येऊन किंचाळू लागली. पण सायकलच आमची, जागा ती केवढी व्यापणार?
एर्टिगास जागा देणे शक्य नव्हते. पण काणठळ्या अनावर झाल्या म्हणून मागे बघितले. काचे मागील पांढऱ्या कपड्यातील काळ्या चेहऱ्यावर राण्यांविषयी हेकस भाव सूर्यप्रकाशामुळे लपू शकले नाहीत. मनपाडा फाट्यावर तिला पुढे जायला जरा जागा मिळाली. चेहऱ्यांनी हातवारे वरून तोंडावरील भाव हातात अवतरविले. तो अपमान आमच्यातले कोणीच सहन करत नाही!
त्याची मिजास उतरवण्याचा निश्चय मनाने केला. इतर अश्वशक्तीधारी वाहनांनीच एर्टिगाचे रस्ते अडवत, आमचे रस्ते मोकळे करत आमची मदतच केली. सामंत पेट्रोल पंपासमोरच्या गतिरोधकावर एर्टिगाने ब्रेक दाबले. आमच्या अश्वांनी जणू अश्वशक्तीधारींचे पाश खेचून धरले होते. प्रिमीयर काॅलनीच्या पुढे उतार होता... पण एर्टिगाला तीन गतिरोधकांचा सामना करायचा होता... काचांमधल्या मंडळींचा असंतोष वाढवायचा म्हणजे एक सायकल पुढे, एक मागे. अशी स्थिती होती. अर्णवने स्प्रिंटचा पवित्रा घेतला होता. तो तिचे रस्ते सफाईदार पणे अडवत होता. वास्तविक लेनची शिस्त न पाळण्याचा पवित्रा एर्टिगाने घेतलेलाच होता. मीही लोहराणीचा झालेला अपमान विसरणार नव्हतो.चालकाच्या काचेपर्यंत पोहचून त्याच्या हातवाऱ्यांना हातानेच उत्तर दिले होते. उंबर्लीचा रस्ता केव्हाच मागे पडला होता. प्रीमियरच्या पेट्रोल पंपापुढे आल्यावर चालक नरमला असल्याचे एर्टिगाच्या चालनातील फरकाने दिसून आले.
योगेशसाठी हा प्रकार नवीन होता. नेवाळी फाट्याला जायचे म्हणून काटई फाट्यावर डावीकडे वळलो... शेवटपर्यंत एर्टिगा अर्णवच्या मागे आणि चालकाच्या काचेतून मी दिसीन अश्या अनवसानाने माझ्या पुढे होती. डावीकडे वळण घेऊन थांबलो. तेव्हा "भेंडी मजा आली! चांगली उतरवली त्याची...रोहन असला पहिजे होता. अजून मारली असती..." वगैरे चर्चा झाली... सूर्य क्षितीजावरच रेंगाळत होता. "येतांना उंबर्लीला जाऊया आता," ऐकून योगेशही हसला.
एकूणच गर्दीत इतरांना रस्ता दिसत नसला तरी आम्हाला फक्त पोहचण्याचे ठिकाणच दिसत असल्याने रस्ता काढायचे काम राण्यांचे असते!
अश्वशक्तीधारींचा मिजास उतरवणे अश्वां (काळा घोड्या)खेरीज इतर कोणाला जमणार?
रोजचीच जीवघेणी पण अस्तित्वासाठीची स्पर्धा संपवून पाईपलाईन मार्गाला एका संथ गतीने लागलो. कोरड्या वातावरणामुळे चिकचीकाट नसला तरी वेगामुळे घामाने कपडे ओले केले होते. वाऱ्याच्या झुळूकांनी ते पाण्याचे शीतत्व अधिक स्पर्शविले जात होते. अंबरनाथ-तळोजा-डोंबिवली हा महाराष्ट्रातला मोठा औद्योगिक पट्टा आहे. त्यातून जाणारा हा रस्ता. शुद्ध हवेची फक्त हवा! धूर, धुके आणि रसायनांचा वास रोजचाच... "रोज माझी भेट होते प्राणघाती वायूशी..." कधीतरी लिहीलं होतं ते आठवलं. वास्तविक सह्याद्रीच्या टेकड्या इथे मान उंच करू पाहत आहेत. असा हा निसर्गाने वरदहस्त ठेवलेला परिसर. पंतप्रधान आवास योजनेसाठी त्यांना कापायचे काम शिताफीने चालू आहे. महाराष्ट्राबाहेरील लोंढ्यांच्या निवासासाठी इतके गृहप्रकल्प राबवले गेलेत. पण एकही प्रकल्प इथले वातावरण संतुलीत करण्यासाठी आलेला नाही. वातावरण मतं देत नाहीत. माणसं देतात!😂
असो. तर सायकलिंग करतांना असली विद्रूपता दिसली की मन खिन्न होतं. पण परततांना उंबर्लीला जायचय हा विचार सुखावतो. दापोली अभ्यास दौऱ्यानंतर "कोकणातल्या माणसाचा अल्पसंतुष्टी पणा स्वीकारायला हवा." असा निश्चय केला आहे. त्रास कमी होतो. नेवाळीला चहापान झाल्यावर उंबर्लीच्या रस्त्याला लागताच योगेशने प्रशंसात्मक थाप दिली. "शहरापासून खूप दूर आल्या सारखं वाटतंय." नुकतीच कापणी होऊन सोन्याच्या पेंढ्यांचे रीघ ऊन खात होते. शांत आणि स्तब्ध तलावाने आमचे स्वागत केले. तोही सुस्तावला असावा! येतांना मानपाडा रस्त्याने आलो. तिथेही स्पर्धा चालूच होती. शंभरेक अश्वशक्तीधारींना मागे टाकत चार रस्त्यापर्यंत पोहचलो. योगेश हरवला होता! त्याचा फोन अर्णवकडे होता. या चुकामुकीचे फळ जरा अधिकच गंभीर असल्याची जाणीव झाली.
मोबाईल- संभ्रमित करणारा भ्रमणध्वनी! योगेश ने चार रस्त्यापर्यंत एकाच बाजूने चार फेऱ्या मारल्या. पण आम्ही गर्दी पासून जरा दूर रस्ता ओलांडून उभे होतो. गर्दीत काही तो दिसला नाही. त्याच्या घरी पोहचवायला जावे लागणार या तयारीत आम्ही आमच्या घरी परतलो ते नंतर हाताश होऊन रागाने लाल झालेला योगेशचा चेहरा बघण्यासाठीच! तो मितभाषी पण कृतीशील आहे. त्यामुळे यापुढे एकत्र सायकलिंगला आला तर माफ केले नाहीतर नाही. हे नक्की!
सम्प्रिः।
-सौर 17 कार्तिक 1939.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा