शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

नाविन्य

रोजच्या उगवत्या सूर्याला जितके नाविन्य आहे, तितकेच रोज भेटणाऱ्या व्यक्तीला. क्षणोक्षणी मिळणारे अनुभव किंवा घडणारे प्रसंग व्यक्तीला घडवत असतात. ही व्यक्तीची जडण घडण दुसऱ्या माणसाला व्यक्तीतील बदल म्हणून दिसत असते. बदल बाह्य असतो आणि घडण आंतरिक असते हाच काय तो दोन शब्दांतील अर्थांचा फरक.
असो, तर मनात असलेली एखाद्या व्यक्ती विषयीची अढी ज्या कारणाने निर्माण झालेली आहे त्या कारणा विषयीचे परीक्षण, ती व्यक्ती भेटली असता प्रतिक्षणी झाले तर जगातला द्वेष वाढेल का?
मनाच्या चौकटीच्या बाहेरची गोष्ट घडली की मगच तर द्वेष निर्माण होतो!
ती चौकटच नाहिशी केली तर?
तसे व्हावे म्हणूनच कदाचित् स्वामी विवेकानंद भारत फिरले आणि जागतिक पातळीवर "brothers & sisters", असा सूर लावून प्रशंसा मिळवली. ती चौकट नाहिशी झाल्यामुळेच भारत दौरा चालू असतांना सचिन गावकरच्या डोळ्यात नकळत पणे कृतज्ञतापूर्वक ढळा ढळा पाणी आलं असेल. रामदास स्वामींना मनाचे श्लोक स्फुरले असतील आणि तुकारामांना अभंग!

प्रवास रोजचा तोच असू देत
भेटणारी माणसंही तीच असू देत
तीच जागा,  घड्याळातली तीच वेळ
तरीही नाविन्य तेच कसे असेल?
तेही नवीनच दिसेल, प्रत्येकातले
अगदी रोजच्या सूर्यासारखेच!

"सूर्य एकंच़ रोज़ दिसणारा
नाविन्यपूर्ण स्वभावांच़ा
सूर्य मानवी दृष्यांच़ा
अनुभव- उत्तर-दक्षिणायनाचा
प्रवास- एका काळाचा..."
-सम्प्रिः।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा