सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

डोंबिवली-पुणे-डोंबिवली


सकाळपासून ठणकावून, मी स्वतःला आवरलं
ट्रेन गेली समोरून तेव्हा मन मात्र पाघळलं
पुणे-इंदोर, डेक्कन, उद्यान, आणि नगरकाॅइल्
इंद्रायणी, इंटरसिटी, 7.02 कर्जत daily
मिनीटासह त्यांच्या वेळा मुखात माझ्या रेंगाळती
जागांसह सूर्याचे रंग डोळ्यांत माझ्या लखाखती...
खरंच हल्ली या गाड्या डोळ्यांसमोरून जाणं देखील फार nostalgic असतं. अनेक तास, वेग-वेगळ्या ऋतूंत, वेग-वेगळ्या situations मध्ये यांच्या बरोबर वेळ घालवल्याने असेल. पण या अजूनही आपल्याश्या वाटतात... आता एक-दोन महिन्यात पास संपून एक वर्ष होईल. पण अजूनही तिकीट काढून गेल्यावर त्या सगळ्याच माझ्यासाठी खुल्या असतात. जुना पास दाखवल्यावर टिसीही ओळख दाखवतो.
प्रत्येक ट्रेन बरोबर केलेला प्रत्येक प्रवास वेगळा आणि अनोखा होता. पण त्यातले काही क्षण वाचायला बोर होणार नाहीत असे सांगता येऊ शकतात...
7.08 ची वेळ बदलली आणि 7.02 झाली. त्या दिवशी पुण्याला परीक्षा द्यायला जात होतो. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी वेळापत्रक बदलतं हे माहीत नसल्याने ती सुटली होती. पर्यायाने मागची इंटरसिटीही सुटली. मग काय धावत्या विशाखाट्टनम् मधे कल्याणहून उडी मारली आणि 15मिनीटे उशीराने का होईना परीक्षेला पोहचलो. सर वाटच बघत होते. :)
नगरकोइलची पॅन्ट्री खास! ती मिळाली की लोणावळ्या आधी नाश्ता आणि काॅफी ठरलेली. त्या संध्याकाळी घाट सुरू झाला तरी डोसेवाला काही आला नव्हता म्हणून चौकशी केली. ते समोर बसलेल्या आजोबांनी ऐकलं. जरा वेळाने जागेवरून उठून बाहेर जाऊन आले ते हातात दोन प्लेट डोसे आणि सांबार वाढायला बरोबर पॅन्ट्रीतला माणूस घेऊन. नंतर माझं पुस्तकात डोकं जाणारच नाही असे अनुभव त्यांनी सांगितले. सत्तर-पंचहात्तरीतलं वय. पण शरीर आणि आवाज खंबीर. रेल्वेत मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झालेले. आणि पाकिस्तानातील रेल्वे प्रकल्प अभ्यासून आलेले हे आजोबा, माझ्या प्रवासातले पेल्स्टन काकाच!
टिसीने सगळ्यात जास्त त्रास दिला ती गाडी म्हणजे पुणे-इंदोर. दुपारी 12 नंतर मुंबईसाठी 3.20 पर्यंत म्हणजे ही सुटेपर्यंत एकही गाडी नाही. पुण्याहूनच सुटणारी ही गाडी. पुणेरी सहप्रवाश्यांची कमी ती कसली असणार! उन्हाळ्यात शेड नसलेल्या कारशेडमधून येऊन ही फलाटावर लागली की तिच्या डब्ब्यांनी पेटत्या भट्टीचे रूप घेतलेले असायचे. पण बाहेरगावची गाडी असल्याने ती सगळ्यात लवकर पोहचते म्हणून तिच्यातून खूप वेळा प्रवास केला. कधी कधी तिला पकडायला खडकी पर्यंत चालत जाऊन लोकल ने चिञ्चवडपर्यंतचा प्रवास केला. यात विशेष काय? असाही प्रश्न पडेल. साहाजिक आहे. मुंबईत लोकलने प्रवास करणे सोपे असते. कारण, 'सगळ्यांनाच प्रवास करायचाय' याची जाणीव सगळ्यांनाच असते. पुण्यात प्रवास फक्त 'माला एकट्यालाच' करायचा असतो.😜 थोडक्यात, पुणेरी अनुभव या ट्रेनने खासच दिले.
……………………………………………………………………
24 ऑक्टोबर 2015
एक भन्नाट, नियम तोडून गाडी पकडल्यावर केलेला प्रवास. 12चं लेक्चर होतं. आवडत्या विषयावरचं शेवटचं लेक्चर. काहीही करून चुकवायचं नव्हतं. नेमक्या त्याच दिवशी सगळ्या ट्रेन वेळेवर होत्या. ब्रीज वर असतांना कसारा फास्ट गेली आणि माझी डेक्कन चुकण्यात जमा झाली. स्लो टिटवाळा पकडली. तिने ठाकुर्ली सोडलं तेव्हा समोरून कल्याणच्या दिशेने ऐटीतच डेक्कन धडधडत गेली. दोन नंबरवर टिटवाळा लागली. चार नंबरवर डेक्कन वाटच पाहत होती! मधे तीन रूळ. ब्रीज वरून जाऊन ट्रेन मिळणं शक्यच नव्हतं. कुठूनही ट्रेन येत नाहीये असं बघून उडी मारली आणि समोरच्या गच्च भरलेल्या जनरल डब्ब्यात चढलो. दोन डब्बे सोडून माझा (पास धारकांचा) डबा होता. प्लॅटफाॅर्मवर उतरलो आणि ट्रेन सुटली. आमचा डबा सामान्य लोकांसाठी नेहमीच बंद असतो. धावत जाऊन राॅडला पकडून पायरीवर उभा राहिलो. प्लॅटफाॅर्म सुटला असावा. आवाज ऐकून ओळखीच्या लोकांनी ओळख दाखवली. दार उघडलं. जागेवर बसलो.😌
…………………………………………………………………………….
कामशेत जवळ मेगाब्लाॅक चालू होता. 3.20ची गाडी पकडायला पुणे स्थानकात पोहचलो आणि सगळ्याच गाड्या 4.30 नंतर सुटतील अशी announcement झाली. इंदोर 1नंबर वर लागली होती. बसायची जागा वगैरे पकडली. बॅग ठेवली अन् बिस्कीट आणायला प्लॅटफाॅर्मवर उतरलो. तेव्हा दोन नंबरवर उद्यान लागतच होती. तिची नेहमीची वेळ 3.50-4.00 ची असते. ती वेळेत आली होती. तीन नंबरवर डेक्कन आणि चार का पाच वर कोयना होती. सगळ्या मुंबईकडे जाणार्या गाड्या. वेळापत्रकानुसार इंदोर सगळ्यात आधी सुटणे अपेक्षित होते. Announcement झाली. "उद्यान एक्सप्रेस छुटने को तयार है." माझे पाय फिरले. तसे इंदोरच्या आडून डब्बा हललेला दिसला. "ती सुटली तर अजून 1 तास उशीर" डोक्यात विचार येऊन गेला. फोडलेला बिस्कीटाचा पुडा खिशात कोंबत धावत बॅग ठेवलेल्या डब्यात शिरलो. अपरबर्थ वरची बॅग घेतली आणि दारात आलो. एक कपल एकमेकांना 'अलविदा' म्हणत होतं. स्त्री दाक्षिण्य वगैरे सगळं विसरून "Side" जोरात ओरडलो. दचकल्यामुळे मला जागा मिळाली. दोन गाड्यांमधे एक रिकामारूळ होता. ज्यावर गाडी येण्याची शक्यताच नव्हती. सिग्नल बघितला. उडी मारली. S10 चा दरवाजा. त्याचा राॅड पकडला आणि धावत शिडी चढणार तेवढ्यात पाण्याचा खंब मधे असल्याचं लक्षात आलं आणि राॅड सोडून मी गटारात न पडता स्वतःला बॅलन्स केलं. ट्रेनचा वेग वाढत होता. जीवंतपणे त्यात चढण्यासाठी ट्रेनच्या वेगाने धावतच तिला पकडणं हुशारीचं होतं. सोडून देण्या इतकीही ती फास्ट झाली नव्हती. मधल्या ट्रॅकवर आलो आणि धावायला सुरवात केली. "जिथे एकनंबर संपतो तिथे लगेज साठी रस्ता आहे. एकही खांब नाही" मनाने आठवलं, डोळ्याला दिसलं. "प्रवाश्यांनी दुधाच्या बाटल्या ट्रॅकवर टाकल्या आहेत. सांभाळ!" "शिटीचा आवाज? आपल्या मागे पोलिस तर नाही ना?"😨 चढायच्या जागेपर्यंत पोचलो तेव्हा सगळे स्लीपर कोच गेलेले होते. आणि ग्रीप मिळून पायरी वर स्थिर होईपर्यंत शेवटचा एसी कोच उजाडला. HA1. सगळे वातानुकूलित डबे पार करून टिसीला पासधारक असल्याचे सांगून घाम पुसत एका जागेवर बसलो. आणि सगळ्यात पहिला विचार मनात आला. "आईला हे आवडणार नाही." "इतका रिस्की प्रवास या पुढे करायचा नाही." हा प्रसंग मुद्दाम तेव्हाच डायरीत लिहून काढला.
.......................................................................................................
प्रवास सुरू होऊन महिनाही झाला नसेल. माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. त्यावेळेस घडलेल्या प्रसंगाने जी जाणीव करून दिली ती आयुष्यभर लक्षात ठेवण्या साठीची. उद्यानने परतीचा प्रवास चालू होता. अष्टाध्यायीची सूत्र पाठ करत होतो. लोणावळा गेल्यावर टिसी आला. विद्यार्थी आहे असं नुसतं सांगून काही पटलं नाही. वर असलेले सुट्टे पैसे जमवून वीस रुपये टेकवले आणि पुस्तकात डोकं खुपसलं. पळसधरी मागे गेलं असावं. टिसी पुन्हा आला आणि माझ्या अभ्यासाची चौकशी करून गेला. काय शिकतोस? काय पाठ करतोयस? वगैरे वगैरे... संस्कृत शिकतोय म्हटल्यावर चेहरा त्याचा फार खुलला. स्कोप, पुढचे प्लॅन वगैरे विचारले आणि निघून गेला. नेरळच्या जवळ कुठेतरी तो परत आला. माझ्या हातात मीच दिलेल्या वीस रुपयांची चिल्लर परत टेकवली. मी विचारलं, "काय झालं काका?" -"तुमच्या कडून कुठे पैसे घ्यायचे? संस्कृत शिकता तुम्ही. मी या गाडीत असतांना कधीही कुणालाही पैसे देऊ नका." विषय फार न ताणता तिथून तो निघून गेला. मनात विचार आला. हे कन्सेशन इंजिनिअरच्या विद्यार्थ्याला मिळाले असते का? जे काही शिकतोय त्याचे दायित्व समाजाला का असावे तर केवळ याच कारणासाठी.
.......................................................................................................
काॅलेजमधे भगवद्गीतेवर पेपर सादर करायचा होता. सकाळी चार पर्यंत विषय मिळाला नव्हता आणि ठरतही नव्हता. शेवटी शांकरभाष्य आणि ज्ञानेश्वरी बॅगेत भरली आणि प्रवास सुरू झाला. कर्जत लोकल मधे दोन्ही पुस्तकातले दुसर्या अध्यायातले दृष्टांत लिहिले होते. आता फक्त पेपर लिहीणं बाकी होतं. सगळा प्रवासच अफलातून! त्या दिवशी सोमवार होता. पासधारकांचा डबा लोकल ट्रेन सारखा भरलेला असणार यात शंका नव्हती. कर्जतला एका रिझर्वेशन डब्यात चढलो. ट्रेनच्या दोन डब्ब्यांमध्ये पुढून आणि मागून येणारे प्रेशर adjust करायला रबरी सस्पेन्शन असते. आणि तिथेच एका डब्यातून दुसर्या डब्यात जायला दोन्ही डब्यांना फळ्या असतात. त्या एकमेकांवर ठेवलेल्या असतात व पुढे मागे सहजपणे सरकू शकतात. वरच्या फळीवर आपण बसून balance सांभाळत सहज प्रवास करू शकतो. मुंबई-पुणे इंटरसिटी हा छोटासा प्रवास असल्याने या गाडीतील शौचालये बरीच स्वच्छ असतात. म्हणून या फळीवरून प्रवास करणं फार कठीण नाही. याचा प्रत्यय इथे पेपर लिहितांना आला. पेपर पूर्ण करायला खाली बसावं लागणार याची कल्पना होती. बॅगेत एक बैठक (कापडी चटई) पण ठेवली होती. ती बाहेर काढली. आणि मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात रफ पेपर लिहून झाला. टिसी येऊन चौकशी करून गेला. म्हटलं "सब्मिशन आहे." All the best देऊन गेला.😂  खरं तर तिथे बसल्यावर घाटात लागलेले मागचे इंजिन किती महत्वाचे होते याची जाणीव झाली. आणि घाटाचा चढ, पुढच्या इंजिनचा ओढ, भौतिकशास्त्रात कधीतरी शिकलेली banking of roads ची theory या सगळ्यांचा एका वेगळ्या पातळीवर अनुभव घेता आला. माझा प्रवास असाच चालू राहणार होता. ही फक्त सुरुवात होती.
पासधारक म्हणून पहिला प्रवास आणि दोन वर्षात सर्वात जास्त प्रवास नियमितपणे केला तो कर्जत-पुणे इंटरसिटीने. त्या कुटुंबाचा भाग बनलो आहे. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी विसरता येणार नाही असा भावनेचा बांध फुटलेला शेवटचा प्रवास इंद्रायणीने झाला. त्या दिवशी खर्या अर्थाने मला, "हे भलते अवघड असते..." या कवितेचा अर्थ समजला.
या ट्रेन शी, या प्रवासाशी इतक्या आठवणी आणि प्रसंग जुळले आहेत. की ते सगळे लिहून काढायला पुढचे अजून दोन वर्ष लागतील... त्यामुळे इथेच थांबलेलं बरं!
पुण्यातल्या मित्र-मैत्रिणींनी एका कवितेचं विडंबन प्रवासाच्या आधारावर करायला सांगितलं. खरं तर ते विनोदी होणं/करणं अपेक्षित होतं पण नकळंत पणे पुढचं लिहिलं गेलं...
संवादात कुणाच्या नाव ऐकताच पुण्याचं, बघ माझी आठवण येते का? मागे डोकाव, तासन्तास केलेला ट्रेनचा प्रवास; कधी उभ्याने, आशेत बसण्याच्या बघ माझी आठवण येते का?
उभं राहून, चालून येणारे पायाला गोळे, पायातच ठेव मांडी घालून घे, झोपी जा. नाहीच जाणवणार यातना, झोप लागेल गाढ, कधीतरी बसायला मिळेलच, स्वागतासह नाश्त्याने संपलाय प्रवास आता, बंघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, चटके अगणित ऊन्हाचे टोचून घे चालत रहा स्थळी पोहोचे पर्यंत, वेळ थांबणार नाहीचे शेवटी; लिफ्ट मागू नकोस, टोपी घालू नकोस, पुन्हा त्याच रस्त्यावर, आता गाडी एखादी थांबेलही बघ माझी आठवण येते का?
चालता चालता हाॅर्न वाजेल. कोण ते बघ, सहपाठी असेल, पायदान हाताने उघडेल, बसण्याची खूण करेल तुला काहीही विचारणार नाही, कारण ज्ञात असेलच; तू लिफ्ट घे. स्थळी पोहचून उतरशील, पायदान बंद कर, thanx म्हणून कामाला लाग, बघ माझी आठवण येते का?
मग जेवण होईल, पोट बिघडल्याची जाणीव होईल, शौचालयात पाणी नाहीच, रखरखीतच सगळं, पोटातील गुडगुडणं सहन करत रखरखीत उन्हात चालतच बस स्टाॅप गाठशील बस येईल 348, कुठेही न वळता स्टेशन गाठेल, तू धावत तुझी ट्रेन गाठ, काम आटोप, बघ माझी आठवण येते का?
या नंतर सताड डोळ्यांनी तापते पत्रे पहायला विसरू नकोस. त्यांना बाहेरच्या झळा भाजून नुसत्या शरीराची लाही लाही करण्याचा प्रयत्न करतील. यानंतर T.C येईल. त्याला 10-20 रू. लाच दे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. कल्याणला पोहोचता पोहोचता, बघ माझी आठवण येते का?
______________________________________________
एम.ए. साठी शेवटचा पास काढला आणि महिन्याभरानंतर आपला प्रवास संपणार या विचारानेच फार भरून आलं. तेव्हा लिहिलेली ही कविता....
आता, पुण्ण्याच़ं काम आणि पुण्याच़ं काम यातला णकार उच्चारताना उच्चारणातील 'प्रयत्ना'त होणारा आणि त्यामुळे कामातील 'प्रयत्ना'त दिसणारा फरक अगदी व्यवस्थित समज़ला आहे.
ते सामंजस्य येण्यासाठी स्वतःज़वळ असलेल्या पुण्ण्याच्या ज़ोरावर पुण्याचा प्रवास थांबवतांना लिहिली गेलेली ही कविता...
थांबवतांना प्रवास पुण्याच़ा
मीस करणारे मी प्रवास
माझ़ा, निसर्गाच़ा, ट्रेनच़ा, काळाच़ा...
एकंच़ प्रवास विवर्तलेला...
घरी पोहच़ायची केवळ आस
म्हणून तर काढला मी एक पास
अन् सुरू झ़ाला माझ़ा प्रवास...
मनन, गाणी, गप्पा, अभ्यास
सरती कसे सहा तास
संपता संपता माझ़ा प्रवास...
ग्रीष्मातील वणव्याच़ा
वर्षेतील धबधब्यांच़ा
धुक्याच़ा अन् थंडीच़ा
वसंतातील कूजनाच़ा
गंधात न्हालेल्या पृथ्वीच़ा
प्रवास माझ्या सोबत, निसर्गाच़ा
प्रवास, एकाच़ ट्रेनच़ा
ट्रेनमधल्या प्रवाश्यांच़ा
प्रवाशांच्या शरीरांच़ा
आणि, शरीरातील मनामनाच़ा
तरीही, प्रवास एकाच़ ट्रेनच़ा...
सूर्य एकंच़, रोज़ दिसणारा
नाविन्यपूर्ण स्वभावांच़ा
सूर्य, मानवी दृष्यांच़ा
अनुभव उत्तर-दक्षिणायनाच़ा
प्रवास एका काळाच़ा...
थांबवतांना प्रवास पुण्याच़ा
मीस करणारे मी प्रवास
माझ़ा, निसर्गाच़ा, ट्रेनच़ा, काळाच़ा...
एकंच़ प्रवास विवर्तलेला.
-गंधार डोम्बिवलीकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा