बुधवार, १५ जानेवारी, २०२०

बेडूक

वैद्य असलेले जुळे आश्विनौ बाहेर पडतात ती वेळ. रात्र म्हणता येणार नाही अशी रात्र नाही पहाट म्हणता येईल असंही उजाडलेलं नाही. माघाकडे झुकणाऱ्या अष्टमीच्या चंद्राबरोबर तशीच थंडी पडलेली. खिडकीतून वाऱ्याचे लोट अधून मधून अंगावर काटा आणणारे. जागा- स्वच्छ. समोर दार, मागे खिडकी. इतर दोन्ही बाजूची अर्धी भिंत फरश्यांनी चकचकीत. पण, वरच्या भिंतीवर ओल येऊन पोपडे उडालेले.
नुकत्याच उठलेल्या काही पाखरांचा आवाज, मोराचा केकारव, डुलकी लागत असावी असं भासवणाऱ्या पेंगुळलेल्या रातकि़ड्याचा आवाज. वाऱ्याच्या झुळूकीबरोबर डुलणाऱ्या हुरड्यासाठी तयार झालेल्या ज्वारीच्या पीकांचा मागच्या शेतातून येणारा आवाज. बाकी सगळीच शांतता. आपण हालचाल केल्यावर खोलीत घुमेल इतकाच मनुष्यनिर्मित आवाज.
डोळ्यावरची झोप अर्धवट उघलेली असतांना अश्या नहाणी घर कम पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयात बसलेल्या आपल्यावर, मागल्या बाजूला असलेल्या खिडकीवरच्या पाईप वरून एक बेडूक उडी मारतो. ही उडी अंगावर असेल तर?

अंघोळ करत असतांना समोरून मारलेली ही उडी बघितली आणि दुसऱ्या दिवशी घडू शकणाऱ्या प्रसंगाच्या कल्पनेने, त्या बेडकाचा बंदोबस्त करायला हवा असा, मानवी विचार मनात आला. टणाटण उड्या मारणारा तो बेडूक, सौर बंबाने गरम पाण्याची ऊब घेऊन अधिकच तरतरीत झाला. वर पोहचायची वाट शोधू लागला.

मातीत झोपायचं सोडून, विहिरीत रहायचं सोडून, बेडूक इथं कुडकुडायला का आला असावा?

दिवसभरात त्या बेडकाची जागा न्याहाळून हेरून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे आधी त्याचा शोध घेतला. त्याला बाहेर काढणं कठीण होतं. तो जमिनीवर आल्यावर त्याला छोट्या बादली खाली झाकून ठेवलं. मानवी स्वभाव! दुसरं करू तरी काय शकणार?

प्रत्येक जण आपापल्या कूपात (विहिरीत) राहणारा. प्रत्येकाला आपलाच कूप स्वच्छ, सुंदर आणि उत्तम वाटणारा. त्या कूपाच्या बाहेरचं जग विद्रूप, कुरूप मानणारा. आपलाच कूप वाढावा यासाठी आटापीटा चाललेला. या सगळ्या स्पर्धेपासून अलिप्त राहून जगू इच्छिणारा तो, भिंतीवरला बेडूक. भीती वाटावी त्याची, त्याच्या वेगळ्या विचारांची म्हणूनचकी काय, मानवी स्वभावाने त्याला बांधून टाकलं बंद बादलीत. काही वेळ बांधलेलं राहून तरी शिकेल एखाद्या कूपानुसार ढाळून घेऊन रहायला. लाल, हिरव्या, निळ्या, भगव्या किंवा पांढऱ्या झेंड्याखाली.

प्रभाकर पेंढारकरांच्या रारंग ढांगच्या एकशे चौऱ्याहत्तराव्या पानावर कर्नल राईट विश्वनाथला विचारतात-

"...ज्याचा जीवनाशी संबंध नाही आणि जे मनापासून पटलेलं नाही ते विद्यार्थ्यांना शिकवण्याची पाळी शिक्षकावर येते. राज्यकर्त्यांच्या लहरीनुसार संशोधनाचे विषय शास्त्रज्ञांना निवडावेच लागतात...
...सैन्यात नसेल पण बाहेर तरी तुली अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य आहे का?”

लेखकाला ‘ह्या जगात सर्वसुखी माणसाइतकाच दुर्मिळ स्वतंत्र माणूसही आहे काय?’ हा प्रश्न सतावतोय.

-सम्प्रिः।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा