बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

भाषारत-8

45 व्या दिवसानंतर आच 52 व्या दिवशी लिहीतो आहे.

"मा भूदेवं क्षणमपि च ते विद्युता विप्रयोगः..."
भैरवीत म्हटलेली ही ओळ अंगावर काटा आणून जाते. 110 श्लोकात खिळवणारं मेघदूत एका एकी संपत असतं. "आता तू सानंद संचार कर" (इष्टान् देशान् जलद विचर) म्हणणारा यक्ष त्याच्या आलका नगरीच्या वर्णनाने आलकेत अडकवून ठेवत असला तरीही, दिशाहीन करून सोडतो.
चुकूनही तुझा आणि वीजेचा वियोग होऊ नये असे शुभाशीष व्यक्त करतो.
मेघदूत संपतं.
हीच दिशाहीनता हरिद्वारला मनात दाटली होती. थांबून काहीतरी शिकूया असं खूप वाटत होतं, वाटत आहे.

आई-बाबा आणि सयुरी बरोबर दोन दिवस आराम केला. ऋषिकेशहून देहरादूनचा प्रवास. मी सायकलने आणि आई बाबांनी माझा भार, माझ्या दोन बॅगा उचलून खाजगी वाहनाने केला. देहरादून त्यांना फिरायचं होतं. पण मी एक दिवस आराम करायचा ठरवल्यावर त्यांनीही आराम केला.  मग निघतांना तेच मेघदूतातलं वाक्य...
"भो भूदेव किमर्थमयं मक्तूबे विप्रयोगः?" (अरे भूदेवा, हा वियोग विधिलिखित का?) विचारावंसं वाटलं. गंगेकडून यमुने कडे जातांना डोळ्यात गंगा यमूना उभ्या असायच्याच!

यमूना ओलांडून हिमाचल प्रदेशात शिरलो. यमुना नदीचे खोल विस्तीर्ण पात्र. दूरवर पसरलेल्या शिवालिक डोंगररांगा, घनदाट अभयारण्य, मी आणि माझी सायकल! ज्यात भय नाही असे 'अभयारण्य'. पण आधीपासूनच त्यात भय असेल तर? ते आभयारण्य असायला हवं!
असो, मजेचा भाग वगळता, छोट्या छोट्या मानवी वसत्यांमुळे आभयारण्य अभयारण्य झाली आहेत.
इथे एका गावातून जाताना एक सातवीतला विद्यार्थी सायकलवर अर्धा किलोमीटर माझा पाठलाग करत आला आणि गप्पा मारू लागला. नंतर त्याच्या घरी घेऊन जात, "मेरा फ्रेण्ड है," म्हणत आईशी ओळख करून दिली. शनिवारचा दिवस होता. म्हटलं, शाळेला सुट्टी आहे का?
"वो दिल्ली मे कोई तो मर गया है. इसलिए होलिडे."
माहीत नसलेल्या व्यक्तीच्या दुःखात बुडालेली शाळकरी मंडळी पुढे घराघरातून मला हात दाखवत टाटा करतांना दिसली.
काही ठिकाणी गप्पा मारल्या. काही ठिकाणी नमस्कार स्वीकारून पुढे गेलो.
साकेती जीवाश्म संग्रहालय याच डोंगर रांगांच्या कुशीत वसलं आहे. प्राणी आणि मानवांच्या व्युत्पत्ती विषयक सुंदर अभ्यासपूर्ण संकलन इथे आहे. शिवालीक डोंगर रांगा जीवाश्मसंशोधना साठी विशेष महत्वपूर्ण मानल्या जातात.
हिमाचल आणि हरियाणाच्या सीमेवर कालाआंब नावाचं गाव आहे. औद्योगिक प्रकल्प हिमाचल प्रदेशात आणि निवासी विभाग हरियाणात. तिथे एका मंदीरात मुक्काम केलं. ते मंदीरही अर्ध हिमाचल आणि अर्ध हरियाणात होतं! हरि बोल महाराजांशी भाषाशास्त्र व त्या प्रांतातील भाषेच्या अभ्यासावर चर्चा झाली. 3,500 कि.मी. चा प्रवास पूर्ण करून चंडीगढला पोहचलो. वास्तविक बरंच मागे यावं लागलं होतं. केवळ, पुढील लेह च्या मार्गाची तयारी करायला! सायकल सुसज्ज करणे. हवामानानुसार कपड्यांची सज्जता करणे, त्यासाठी चंडीगढ सारखं दुसरं शहर नव्हतं.

#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia
#सायकलोपासना #cyclopasana

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा